पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांच्या जागी कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे. ही मागणी माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजीत पाटील यांनी केली आहे. काही गरज आहे का? एकीकडे आपण घराणेशाही विरोधात बोलायचे आणि आपण तेच करायचे? पार्थ पवार यांचे पुनर्वसन करण्यासाठी ही संधी दिली जावी असे काहीना वाटते, पण पुनर्वसन होण्यासाठी त्यांची कारकीर्द सुरूच झाली होती केव्हा? पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मावळमधून त्यांनी पराभव पत्करला. तेव्हा त्यांचे वय काही फार नव्हते आणि आजही नाही. त्यामुळे कारकीर्द अगदी संपुष्टात आली आहे, म्हणून त्यांचे पुनर्वसन करण्याची कसली भाषा केली जात आहे? पक्षकार्यकर्त्यांनी नेतृत्वाला खूश करण्यासाठी असले सल्ले देणे बंद केले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमरजीत पाटील यांनी तसे पत्र लिहिले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचे नाही, तर विकासाचे राजकारण व्हायला हवे. पंढरपूरमध्ये पार्थ पवार आले, तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी अमरजीत पाटील यांनी केली आहे. पार्थ पवार ज्या पक्षातून आमदार होतील त्याच पक्षातून स्थानिक उमेदवारही आमदार होणार असेल, तर तो मतदारसंघात विकास करू शकणार नाही? हा आपल्याच गावातील नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर दाखवलेला अविश्वास आहे. त्यामुळे पार्थ पवारांना बारामती, मावळमधून पंढरपुरात आणायचा कोणी प्रयत्न करणे हे अत्यंत हास्यास्पद असेच आहे.
आता भालके यांचे कुटुंबीय, राजकीय वारसदार कोणी ना कोणतरी असतीलच. त्यांना डावलून पार्थ पवारांचे नाव पुढे करण्याचे काहीच कारण नाही. पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचे बोलले जात असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पार्थ पवार यांचे पुनर्वसन केले जाणार की, भारत भालके यांच्या मुलाला उमेदवारी मिळणार हे आगामी काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण राष्ट्रवादी काँग्रेसने असले काही प्रकार करू नयेत. या पक्षाला आता मोठे व्हायचे आहे. एका कुटुंबापुरतेच राजकारण करायचे नाही. शरद पवार स्वत: नेते आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत, कन्या सुप्रिया लोकसभेत आहेत. पुतण्या उपमुख्यमंत्री आहे, नातू रोहित पवार आमदार आहे. आता एक आमदारकी घरात नसली, तर काही बिघडत नाही. त्यांच्या घरातच जे सत्तेचे केंद्रीकरण झालेले आहे ते विकेंद्रीत होणे आवश्यक आहे.
पार्थ पवार हे खूप लहान आहेत. त्यांना अशाप्रकारे गोवण्याची काहीच गरज नाही. त्यापेक्षा भारत भालके यांच्या राजकीय विचारांशी जवळ असलेल्या स्थानिक सामान्य नेत्याला संधी दिली तर पक्षाचा मोठेपणा दिसून येईल, पण कार्यकर्त्यांनी अशी मागणी करणे म्हणजे काँग्रेससारखेच झाले म्हणावे लागेल. काँग्रेसच्या विचारांपेक्षा राष्ट्रवादी वेगळा आहे हे कसे म्हणता येईल? आज काँग्रेसला देशाचे नेतृत्व, पक्षाचे नेतृत्व गांधी कुटुंबाव्यतिरीक्त कोणालाही देणे पसंत नाही. त्यामुळे दीड वर्ष स्थिर अध्यक्षाशिवाय तो पक्ष चालला आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीत होणार असेल, तर पंढरपुरातील राष्ट्रवादीचा मतदार पक्षापासून दूर होईल यात शंका नाही. पंढरपुरात १२५ किलोमीटर लांब अंतरावरून नेता आयात करावा लागतो, याचा अर्थच तिथे राष्ट्रवादी शिल्लक नाही, असे म्हणावे लागेल. जे काही होते ते भारत भालके यांचे होते. त्यामुळे पार्थ पवारांना तेथून उमेदवारी देणे म्हणजे राष्ट्रवादीची ती नामुष्की म्हणावी लागेल. म्हणूनच आपल्या ताकदीची झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे.
आज भारतीय जनता पक्ष ताकदवान होत आहे, तो केवळ घराणेशाही मोडून काढल्याने. सगळे उमेदवार, नेते भाजपकडून नवे दिले जातात. काँग्रेस त्याबाबत मागे पडताना दिसते. कारण एका विशिष्ट घरातील व्यक्तींशिवाय तो पक्ष अस्तित्वहीन आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तोच प्रकार होणे हे चांगले नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असे करणार नाहीत, ही अपेक्षा आहे. पक्षवाढीसाठी नव्यांना संधी देणे, नवे नेते, कार्यकर्ते तयार करणे महत्त्वाचे असते. असे असताना आयात केलेले नेतृत्व लादणे हे पक्षासाठी घातक ठरू शकते. त्याला फार काळ अर्थ राहत नाही. त्यातून नाराजी निर्माण होण्याची शक्यता असते. काही लोक एखादी पाचर मारली, मेख मारली आणि स्पर्धेतील कोणाचे नाव पुढे येऊ नये, म्हणून अशी खेळी करतात. पण ते पक्षासाठी घातक असते. ज्या कोणी व्यक्तीने हे पत्र लिहून पार्थ पवारांच्या पुनर्वसनाचा पुळका दाखवला आहे, तो निश्चितच हितावह नाही. पार्थ पवारांनी पंढरपुरात जाण्यापेक्षा मावळातच संपर्क वाढवला पाहिजे. तिथेच मतदारांशी गाठी भेटी घेऊन आपण कसे योग्य उमेदवार आहोत, हे पटवण्यासाठी पुढची दोन-चार वर्ष दिली, तर आगामी काळात ते तिथून लोकसभेवर जाऊ शकतात. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांनी नको ते सल्ले देऊन पक्षाचे अहित करू नये, असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा