बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...


महाराष्ट्राचे वाल्मिकी अशी ओळख असलेल्या शब्दप्रभू ग. दि. माडगूळकरांनी रचलेल्या गीत रामायणात भरताला समजवणाºया रामाचे एक गीत आहे. दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या गीतातून राम भरताला सांगतो की, आपल्या कोणाच्याच हातात काही नाही. हे सर्व त्या सर्वशक्तीमान परमेश्वराच्या हातात आहे. तेव्हा कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. आपण सगळे त्या सुपर पॉवरच्या अधिन आहोत. हा सगळा पूर्वसंचिताचा खेळ आहे, पण ही सुपर पॉवर कोणती? किंवा कोणाच्या पराधीन आहोत आपण? त्याचे उत्तर संपूर्ण जगाला सोमवारी सायंकाळी मिळाले.

आज २१वे शतक हे संगणकीय युग म्हणून ओळखले जात आहे. नुसते संगणकीय नाही, तर आंतरजालात म्हणजे इंटरनेटनी जोडले गेले आहे. अतिंद्रिय शक्ती प्राप्त केलेले हे जग आहे. त्यामुळे आपले सगळे व्यवहार, राहणीमान, जीवनशैली ही त्याच्याशी जोडली गेलेली आहे. पूर्वी जे सगळे स्वतंत्र आणि स्वावलंबी होते ते आता पराधीन होताना दिसत आहे. त्यामुळे या संगणक युगातील मनुष्य कोणाचा पराधीन झाला असेल, तर त्या इंटरनेटचा. गुगलची सेवा काही मिनिटे विस्कळीत झाली आणि संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे आपण कसे पराधीन आहोत हे समजले. आज प्रत्येक गोष्ट आपली गुगलच्या आधारावर आहे. सर्वात मोठे सर्च इंजिन आहेच, पण त्याच्या सेवांनी आपण सगळे काही व्यवहार करत आहोत. आज शाळेचे अभ्यास हे आॅनलाइन होत आहेत. आॅनलाइन कोणत्याही कामकाजासाठी, व्यवहारासाठी गुगलशिवाय पर्याय नाही. सर्वात जास्त पत्रव्यवहार हा ई-मेलने होतो. त्यात सर्वात जास्त खाती ही गुगलच्या जीमेलची आहेत. जीमेल बंद पडल्याने सोमवारी सायंकाळी कितीतरी व्यवहार, पत्रव्यवहार, संपर्क बंद झाले. गुगल मीटच्या माध्यमातून मिटिंग घेऊन शाळांमधून अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. विविध वेबिनॉर घेतले जात आहेत. सगळे कार्यक्रम हे आॅनलाइन होत असताना ही यंत्रणा जेव्हा बंद पडते, तेव्हा आपण किती पराधीन आहोत हे लक्षात येते. त्यामुळे भविष्यात जग बंद पाडण्याची ताकद या इंटरनेटमध्ये आहे.


पूर्वीच्या अभ्यासक्रमात एक पाठ होता. हाऊ वेल्थ अक्युम्युलेट अँड मेन डिके. माणसानं प्रगती केली पण तो परावलंबी बनला. अ‍ॅडम स्मिथच्या अर्थशास्त्राच्या सिद्धांतात पूर्वी एक पिन बनवण्याचे काम एकटा माणूस करत होता, पण आज टाचणी बनवण्यासाठी १८ माणसे लागतात. कोणालाच त्याचे पूर्ण ज्ञान नाही, कारण हा श्रमविभागणीचा सिद्धांत होता, तसेच आता इंटरनेट आणि तंत्रज्ञानावर आम्ही अवलंबून झालो आणि पराधीन बनलो. जसे इलेक्ट्रिसिटी किंवा वीज गेल्यावर आमचे सगळे कामकाज बंद होते, कारण वीजेचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी होत गेला. जेव्हा वीज प्रथम आली, तेव्हा ती फक्त उजेड देण्यासाठी होती. घरात प्रत्येक खोलीत एक दिवा किंवा ट्यूब आली की झाले, पण नंतर फॅन, इस्त्री, गीझर, वॉशिंग मशिन, रेडीओ, टीव्ही, आता संगणक या सगळ्यांचे इंधन किंवा ऊर्जा ही वीज झाली. रॉकेल, बॅटरी, अशा अन्य इंधनांचा पर्याय बंद झाला आणि वीजेवर आम्ही अवलंबून राहू लागलो. त्या वीजेमध्ये जग बंद पाडण्याची ताकद आहे, पण वीजेवर आम्ही इन्वर्टर, चार्जिंग बॅटरी असे पर्याय उपलब्ध करून काही काळ काम चालवू शकतो, पण आता सर्वच गोष्टी इंटरनेटवर अवलंबून असल्याने पण पराधीन झालो आहोत. इंटरनेट बंद तर आमचे आर्थिक व्यवहार बंद. गुगल पे, पे टीएम, कार्ड स्वाइप, एटीएम, आॅनलाइन बँकिंग या सगळ्या सेवा बंद. मिटिंग बंद, कामकाज बंद. त्यामुळे आपण त्या एका सुपरपॉवरच्या अधीन आहोत हे नक्की झाले आहे.

म्हणजे काही झाले, तर आपण पूर्वी हे देवा, ओह माय गॉड, या अल्लाह असे काही म्हणत होतो. कारण ती सर्वशक्तीमान शक्ती आहे. त्याच्याच सर्वकाही हातात आहे असे आपण म्हणत होतो, पण आता आपण सगळं काही त्या इंटरनेवर सोडून बसलो आहोत. पराधीन झालो आहोत. आपल्या हातात काहीच राहिलेले नाही हे स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे हे जग पूर्ण बंद पाडण्याची ताकद या सुपरपॉवरमध्ये आहे हे नक्की झाले आहे. म्हणून आता दैवजात दु:ख नाही तर इंटरनेटवर अवलंबून सुख-दु:ख आपल्याला पहायला मिळणार आहेत. दैवाला, नशिबाला, दोष देण्याचे दिवस संपले आहेत. नशिबात आहे काय असा विचार करायचे दिवस संपले आहेत. इंटरनेट डेटा नीट असेल, ब्राउजर सर्च इंजिन सुरू असेल तर तो भाग्यवान. कर लो दुनिया मुठ्ठी मे म्हणत तो आंनदात जगेल. नसेल तर त्याला पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असेच म्हणावे लागेल. पराधीनत्व आपल्याला आंतरजालाचे पत्करावे लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: