अग्रलेख
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या वेळी शरद पवारांनी शिवसेनेचे केलेले कौतुक म्हणजे पवारांच्या मनातील असुरक्षितता व्यक्त होताना दिसली. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो असं कोणाला पटलं नसतं, असं म्हटलं आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून, पुढील पाच वर्ष हे सरकार टिकेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. पण राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांच्यावरच जास्त कौतुकाचा वर्षाव केला. शिवसेना आपल्याला सोडून जाईल या सुप्त भीतीने त्यांचा भावनिक नाते जोडण्याचा हा प्रयत्न होता, पण त्याचबरोबर शिवसेनेला बरोबर ठेवून शिवसेनेचे महत्त्व राज्यातून कमी करण्याचीही ती चाल होती.
पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ पवार राजकारणात आहेत, पण त्यांची स्वबळावर सत्ता आणण्याची ताकद अजून महाराष्ट्रातही सिद्ध झालेली नाही. ४0 ते ६९ इथपर्यंत त्यांचे मर्यादित संख्याबळ कायम राहिलेले आहे. त्यामुळे देशाचा नेता होता येणार नाही, पण राज्याचा नेता तरी होण्याची ताकद आपल्यात आहे का, याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळेच स्वबळाचा इशारा काँग्रेसने कितीही दिला तरी शरद पवारांना कोणीतरी जोडीदार लागणारच. काँग्रेसने सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार, असा इशारा दिलेला आहे. समजा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे ठरले तरी त्यांची आघाडी फुटण्याचे एकमेव कारण शिवसेना ठरू शकते. याचे कारण शरद पवार जर या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवायचे म्हणतील तर जागा वाटपाचा प्रश्न असणार आहे. तीन मोठे पक्ष आणि काही छोटे पक्ष यामध्ये समाजवादी, शेकाप अशी ही आघाडी आहे. त्यामुळे जागावाटप करताना सर्वात जास्त जागा शिवसेनेला द्यायचे म्हटले तरी शिवसेनेच्या पदरात ९0 पेक्षा जागा पडणार नाहीत. भाजपपासून दूर जाताना जागावाटप हाच मुद्दा होता. भाजपबरोबर १४४ जागा त्यांना हव्या होत्या. ती शिवसेना ९0 ते १00 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर कशी राहील? राष्ट्रवादी आपल्या पन्नास जागा सुरक्षित ठेवून अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करेल, पण शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याचा तो सुप्त प्रयत्न असणारच आहे. शरद पवार कधी कोणाला डोईजड होऊ देतात का? त्यामुळेच राष्ट्रवादीच्या भविष्यातील रणनीतीत शिवसेनेची ताकद मर्यादित राखणे हे धोरण असल्यामुळे त्यांनी शिवसेनेचे कौतुक करण्याचा प्रयत्न केला आहे हे नक्की.
१९८0 च्या निवडणुका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी लढल्या नव्हत्या. असे सांगून शरद पवारांनी बाळासाहेबांचे कौतुक केले, पण हे सर्व खोटे विचार होते. एकतर त्यावेळी शिवसेना फारशी मोठी झालेली नव्हती. दुसरी गोष्ट शरद पवार तेव्हा समाजवादी काँग्रेसचे पुलोदचे जनता पक्षाच्या सरकारच्या पाठिंब्यावर झालेले नेते होते. तिसरी गोष्ट जनता पक्षाचे पंतप्रधान हे मोरारजीभाई देसाई होते. ज्या मोरारजीभार्इंनी मुंबईवर अन्याय करण्याचा, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, १0५ हुतात्म्यांना जे जबाबदार आहेत त्या मोरारजीभाई देसाई यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधीच मैदानात उतरणार नाहीत. त्यामुळे त्यानी काँग्रेसला पाठिंबा दिला असला तर त्यात चुकीचे काय? पण ही कथा आपल्या सोयीने सांगून शरद पवारांनी अर्धसत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो शिवसेनेची ताकद आणि महत्त्व कमी करण्याचा प्रकार आहे. त्यातून चारच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली होती. दीड तासाच्या या भेटीत अर्धा तास मोदी-ठाकरे स्वतंत्रपणे गुप्तपणे बोलले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्या चर्चेपासून लांब ठेवले गेले. भाजपबरोबर अशी गुप्त बैठक झाल्यावर काही गडबड नाही ना, याची चाचपणी शरद पवारांनी केली आणि शिवसेनेला गोंजारण्याशिवाय पर्याय नाही हे ताडले. यातून त्यांनी अगदी शिवभोजन थाळीचे कौतुक केले, शिवसेनेचे कौतुक केले, पण ही त्यांची गरज म्हणून केलेले प्रेम आहे. यात शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा हेतू स्पष्ट आहे हे नाकारता येणार नाही.
आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं. शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो असं कोणाला पटलं नसतं, पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे, असं कौतुक शरद पवारांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली, असं सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या. असं सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिलं. शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही, पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही, असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा, पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेने ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली, तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा इंदिरा गांधींबरोबर, इंदिरा काँग्रेसबरोबर होते, शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसबरोबर नव्हते, शरद पवारांना विरोध करण्यासाठी ते इंदिरा गांधींबरोबर होते. त्याचा हिशोब पवार आत्ता करणार आहेत का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा