रविवार, १३ जून, २०२१

संघ दक्ष


भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी मोदींचा चेहरा वापरायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. आज भाजप म्हणजे मोदी हे झालेले समीकरण मोडून काढणे आवश्यक होतेच. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ज्या पक्षाची मातृसंस्था आहे त्या पक्षात व्यक्तिस्तोम कधी माजवले जात नाही. संघ आणि भाजप हा विचारावर चालतो, व्यक्तीवर नाही. म्हणूनच मोदी हा भाजपचा चेहरा नाही हे दाखवण्यासाठी भाजपने आणि संघाने घेतलेला पुढाकार ही फार महत्त्वाची बाब आहे, म्हणूनच संघ दक्ष आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.


खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपत्ती काळात मदतीसाठी पुढे सरसावतो, हे अनेक वेळा दिसले आहे. एका अर्थाने संघ सदैव दक्षच असतो, म्हणून आपत्तीच्या अचूक आकलनाची आणि ती निवारण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची क्षमता तो दाखवू शकतो. मोरवी धरण असो, उत्तराखंडमधील जलप्रलय असो वा मुंबईतील २६ जुलै २00५ चा जलप्रलय, गुजरातमधील भूकंप असो वा कोणतेही संकट सर्वात मदतीला धावून जातो तो संघ. कारण राष्ट्रीय आपत्तीची जाण असलेला संघ नेहमीच सर्वत्र धावून जातो. विरोधकांना फक्त त्यांची चड्डी आणि शरद पवारांना त्या चड्डीतल्या मांड्या दिसतात, पण कामाचे हात दिसत नाहीत, पण असा हा मदतीला, संकटाला धावून जाणारा संघ भाजपवर संकट येऊ नये म्हणून आता दक्ष झालेला दिसून येतो. खरं तर गेल्या सात वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, पण सरकार संघाच्या रिमोटवर चालते, असे चित्र निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली, मात्र देशातील सध्याच्या संकटातून भविष्यात उभ्या राहणाºया मोठ्या आपत्तीचेही संघाला नेमके आकलन झाले आणि तो लगेच सक्रिय झाला आहे.

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी रविवारी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांच्यासमवेत एक बैठक केल्याचे सांगितले जाते. यावेळी उत्तर प्रदेश भाजपचे महामंत्री सुनील बन्सलही उपस्थित होते. कोरोना स्थितीमुळे देशात आणि विशेषत: उत्तर प्रदेशात सरकारविषयी निर्माण झालेल्या नाराजीवर खल होणे अपेक्षित होते. कोरोनाच्या दुसºया लाटेला सामोरे जाताना केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला प्रशासकीय; विशेषत: निर्णय व नेतृत्व क्षमतेच्या पातळीवर आलेले अपयश, त्यांचे भविष्यात होणारे परिणाम यांमुळे अस्वस्थ झालेल्या संघाने डॅमेज कंट्रोलसाठी हा पुढाकार घेतला. त्यातूनच पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाºया निवडणुकांच्या दृष्टीने मोदी आणि योगी यांची प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी संघ व भाजपची यंत्रणा काही दिवसांत कामाला लागलेली दिसू शकते. दक्ष असलेला संघ सक्रिय झाला की, भाजपच्या आपत्तीचे निवारण होते, तो आणखी उभारी घेतो, हे याआधीही दिसले आहे. त्यामुळे भाजप आज काहीसा संकटात असला, तरी येणाºया काळात संघशक्तीमुळे तो पुढे सरसावल्यास आश्चर्य वाटायला नको, पण त्याप्रमाणे संघाने भाजपसोबत बैठक घेतली आणि आगामी काळात विधानसभांच्या निवडणुकीसाठी मोदी चेहरा वापरायचा नाही असे ठरवले गेले. यातून मोदींचा थोडा अहंपणा कमी होईलच, अमित शाह यांनाही जरब बसेल, पण आमच्याकडे व्यक्तिस्तोम चालत नाही, नेतृत्वाची, चेहºयांची लांबच्या लांब रांग आहे हे नकळतपणे काँग्रेसला दाखवताही येते आहे. दोन वर्ष झाली काँग्रेस असुनी नाथ मी अनाथ अशा अवस्थेत आहे, अध्यक्षपद त्यांना कोणाला देता आलेले नाही, अध्यक्षाची निवड करता येत नाही, गांधी नावाशिवाय त्यांना अध्यक्ष चालत नाही, याला हे संघ आणि भाजपकडून सडेतोड उत्तरच आहे. त्याहीदृष्टीने संघाने घेतलेली दक्षता महत्त्वाची आहे.


यात आणखी एक गोची आहे. मोदींचा राष्ट्रीय चेहरा जरी मजबूत असला, तरी तो प्रादेशिक पातळीवर पंतप्रधानपदाची आणि मोदींची प्रतिमा मलिन करणारा ठरतो असा विचार संघपरिवारात होतो आहे. प्रादेशिक पक्षांच्या विरोधात प्रचारासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात तेव्हा ते छोटे छोटे पक्षही मोदींवर टीका करतात. त्याचप्रमाणे जिथे जिथे मोदी प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून गेले आहेत तिथे भाजपचे संख्याबळ वाढले आहे, पण सत्तेपर्यंत त्यांना जाता आलेले नाही. गेल्या सात वर्षांत गुजरातमधील भाजपचे संख्याबळ कमी झालेले होते. मध्य प्रदेश, राजस्थानातील सत्ता गेली होती. मध्य प्रदेशात पुन्हा आॅपरेशन लोटस केले गेले आणि सत्ता मिळवली, पण पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक करूनही, २00 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करूनही भाजपला सत्तेपर्यंत जाणे शक्य झाले नाही, नामुष्की ओढवली आणि त्यात मोदींची प्रतिमा आणखी खराब झाली. त्यामुळे हा चेहरा आता विधानसभा निवडणुकीत वापरायचा नाही हे ठरवण्यासाठी संघाने पुढाकार घेतला ही महत्त्वाची बाब आहे.

संघ नेहमीच दक्ष असतो. व्यक्तिस्तोम माजवायचे नाही हे त्यांचे ध्येय असल्याने आता मोदींचा चेहरा निवडणुकीतील प्रचाराचे साधन म्हणून वापरायचा नाही हा घेतलेला निर्णय अत्यंत धाडसी, कौतुकास्पद आहे असेच म्हणावे लागेल. मोदींची लाट आहे असे भासवण्याचा प्रयत्न होत असला, तरी नुसता भाजप म्हणून कोणते राज्य किती प्रमाणात भाजपला स्वीकारते हे पाहणेही आवश्यक आहेच. मोदींची ताकद वजा भाजप काय आहे हे समजणेही फार महत्त्वाचे आहे. त्याचे उत्तर अजून सहा महिन्यांनी उत्तर प्रदेशात दिसून येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: