करडी नजर आणि भारदस्त आवाजाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी सकाळीच वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गेली पन्नास वर्षे त्यांनी मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून मनोरंजन करण्याचं काम केलं. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका निभावली. त्या रवी पटवर्धन यांची कारकीर्द खरोखरच अतिशय चांगली अशीच आहे. शिस्तबद्ध आणि सभ्य अभिनेता म्हणून असलेली ओळख आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वाने त्यांनी कायम स्मरणात राहतील अशाच भूमिका केल्या. आवाज ही त्यांची ओळख होती. त्याचा वेळोवेळी त्यांनी खुबीने वापर केला होता. रंगभूमीवर काम केलेला कलाकार काहीही करू शकतो हे त्यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवले. अखेरपर्यंत काम करत राहणाºया या कलावंताचा अस्त रविवारीच झाला आहे असेच म्हणावे लागेल.
अस्सल मराठमोळं व्यक्तिमत्त्व म्हणून तर ते फारच भावले, सर्वांना आवडले होते. म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यांमुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका भूमिका मिळत गेल्या असल्या, तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. विशेषत: दूरदर्शनवरच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या गप्पागोष्टीमुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांत पोहोचला. यातील त्यांनी साकारलेला वस्ताद पाटील प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहील. त्यातील हंसाकाकूचा उखाणा जेवढा खणखणीत होता तेवढाच रवी पटवर्धन यांचा वस्ताद रुबाबदार होता. त्यामुळे सहजसुंदर अभिनय करणारा एक अभिनेता आपल्यातून गेला याची हुरहुर कायम मनात राहील.
वयाच्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी नाटकात पाऊल ठेवलं होतं. १९४४ मध्ये झालेल्या नाट्य महोत्सवात त्यांनी एका बालनाट्यामध्ये भूमिका केली होती. या नाट्य महोत्सवाचे अध्यक्ष होते बालगंधर्व, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. गेल्या दीड वर्षापासून गाजत असलेले आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते हे विशेष. वयपरत्वे येणाºया विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले होते. हे किती कौतुकास्पद आहे. कलाकार कष्ट घेतो, परिश्रम घेतो, प्रयत्न करतो म्हणजे नेमके काय करतो याचे हे उदाहरण आहे.
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला अशा असाव्या सुना हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. सिंहासन, उंबरठा, बिनकामाचा नवरा ते अगदी अलीकडचा हरी ओम विठ्ठला हे पटवर्धन यांचे चित्रपट. जवळपास १०० मराठी चित्रपटांतून त्यांनी काम केले आहे. एन. चंद्रा यांच्या अंकुश, प्रतिघात, तेजाब, नरसिंहा, हमला हे आणि इतर अनेक चित्रपट केले. व्ही. शांताराम यांच्या झंझार या चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.
कलाकाराला आणि अभ्यास करायला शिकायला वय नसतं ते रवी पटवर्धन यांनी करून दाखवले होते. म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ केले होते. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. हा एक चमत्कार म्हणायचा की जिद्द, असा प्रश्न पडतो. रवी पटवर्धन हे उच्चशिक्षित होते. अभ्यासू होते. मुंबईच्या रिझव्र्ह बँकेत नोकरी करत होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. त्यामुळे आपल्या सहकाºयांशी ते अत्यंत आत्मियतेने वागायचे. वयानुसार येणाºया विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. त्या शास्त्राचा वापर करून स्वत:च्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला. त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. दोन वर्षांपूर्वी आरण्यकचे पुनरुज्जीवन केले. त्याचे लेखक रत्नाकर मतकरी याचवर्षी कोरोनामुळे गेले. त्यानंतर त्यांनी निर्माण केलेल्या नाटकातील कलाकार रवी पटवर्धन रविवारी गेले. एकापाठोपाठ एक धक्के रंगभूमीला मिळाले आहेत.
त्यांच्या आवाजात असणारी जादू ही नाटकात केलेल्या कामांमुळे होती. अपराध मीच केला या नाटकात लष्करी अधिकाºयाची भूमिका त्यांनी केली होती. पूर्वी ती भूमिका अरुण सरनाईक करत होते. त्यानंतर रवी पटवर्धन यांनी केली. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध सहन न होऊ न तिच्या प्रियकराला गोळी घालणारा लष्करी अधिकारी त्यांनी जबरदस्त रंगवला होता. न्यायालयात सीमेवर शत्रूला कितीतरी गोळ्या मारल्या आणि शत्रूचे सैनिक मारले, तर वाहवा मिळवतो, पण आज घरातला शत्रू मारला तर मी गुन्हेगार ठरतो हे बोलताना त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीला प्रेक्षक स्तब्ध होत असत.
आनंद (बाबू मोशाय) हे वि. वा. शिरवाडकरांचे नाटक. राजेश खन्नाचा गाजलेला चित्रपट याच कथेवरचा. या नाटकात बाबू मोशायची भूमिका करत असताना त्यांची आणि सतीश दुभाषी यांची जुगलबंदी असायची. आरण्यक (धृतराष्ट्र), एकच प्याला (सुधाकर) या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. विशेष म्हणजे एकच प्यालातील सुधाकराची भूमिका करून कंटाळलेल्या चित्तरंजन कोल्हटकर यांनी आता आपण तळीरामाची भूमिका करावी, असे ठरवून आपली भूमिका पटवर्धन यांना करायला लावली होती. याशिवाय कथा कुणाची व्यथा कुणाला (मुकुंद प्रधान), कोंडी (मेयर), जबरदस्त (पोलीस कमिशनर), प्रेमकहाणी (मुकुंदा), बेकेट (बेकेट), भाऊबंदकी, मला काही सांगायचंय (बाप्पाजी), मुद्रा राक्षस (अमात्य राक्षस), विकत घेतला न्याय (सिटी पोलीस आॅफिसर) या भूमिकाही अजरामर केल्या होत्या.
चित्रपटात भूमिका साकारतानाही समोर कोण आहे याचा त्यांना कधी फरक पडत नव्हता. अंकुश या चित्रपटात नाना पाटेकर समोर होता, पण रवी पटवर्धन त्यात भाव खाऊ न जात होते. उंबरठामध्ये तर गिरीश कर्नाड, स्मिता पाटील अशा दिग्गजांसमोर ते उभे होते. व्ही. शांताराम यांची अखेरची निर्मिती असलेल्या पण फारसा न चाललेल्या झंझार या चित्रपटात त्यांना काम करायला मिळाले होते. हा चित्रपट तसा अपशकुनीच होता, कारण त्याच चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री रंजनाला अपघात झाला. त्यातून दीर्घकाळ अंथरूणाला खिळून राहून ती गेली. याशिवाय तक्षक, तेजाब, नरसिंहा, प्रतिघात अशा चित्रपटांतून सुनील शेट्टी, अनिल कपूर, सनी देओल, नाना पाटेकर, अशा दिग्गजांबरोबर ते समोर आले होते.
बिनकामाचा नवरामध्ये कुलदीप पवारच्या सासºयाचे काम त्यांनी केले होते. सिंहासनमध्ये अरुण सरनाईक, श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी, अशा दिग्गज राजकारण्यांच्या टोळीत ते महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. कोणतीही भूमिका करताना मनापासून काम करण्याची त्यांची शैली होती. त्यामुळेच ते कायम सर्वांच्या लक्षात राहिले.
अग्गंबाई सासूबाई ही एक वादग्रस्त मालिका सध्या झी मराठीवर गाजते आहे. यात बबड्याच्या आजोबांची दत्ता कुलकर्णी नामक वृद्धाची भूमिका त्यांनी साकारली होती. दूरदर्शनवर १९९० च्या दशकात गाजलेल्या महाश्वेता या मालिकेतही त्यांनी चांगली भूमिका केली होती. त्यामुळे रविवारची सकाळ रवी पटवर्धन यांच्या जाण्याच्या बातमीने उगवली त्याचे वाईट वाटले, पण कोणताही कलाकार अखेरपर्यंत काम करत असताना त्याची एक्झिट होणे फार महत्त्वाचे असते. काम करता करता गेलेला तो श्रेष्ठ कलाकार असतो, त्यात रवी पटवर्धन यांचा समावेश झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा