रविवार, २७ जून, २०२१

जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार


संपूर्ण देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणाखाली येत असतानाच आता तिसºया लाटेची चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबत राहुल गांधी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात एक श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करून त्यामध्ये तिसºया लाटेबाबत सरकारने सावध राहावे, असा इशारा दिला आहे. करोना विषाणूची झपाट्याने बदलण्याची आणि औषधांना प्रतिकार करण्याची वाढती क्षमता लक्षात घेऊन सरकारने तिसºया लाटेसाठी स्वत:ला सुसज्ज आणि सक्षम करावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी या श्‍वेतपत्रिकेत केली आहे. त्यामुळे खरोखरच तिसरी लाट येणार आहे की, केवळ राजकारण करून जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे हे न कळणारे आहे.


गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि काही वेळा राजकीय पक्षांचे नेतेही तिसºया लाटेसाठी सर्वांनी तयार राहावे, अशा प्रकारची विधाने करत आहेत. तर काही जण तिसरी लाट येणारच नाही, असा दावा करत आहेत. ही परस्परविरोधी वक्तव्ये करून सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था का निर्माण केली जात आहे. तिसºया लाटेची भीती घालून सामान्य माणसांचे आयुष्य ठप्प का करून ठेवले आहे? कोरोनाच्या लाटा या राजकीय कारणांसाठी आणल्या जात आहेत का? आपली निष्क्रियता झाकण्यासाठी राजकीय पक्ष, सरकार हा भीतीचा बागुलबुवा उभा करत आहेत का?

राहुल गांधी यांनी जी पक्षाच्या वतीने श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे, त्यामागे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे का हे पहावे लागेल. त्यांनी ही श्वेतपत्रिका कशी काय काढली? काँग्रेसच्या मते संपूर्ण अभ्यास करून ही श्‍वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. दुसºया लाटेच्या कालावधीमध्ये देशात मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने तिसरी लाट येणार असेल, तर सरकारने बळींची संख्या नियंत्रणात राहील यासाठी काळजी घ्यावी. यासाठीच या श्‍वेतपत्रिकेत काही गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा निवडणुकीचा एक प्रकार आहे का? आगामी काळात उत्तर प्रदेशातील निवडणुका आहेत. लोकसभेच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी केलेली ही प्रचारयंत्रणा आहे का याचाही तपास करावा लागेल. म्हणजे कोरोनाचे, त्याच्या लाटांचे राजकारण करून एखादी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे का?


खरं तर गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये देशात आलेल्या या दोन लाटा अनेकांना उध्वस्व करून गेल्या आहेत. आता प्रत्येकाला सावरायचे वेध लागले असताना, जर अशाप्रकारे बागुलबुवा उभा केला जात असेल, तर त्यांना आवर घातला पाहिजे. ही श्वेतपत्रिका म्हणजे काही तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्यांच्या सूचना घेऊन हा दस्तावेज तयार करण्यात आल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. असे असेल, तर तो सरकारपर्यंत पोहोचवून, सरकारशी चर्चा करण्याची गरज असताना त्याची एवढी प्रसिद्धी कशासाठी केली जात आहे? प्रत्येक गोष्टीचा वापर श्रेयवादासाठी करण्याची गरज नसते. आमच्या प्रयत्नाने, आमच्या पुढाकाराने, आमच्या पाठपुराव्याने तमुक एक झाले, असला गावठी प्रचार आता काँग्रेसने थांबवला पाहिजे आणि कोरोनाचे राजकारण थांबवले पाहिजे. आगामी काळात निवडणुकीतील अस्त्र म्हणून कोरोनाचा वापर होणार असला, तरी त्याचा इतका अतिरेक नको की, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार होईल.

वास्तविक मोदी सरकारने कोरोनाच्या काळात हाताळलेल्या परिस्थितीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालेले आहे. परंतु ते न बघवल्याने काँग्रेसने शेतकºयांना फितवून दिल्लीत सात महिने झाले आंदोलन उभे केले आहे. अशा गर्दीमुळे रोगाचा प्रसार होत नाही का? काँग्रेसचे मेळावे, शक्तिप्रदर्शने यातून होणारी गर्दी जर कोरोनाचा प्रसार करत नसेल, तर सर्वसामान्यांच्या घरातील लग्न कार्य, मयताचे कार्य, समारंभ, उत्सव हे कसे काय सुपर स्प्रेडर ठरतात? तिसरी लाट हे राजकारणाचे अस्त्र बनताना दिसत आहे. सगळे मोदी विरोधी पक्ष हे प्रकार करत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाला नियम मोडून हजारोंचा जनसमुदाय जमा केला होता. हे सुपरस्प्रेडर ठरत नाहीत; पण नोकरीला जाणारा सामान्य माणूस लोकलने गेला तर तो सुपरस्प्रेडर ठरतो. शाळा-कॉलेजात गेल्याने विद्यार्थी सुपरस्प्रेडर ठरतो. हे जे सोयीचे राजकारण करून सामान्यांना वेठीला धरण्याचे राजकारण चालले आहे ते अत्यंत घातक असे आहे. श्वेतपत्रिका काढणे म्हणजे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा जाहीरनामा बाहेर काढण्याचाच प्रकार आहे. आमच्या मुलांच्या लसी परदेशात का पाठवल्या, अशी बॅनरबाजी केल्यानंतर आणि त्याचा फज्जा उडाल्यानंतर आता श्वेतपत्रिका काढली जात आहे. काँग्रेसला या परिस्थितीचा अभ्यास करायचा असेल तर करू दे. आकडेवारी गोळा करून त्यावर काही चांगले केले असेल, तर करू दे; पण त्याचे राजकारण करू नका. राजकारणासाठी अन्य विषय आहेत. अगदीच नाही काही मिळाले, तर राहुल गांधी पुन्हा जीएसटी, राफेलची विमाने उडवू शकतील; पण कोरोनाचा वापर जर राजकारणासाठी केला जात असेल आणि तिसºया लाटेची भीती घातली जात असेल, तर ते चुकीचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: