सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

भातखळकर असे का बोलतात?


भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील एक अभ्यासू, तरुण तडफदार नेते, अशी अतुल भातखळकर यांची प्रतिमा होती. होती अशासाठी की, आता ते आपली प्रतिमा बदलत आहेत. ही बदलणारी प्रतिमा चांगली नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. खरं तर भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेवर आपला भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहत असताना त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले पाहिजे, परंतु अलीकडे बेताल वक्तव्ये आणि चीडचीड करून शांत संयमी भातखळकर आपलीच प्रतिमा डागाळत आहेत. त्यांच्याकडून अशा तºहेच्या वक्तव्याची अपेक्षा नाही आणि ते ज्या भारतीय जनता पक्षात आहेत, तिथेही अशी प्रथा नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात मुंडे-महाजन यांचा भाजप होता, तेव्हा तर कधीच असे होत नव्हते. हे सांगण्याचे कारण म्हणजे शरद पवार यांच्या वाढदिवासाच्या दिवशी अतुल भातखळकर यांनी केलेले ट्विट हे चांगले नाही. तशा तºहेची वक्तव्ये कोणालाच शोभणारी नसतात, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. पक्षाने आपल्याकडे विशिष्ठ जबाबदारी दिल्यावर किती संयमाने बोलले पाहिजे, याचे भान असलेच पाहिजे. परंतु एक आमदार म्हणून, पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणून किंवा दीर्घकाळ प्रवक्ते म्हणून ज्यांनी चांगले काम केले होते, ते आता विचित्र वक्तव्ये करत आहेत हे फार वाईट आहे.


पवारांच्या वाढदिवसाला शिवसेनेने त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, तर त्यावर गलिच्छ भाषेत अतुल भातखळकरांनी ट्विट केले. ‘हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगडं वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती?’, असे वक्तव्य करून आमदार अतुल भातखळकर यांनी स्वत:ची किंमत कमी का करून घेतली? ही भाजपची संस्कृती आहे का? वाढदिवस, लग्नसमारंभ किंवा कोणताही कौतुकाचा कार्यक्रम असतो, तेव्हा आपसातील मतभेद विसरून शुभेच्छा देण्याचे काम विरोधकांचे असते. आपण वेगळ्या विचारांचे असतो, वेगळ्या मतांचे असतो, पण एकमेकांचे शत्रू नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. आज शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र महाविकास आघाडीचे सरकार चालवत आहेत. तो त्यांचा मित्र पक्ष आहे आणि शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शिवसेनेने कौतुकाचा वर्षाव केला, तर तो अतुल भातखळकरांना का झोंबला? पवार कधी तंगडं वर करायला सांगतील, असे भातखळकरांचे म्हणणे हे अत्यंत गलिच्छ असे आहे, सभ्यतेला सोडून आहे.

एकेकाळी चर्चेला कोणत्याही वाहिनीवर येणारे अतुल भातखळकर हे अभ्यासू, शांतपणे बोलणारे नेते असे होते, पण आजकाल कोणत्याही वाहिनीवर ते चर्चेला आले तर भांडायला आल्यासारखे येतात. हा बदल कशाने झालेला आहे? हा झालेला बदल निश्चितच चांगला नाही. परिस्थिती बदलत असते. वादळे येत असतात, पण नेत्याने नेहमी स्थितप्रज्ञासारखे राहायचे असते. ९ तारखेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा वाढदिवस होता, तेव्हा पंतप्रधान मोदींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ही औपचारिकता व्यवहारात, राजकारणात, सार्वजनिक जीवनात सांभाळायची असते. युतीमध्ये एकत्र असताना मोदींच्या, वाजपेयींच्या कितीतरी निर्णयांचे स्वागत शिवसेनेने केलेले होते. आपल्या मित्रपक्षाचे कौतुक करणे, वेळप्रसंगी त्यांना समज देणे हे कौशल्य असते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे विरोधकांना कधी शत्रू मानत नव्हते. मुंडे आणि विलासरावर देशमुख यांची मैत्री सर्वांना ठाऊक होती, पण हे भान आता का राखले जात नाही? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवारांचे अभिनंदन केले होते. सर्व जण करत होते, परंतु शिवसेनेने अभिनंदन केले म्हणून अशा प्रकारचे ट्विट करून स्वत:चे अवमूल्यन करून घेतले आहे, असे वाटते.


भातखळकरांना महाराष्ट्र ओळखतो ते एक चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून. मुक्त अर्थव्यवस्थेबाबत त्यांनी निर्माण केलेला झंझावात, विविध नियतकालिकांमधून केलेले लिखाण हे त्यांचे अभ्यास, चिंतनशील नेत्याचे दर्शन घडवत होते. कोकणात संघ प्रचारक म्हणून काम करताना त्यांचा संयम, सभ्यता, वक्तृत्व हे अत्यंत कोणावरही छाप पाडेल, असे होते. कोकणात, मुंबईत भाजप रुजवण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे अभ्यासू नेता म्हणून पाहिले जात होते त्यांची गणना बेताल वक्तव्ये करणाºया नेत्यांमध्ये व्हावी हे चांगले नाही. शिवसेना आपला एकेकाळचा मित्र होता. आता युती तुटली याचा अर्थ तो शत्रू झाला असे होत नाही. भाजप आणि शिवसेना परत एकत्र येणारच नाहीत, असे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे परस्परांचा आदर करून, फक्त वैचारिक मतभेद व्यक्त व्हावेत. पण काही ठिकाणी औपचारिकतेला तिलांजली देत असभ्य भाषेत टीका करणे हे चुकीचे आहे. वाढदिवसाला स्तुती आणि गौरवपरच लेख लिहिले जातात, पण योग्यवेळी मैद्याचे पोते म्हणूनही त्याच शिवसेनेने उल्लेख केलेला होता. त्यामुळे योग्य वेळी योग्य वागणे हे राजकारणाचे सूत्र असते, पण याचा अर्थ संयम ढळता कामा नये. शरद पवार आज एका उंचीला पोहोचले ते बेताल वक्तव्याने नाही. अटलजींपासून मोदींपर्यंत वरच्या पातळीवरील कोणीही असभ्य भाषेत वक्तव्ये केलेली नाहीत. त्यामुळे तंगडं उचलण्याची भाषा ही योग्य नाही. भातखळकरांकडून मुंबई, महाराष्ट्राला खूप चांगल्या विचारांची अपेक्षा आहे, अशा उथळ प्रतिक्रियांची नाही. म्हणूनच प्रश्न पडतो की, भातखळकर असे का बोलतात?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: