शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

दाणापाणी मिळेल तिथे

 कावळे हे एक उदाहरणादाखल, पण त्याठिकाणी कुठलाही पक्षी म्हटले तरी चालेल. सध्या मुंबईत कबुतरे जास्त आहेत. ती अशीच घटकेत झाडावर, घटकेत विजेच्या तारांवर, इमारतीच्या कोपºयात अशी असतात. जिथे धान्य, दाणापाणी मिळेल तिथे थवेच्या थवे करून जातात. पोपट तसेच, चिमण्या तशाच आणि कावळेही तसेच. या झाडावरून त्या झाडावर खायला मिळाले की जात असतात.


हे सांगण्याचे कारण असे की, भाजपचे वीस आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असे काहीसे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे काही आमदार घरवापसी करणार, राष्ट्रवादीत येणार, असेही बोलून दाखवले. राजकारणात हे चालतेच. ज्यांच्यापाशी कसलाही विचार नसतो ते असुरक्षित अनेक पंख असलेले पक्षी या झाडावरून त्या झाडावर जातात. त्याला सुधीरभाऊ मुनगंटीवार लगेच उत्तर देतात की, हिंमत असेल तर भाजपचा आमदार फोडून दाखवा आणि पोटनिवडणुकीत त्यांना विजयी करून दाखवा. धूर आहे तिथे आग आहेच. सुधीर मुनगंटीवार असे उथळ विधान करणार नाहीत. पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणून दाखवा याचा अर्थ काहीजण नक्कीच जाण्याच्या तयारीत असावेत असे दिसते.

आता कोणी कुणाच्या पक्षात जावे, या झाडावरून त्या झाडावर जावे, कुठे किती उडावे, आकाशात किती विहार करावा, जमिनीवर कधी यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण दाणापाणी दिसल्यावर, लालूच दिसल्यावर इकडून तिकडे करणाºयांवर आपण किती विश्वास ठेवायचा आणि त्यांना किती संधी द्यायची हे मात्र मतदारांनी ठरवले पाहिजे. आम्ही जिकडे जाऊ तिकडे आमचा मतदार असेल हे गृहीत धरण्याचे काम जर राजकारणी लोक करत असतील, तर तो मतदारांचा विश्वासघात आहे. मतदारांना किरकोळ समजून त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणूनच या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मतदारांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे. २०१९ ला सातारच्या मतदारांनी ते दाखवून दिले होते. छत्रपती उदयनराजे भोसले हे मे महिन्यात राष्ट्रवादीच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. सहा महिन्यांच्या आत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये गेले. मी जिथे जाईन तिथे माझा मतदार असेल हे त्यांनी गृहीत धरले, पण मतदारांनी तसे केले नाही. कौल हा राष्ट्रवादीला दिला होता. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याला नव्हता दिला. कौल शरद पवारांच्या विचारांना दिला होता आणि तोच विचार आम्हाला सातारा लोकसभा निवडणुकीत टिकवायचा आहे हे मतदारांनी दाखवून दिले. त्यामुळे पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले जेव्हा भाजपच्या तिकिटावर उभे राहिले तेव्हा त्यांचा मतदारांनी दणकून पराभव केला आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना विजयी केले.


तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, नेते आहात, माणसं आहात. पक्षांप्रमाणे या झाडांवरून त्या झाडांवर उडाल आणि फळं संपली की इकडून तिकडे पुन्हा जाल, तर तुमची घरटी उलटवून टाकण्याची ताकद मतदारांमध्ये आहे हा संदेश देण्याची गरज आहे. खेळ राजकारण्यांचा होतो, पण त्रास मतदारांना होतो. त्या सभा, ती गर्दी, त्या टीका हे थांबले पाहिजे. मनात येईल तेव्हा पक्ष सोडला, पोटनिवडणुका लागल्या, मतदारांना गृहीत धरले हे काही परिपक्व लोकशाहीचे लक्षण नाही. परिपक्व लोकशाहीत मतदारराजा आहे. तो देईल तो कौल खरा. त्यामुळे कोणालाही कुठेही उडू दे, मतदार जमिनीवर आहेत तोपर्यंत काही फरक पडणार नाही.

असतील शितं तर जमतील भुतं अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणे सोयीनुसार पक्ष बदलणारे लोकप्रतिनिधी जनतहितार्थ इकडून तिकडे जात नसतात, तर ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जात असतात. आज राष्ट्रवादीमध्ये मेगाभरती आहे, असे सांगितले जाते. गेल्या वर्षी २०१९ ला भाजपच्या केलेल्या मेगाभरतीत हे लोक इकडे गोळा झाले होते. मेगाभरती नाही, तर या भरती, ओहोटीच्या लाटा आहेत. वाळू कोरडीच राहणार आहे. त्या लाटांना कोणी थांबवण्याचा आणि जवळ करण्याचा प्रयत्नच करू नये. विकासासाठी, जनहितासाठी एकच विचार महत्त्वाचा असतो. तुम्ही किती प्रामाणिक आहात, एकनिष्ठ आहात. प्रत्येक खेपेला पक्ष बदलून नव्या निष्ठा दाखवणाºयांवर किती विश्वास ठेवायचा हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे. अशांना तांदळातल्या खड्याप्रमाणे दूर केले पाहिजे, कारण हा जनमताचा अपमान आहे. मतदारांना गृहीत धरून आम्ही त्यांना कसे मूर्ख बनवतो, आमच्याच मागे यायला लावतो हा जो समज राजकारण्यांनी करून घेतला आहे तो खोटा ठरवता आला पाहिजे. मतदार राजा आहे. त्याने राजासारखेच वागले पाहिजे. आपण दिलेल्या कौलाचा अनादर होत असेल, तर आपण आपली फरफट करून घेता कामा नये. मतदान हे पक्षाला, विचाराला झाले पाहिजे. ते व्यक्तीला होता कामा नये. आपली लोकशाही ही व्यक्तिकेंद्रित असता कामा नये, तर ती लोकशाही केंद्रित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपली फरफट करणाºया नेत्यांकडे दुर्लक्ष करून आपला निर्णय ठाम ठेवण्यावर आता मतदारांनी भर दिला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: