मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अशी ख्याती असलेला अभिनेता म्हणजे अशोक सराफ. पन्नास वर्षं या चित्रपटसृष्टीत सतत कार्यरत राहून अशोक सराफ यांनी आपले स्थान कायम अढळ ठेवले. नायक म्हणून त्याची कारकीर्द जेवढी गाजली, विनोदी अभिनेता म्हणून त्याला रसिकांनी जेवढी दाद दिली, तेवढाच खलनायक अशोक सराफ हा चेहराही त्यांनी चांगल्या प्रकारे रंगवला. प्रेक्षकांच्या कायम लक्षात येईल असा खलनायक अशोक सराफ यांनी रंगवला. म्हणूनच आज ४ जून या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांच्या मनातील नायक असलेल्या या अभिनेत्याच्या खलनायकी भूमिकांवर नजर मारायलाच हवी.
नकारात्मक, खलनायकी भूमिका नायक झाल्यावर कोणी करायला तयार होत नाहीत, पण हे धाडस मराठी अभिनेते मात्र बिनधास्त करतात. कारण आपल्याला सर्व प्रकारच्या भूमिका करता आल्या पाहिजेत हे मराठी नायकांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच अरुण सरनाईक, श्रीराम लागू, कुलदीप पवार, अशोक सराफ, महेश कोठारे, किशोर जाधव या कलाकारांनी नायक आणि खलनायक रंगवताना मागेपुढे पाहिले नाही, पण अशोक सराफ यांनी साकारलेला खलनायक हा नेहमीच लक्षात राहील असाच होता.
अशोक सराफ यांना पहिल्यांदा खलनायक साकारायची संधी मिळाली ती दादा कोंडके यांच्या ‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटात. त्यापूर्वी ‘पांडू हवालदार’मध्ये त्याने विनोदी भूमिका केली होती. ती इतकी उत्कृष्ट झाली होती की, दादांच्या विनोदापेक्षा त्यांना अनेकवेळा दाद मिळाली होती. त्यामुळे विनोदाचे टायमिंग आपल्याला साधायचे असेल तर अशोक सराफला खलनायक केले पाहिजे असा विचार दादांनी केला आणि ‘तुमचं आमचं जमलं’मध्ये अशोक सराफ खलनायक म्हणून दादांच्या भावाच्या भूमिकेत आले. त्यात इस्टेट लुबाडण्यापासून, दादांना घरातून बाहेर काढण्यापर्यंत आणि चोरीचा आळ घालून पोलिसांनी दादांना पकडेपर्यंत अनेक कारनामे अशोक सराफ यांनी या चित्रपटात केले. यात अशोक सराफ यांचा अभिनय इतका बिलंदर की चेहºयावर कुठेही हास्याची रेषा उमटत नाही. त्यामुळे पहिलाच खलनायक यशस्वी झाल्यानंतर तशाप्रकारच्या भूमिकांची रांग लागणे स्वाभाविक होते, पण कोणत्याही विशिष्ट भूमिकेत अडकायचे नाही असे या अभिनय सम्राटाने ठरवले, तरी विनोदी अशोक सराफ हा शिक्का कायम राहिला. म्हणून त्यांच्यातील खलनायक शोधणे आज गरजेचे आहे.
‘देवघर’ हा एक सर्वांगसुंदर चित्रपट होता. रंजना, रवींद्र महाजनी या जोडीचा हा चित्रपट. यात अशोक सराफ यांनी रंजनाच्या मामाची भूमिका केलेली आहे. हा मामा रंजनाची आई पद्मा चव्हाणचा भाऊ असतो. दोघांची मिळून कारस्थाने हा अविभाज्य भाग या चित्रपटात होता. त्यात अशोक सराफ यांनी जी लकब घेतली होती ती लक्षात राहण्यासारखी होती. ती म्हणजे हातात सतत काडीपेटी असते. कोणतेही वाईट काम केले, कारस्थान केले की, काडी पेटवायची आणि टाकायची. त्या स्टाईलवरून काड्या टाकणे म्हणजे काय या वाक्प्रचाराचा अर्थ अगदी सार्थ व्हावा असा तो अभिनय होता. या चित्रपटातून अशोक सराफ यांचा नाविन्यपूर्ण खलनायक समोर आला होता.
‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील अशोक सराफ यांचा खलनायक तर लक्षात राहणारा आणि प्रेक्षकांना चीड आणणारा असाच होता. जमीनदार सावकार असलेल्या अशोक सराफची नजर रंजनावर असते. रंजना आणि कुलदीप पवार हे या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत आहेत, पण संपूर्ण चित्रपट हा रंजना आणि अशोक सराफ यांच्यातील संघर्षात. जमीन हडप करण्यापर्यंत अनेक सावकारी अत्याचार रंजना आणि कुलदीप पवारवर अशोक सराफ करताना दाखवले आहेत. हा चित्रपट पाहताना ग्रामीण भागातील महिला अशोक सराफच्या नावानं बोटं मोडून शिव्या घालायच्या. इतका तो लक्षात राहणारा त्या काळातला अभिनय होता.
‘वाट पाहते पुनवेची’ हा पुनर्जन्मावर आधारित चित्रपट. यात आधीच्या जन्मात अलका कुबलचा छळ करून तिला मारणाºया अशोक सराफचा बदला घेण्यासाठी दुसºया जन्मात निशिगंधा वाड झालेल्या एका महिलेची आणि पोलीस तपासाची ही कथा. १९९२ साली आलेल्या या चित्रपटात खूप वर्षांनी अशोक सराफ यांची वेगळी आणि खलनायकी भूमिका होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी हिट ठरत असताना इमेजतोड भूमिका करण्यासाठी केलेला हा चित्रपट होता.
त्याअगोदर ‘अनपेक्षित’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात अशोक सराफचा खलनायक हा सस्पेन्स असलेला चित्रपट होता. अर्चना जोगळेकर आणि नितीश भारद्वाज या चित्रपटाचे नायक-नायिका. अर्चना जोगळेकर ही अभिनेत्री मॉडेल असते, तर तिचा प्रियकर नितीश भारद्वाज हा इन्स्पेक्टर असतो. कोल्हापूरचा प्रतिष्ठित पुढारी समाजसेवक असलेल्या अशोक सराफची आपल्यावर वाईट नजर आहे आणि तो आपल्याला वारंवार त्रास देतो आहे अशी तक्रार आल्यावर सगळ्यांना धक्का बसतो, कारण अशोक सराफ हा परोपकारी, लोकांना मदत करणारा असा असतो, पण यातील रहस्य समोर येते तेव्हा एक अनपेक्षित कथानक समोर येते. यात अशोक सराफ दुहेरी भूमिकेत आहे. एक खलनायक आणि एक चरित्रनायक, पण या चित्रपटावर अंमल राहतो तो मात्र खलनायक अशोक सराफचा.
‘वजीर’ हा एक अशोक सराफ, विक्रम गोखले यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीचा राजकीय चित्रपट. आशितोष गोवारीकर, अश्विनी भावे असे दिग्गज कलाकार असलेल्या या चित्रपटात राजकीय पुढाºयाची भूमिका अशोक सराफ यांनी केली आहे. ती खलनायकी ढंगाची अशीच आहे. राजकारणातील राजकारण आणि निवडणुकीतील राजकारण असा हा दुहेरी प्रवास असतो. त्यातही मुख्यमंत्रीपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नेमकी कोणती चाल खेळण्यास प्रवृत्त करेल हे कोणीच सांगू शकत नाही. यातूनच नातेसंबंध बदलत जातात. याभोवती हा वजीर होता. त्याचे कथानक गुंतागुंतीच्या राजकारणाचे असले, तरी यात अनेकांची हजेरी आहे. कुलदीप पवार, इला भाटे, सयाजी शिंदे आदी कलाकारही यात होते. उज्वल ठेंगडी यांच्या या चित्रपटात उल्लेखनीय भूमिका म्हणून अशोक सराफना ओळखले गेले होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अशी ओळख असलेल्या अशोक सराफ यांनी अशा अनेक नकारात्मक भूमिकांतून रंगवलेला खलनायक कोणत्याही नायकापेक्षा नेहमीच भारदस्त ठरला होता. कारण तो अभिनयाचा सम्राट अशोक आहे.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा