शुक्रवारचा दिवस हा माध्यमांना प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीने चर्चेला मिळाला. लगेच राजकीय समीकरणे बदलणार, मोदींच्या विरोधात शरद पवारांचा चेहरा समोर येणार वगैरे चर्चा सुरू झाल्या; पण या विषयात काहीही अर्थ नाही. प्रशांत किशोर हे जेमतेम ४४ वर्षांचे १९७७ला जन्म झालेले व्यक्तिमत्व, तर त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेले व्यक्तिमत्व होते. सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळ्या पक्षांना कोळून प्यायलेले शरद पवार हे प्रशांत किशोर यांच्या रणनीतीप्रमाणे काम करतील आणि पंतप्रधान होतील हे समीकरणच हास्यास्पद आहे.
पंतप्रधान होण्यासाठी किमान एखादे राज्य आपल्या हातात असावे लागते. आज तिसरी आघाडी करायची झाली, तर त्याचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जी पूर्ण बहुमतासाठी आघाडीवर आहेत. त्यांना बरोबर घेतल्याशिवाय तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेसकडे राजस्थान, पंजाब अशी काही राज्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू शकते; पण शरद पवार यांच्याकडे जेमतेम एक तृतीयांश सत्ता आहे, खासदार-आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसताना ते हे स्वप्न कसे काय बघू शकतील? स्वप्न पाहणे चूक नाही; पण ते शक्य होण्याची शक्यता काही टक्के तरी असली पाहिजे. अशी तिसरी आघाडी ज्या पक्षांच्या जिवावर केली जाईल त्यात बाकीच्या पक्षांच्या हातात काही ना काही आहे. किंवा काहीच नाही, असेही आहे. त्यामुळे तिसरी आघाडी करताना लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, चंद्राबाबू नायडू अशा लोकांना बरोबर घेणार की, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, असे सत्तेत असलेले पक्ष बरोबर घेणार? हे कदापि शक्य नाही. मोदींना पर्याय निर्माण केला पाहिजे; पण तो सक्षम असला पाहिजे. त्यासाठी एक मजबूत सत्ता शरद पवारांच्या हातात असली पाहिजे. एखादा तरी मुख्यमंत्री असणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी मागणी करणार का? दीड दीड वर्ष तीन पक्षांना संधी देण्याची मागणी करणार का? अशा परिस्थितीत शिवसेना बरोबर राहील का? असे अनेक प्रश्न आहेत.
प्रशांत किशोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रोडक्ट आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २०११ला प्रशांत किशोर यांना जवळ केले. २०११पासून त्यांनी गुजरातच्या विधानसभा निवडणुका जिंकण्यापासून भविष्यात भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आणायची रणनीती आखली. ती यशस्वी झाली. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी तृणमूल काँग्रेसचे नियोजन केले; पण ते ठामपणे तृणमूलसाठी केले की, भाजपसाठी केले हे सांगता येणार नाही. ममता बॅनर्जी जर पश्चिम बंगालची निवडणूक हारल्या असत्या आणि तिथे सत्तांतर झाले असते, तर त्यांचे उपद्रवमूल्य वाढले असते. त्यांनी तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला असता. ती मोदींची भाजपची डोकेदुखी झाली असती. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या नियोजनाप्रमाणे प. बंगालची सत्ता तृणमूलच्या हातून भाजप खेचून घेणार, अशी हवा केली गेली होती. हवा करण्यात भाजप किती माहिर आहे हे सांगायची गरज नाही. २०० जागा जिंकणार याची हमी देत सगळे मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले आणि फक्त ममतांना टार्गेट केले. जेव्हा एखाद्या नेत्याला टार्गेट केले जाते, तेव्हा मतदार त्याच्या बाजूने उभा राहतो. काँग्रेसने २००२ पासून गुजरातमध्ये खालच्या पातळीवर उतरून मोदींना टार्गेट केले, त्याचा परिणाम मोदींचे प्रस्थ वाढले. तोच प्रकार ममतांच्या बाबतीत घडला आहे. भाजप आणि प्रशांत किशोर यांनी ममतांना बंगालची सत्ता मिळेल याचेच नियोजन केले होते. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळानंतर मोदींनी गुजरातबरोबरच प. बंगालला पॅकेज घोषित केले. महाराष्ट्राच्या नेत्यांनी ते मागितले नाही केंद्राने ते दिले नाही. हे तारतम्य नसलेले नेते आघाडीचे शिल्पकार कसे होतील? तौक्ते वादळानंतर शरद पवारांनी पॅकेजजी मागणी केली असती, तर घटक पक्षात ते वरचढ ठरले असते, त्यांच्या मागणीने मोदींनी ते दिले याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असता. हे काहीच केले नाही. त्यामुळे प्रशांत किशोर हे शरद पवारांना भेटले, म्हणजे तिसरी आघाडी झाली आणि मोदींना शह देण्यासाठी पवार सज्ज झाले, म्हणणे अतिशय पोरकटपणाचे ठरेल. शरद पवार कोणाचे ऐकण्यातले नेते नाहीतच. त्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. ते आपला पक्ष मोठा करण्यापेक्षा बाकीचे पक्ष छोटे कसे करता येतील याचा विचार करणारे आहेत. त्यामुळे अगोदर शिवसेना आणि काँग्रेसची राज्यातील ताकद कमी करायची आणि राष्ट्रवादीला मोठे करायचे हे त्यांचे धोरण आहे. प्रशांत किशोर भेटले म्हणजे काही चमत्कार होईल आणि त्यांच्याकडे काही जादूची कांडी आहे, असे बिल्कुल समजण्याची गरज नाही.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचेच सरकार येईल, असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले होते. याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये जर भाजपला १००पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर मी राजकीय रणनीतीकार म्हणून संन्यास घेईन, असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले होते. प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर आता भाजपात आलेले तृणमूलचे आमदार पुन्हा परत जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी एक मोठा गट भाजपाचा तृणमूलमध्ये गेला तर तृणमूलच्या त्या पाशवी बहुमताचे काय होईल? ही चिंता ममता बॅनर्जींना देण्याचे धोरणही प्रशांत किशोर यांचे आहे. हे न समजण्याइतके शरद पवार कच्चे आहेत का? शरद पवारांचा वापर करण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर करतील, तोही भाजपला फायदेशीर होईल, अशा प्रकारे केला जाईल हे पवार जाणून आहेत. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की, पवार सगळ्यांचा वापर करून घेतात. ते स्वत:चा वापर करून देत नाहीत. पवार आणि वापर यात हाच फरक आहे. पहिली दोन अक्षरे फक्त पुढे मागे होतात. म्हणूनच ते कोणतेही समीकरण संतुलित करू शकतात. त्यांना प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याची गरज नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा