विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आणि भाजपची मक्तेदारी असलेले मतदारसंघ आघाडीने खेचून आणले. आघाडीने भाजपला पराभूत केले हे वरकरणी दिसत असले तरी प्रत्यक्षात कौन जिता, कौन हारा हा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे. कारण निकालानंतरची नेत्यांची वक्तव्ये, निवडणुकीपूर्वीची नेत्यांची वक्तव्ये पाहता नक्की कोण कुणाला पराभूत करायला टपला होता हेच समजत नाही. म्हणजे ही खरोखरच भाजपची हार आहे का काही राजकारण आहे, असा प्रश्न यातून पडतो. म्हणजे एक काळ असा होता की, काँग्रेसला कोणी हरवू शकत नव्हते. तेव्हा काँग्रेसचे लोक म्हणायचे काँग्रेसला कोणी पराभूत करू शकत असेल, तर ती काँग्रेसच करू शकते. म्हणजे बंडखोरी, गटतटांचे राजकारण यातून काँग्रेस नेते आपल्याच पक्षातील नेत्यांना पराभूत करण्यात माहिर होते. आजकाल तीच परिस्थिती भाजपमध्ये थोड्या फार फरकाने पहायला मिळते आहे. म्हणजे शोलेमध्ये गब्बर म्हणतो, गब्बर को खुद गब्बरही मार सकता है, तसंच आज भाजपचं झालेले दिसते. म्हणजे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अशी दिग्गज पदे भोगणारे देवेंद्र फडणवीस भाजपचा चेहरा आहे की विद्यमान प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील हा भाजपचा चेहरा आहे? या दोघांच्या सुप्त संघर्षात नागपूर आणि पुणे येथील मक्तेदारी असलेल्या जागा भाजपने गमावल्या आहेत की काय अशीच शंका येते. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला, तर पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला. नागपूर पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाले, तर पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी झाले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक विजयी झाले.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांनी पहिल्यांदाच एकत्र येत ही निवडणूक लढवली. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. आता महाविकास आघाडीची बहुतेक जागांवर सरशी झालेली दिसत असली, तरी कौन जिता कौन हारा हा प्रश्न अनुत्तरित आहे. याचे कारण जिथे भाजप सहज पराभूत होऊ शकला असता ती जागा मोठ्या फरकाने भाजपने जिंकली आहे. महाविकास आघाडीची मते त्यांनी फोडली आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही. म्हणजे, महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवली, तर भाजपला टक्कर देणं शक्य आहे, हा या निकालाचा अर्थ आहे. कारण, हे तीन पक्षांचं सरकार पायात पाय घालून पडणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते. त्यांचा हा युक्तिवाद आता निकाली निघाला आहे. दुसरं म्हणजे पदवीधर मतदार म्हणजे ज्यांना डोकं आहे, ते मतदार आपल्या हक्काचे आहेत, असा भाजपचा समज होता. तोसुद्धा या निकालामुळे मोडित निघाला आहे. महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत राजकारण करत आहे, असंही मतदारांना वाटल्याचं या निकालातून दिसून येत आहे.
भाजप ज्या गांभीर्यानं ही निवडणूक लढत होता, त्याच गांभीर्यानं महाविकास आघाडीनं ही निवडणूक लढवली. राजकीय नेते, मंत्र्यांचे दौरे काढण्यात आले आणि त्यात त्यांना यश आले आहे. या निवडणुकीमुळे पदवीधर मतदारांचा भाजपविरोधात असलेला असंतोष दिसून आला आहे. भाजप महाविकास आघाडी सरकार पडेल या अपेक्षेनं वर्षभरापासून काम करत आला आहे, विरोधी पक्ष म्हणून काम करताना दिसत नाही, त्याचाच प्रत्यय या निकालातून दिसून आला आहे. हे सगळं खरं असलं तरी भाजपच्याच अंतर्गत अहमहमिकेचा फटका भाजपला बसला आहे हे पण लक्षात घ्यावे लागेल.
आता नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. हा मतदारसंघ तयार झाल्यापासून इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार याठिकाणी निवडून आला नाही. गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या मतदारसंघातून भाजपचेच उमेदवार निवडून जायचे. यावेळी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. अॅड. अभिजीत वंजारी यांच्यासमोर संदीप जोशी यांचा टिकाव लागू शकला नाही. हे कसे काय झाले? यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येत भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे, पण कदाचित नागपूरमध्ये चंद्रकांतदादांनी फडणवीस यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी काही गडबड केली का, अशी शंका येण्यासही वाव आहे. अर्थात पूर्वी काँग्रेस या निवडणुकीकडे फारसं लक्ष द्यायची नाही. आपला उमेदवार विजयी होत नाही म्हणून त्यांनी अपेक्षा सोडलेली होती. एकदा तर गडकरी या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते, मात्र यंदाची निवडणूक काँग्रेसने गंभीरपणे घेतल्याचं दिसून आलं. वंजारी हे मतदारसंघात गेली तीन-चार वर्षे कार्यरत होते. भाजपने पारंपारिक पद्धतीने विजय गृहीत धरून निवडणूक लढवली. हे गृहीत धरणं महाग पडलं. प्रदेशाध्यक्षांनी त्याबाबत काळजी घेतली नाही असे दिसते.
तोच प्रकार पुण्यात पहायला मिळाला. यावेळेस पुण्याव्यतिरिक्त सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतून पदवीधर मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली. सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगली भागात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांचं काम केलं. या निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकत्र काम केलं, एकमेकांच्या पायात पाय घातले नाही. खरं तर ही निवडणूक एकत्र लढून दाखवायची संधी या तिन्ही पक्षांकडे होती. ती या पक्षांनी आजमावून पाहिली आणि त्यात यश आलं, पण भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गुहेत त्यांना पराभूत करण्याचा प्रकार इथे घडला. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही हा फार मोठा झटका आहे. हा विरोधकांच्या एकजुटीने आला, मतदारांनी दिला की या दोघांनीच परस्परांना दिला, हा संशोधनाचा विषय ठरेल.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक असल्याचं सांगितलं जात आहे. इथं भाजपचा उमेदवार शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना टक्कर देईल असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी थेट शिक्षक मतदारांसोबत संपर्क ठेवला. विनाअनुदानित शाळांचा प्रश्न गंभीर बनला असताना शिक्षकांपर्यंत ते पोहोचले. याचा त्यांना फायदा झाला, तर औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण यांचं व्यक्तिगत नेटवर्क जबरदस्त आहे. त्यांनी पुन्हा एकदा तिथं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे, पण हा भाजपला दणकाच आहे.
हे सगळं होत असताना धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांना ३३२, तर उमेदवार अभिजीत पाटील यांना ९८ मतं मिळाली. तीन पक्ष एकत्र येऊ नही पटेल यांनी मतं खेचून आणली. हे इथे घडते मग पुणे आणि नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले असताना, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे बालेकिल्ले असताना इथं परिवर्तन कसं झालं? त्यामुळे कौन जिता, कौन हारा हा प्रश्न पडतो. नक्की कोणी कोणाला हरवले, असा प्रश्न यामुळेच निर्माण होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा