झी मराठीवर गेले दहा महिने सुरू असलेली मालिका ‘देवमाणूस’ ही खरं तर अंतिम टप्प्यात आहे. त्या मालिकेचा शेवट करणे आवश्यक आहे. तिथपर्यंत ती मालिका पोहोचलीही आहे, पण कारण नसताना त्यात पाणी घालून, नवा ट्विस्ट आणायचे चाललेले प्रयत्न हे हास्यास्पद आणि अतिरेकी आहेत. एकतर सत्य घटनेवर हे कथानक असताना, त्या मूळ घटनेचा विषय न्यायप्रविष्ट असताना त्या गुन्हेगारांना मार्गदर्शक ठरेल असे विषय या मालिकेत आणणे चुकीचे आहे. त्यामुळे दिव्याने अजितला लग्नातून पकडले आणि तुरुंगात डांबले इथेच ही मालिका संपायला हवी आहे, पण जो अतिरेक चालवला आहे तो चुकीचा आहे.
मंगळवारच्या भागात अजितला न्यायालयात हजर केल्यानंतर आपल्याला वकील नको आणि आपणच आपली केस चालवणार असल्याचे सांगून हा वकील माझ्याकडून खूप पैसे मागतो आहे, आपले आणि न्यायाधीशांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे पैसे देऊन सोडवण्याचे आामिष वकिलाने दाखवल्याचे अजित कोर्टात खोटेच सांगतो. त्यामुळे त्या वकिलाची सनद न्यायाधीश सहा महिन्यांकरिता रद्द करतात. ही कल्पना काही नवी आहे अशातला भाग नाही. सत्यघटनेवर आधारित बायकांना फसवून अनेक लग्न करणाºया सैद काझी प्रकरणावर आचार्य अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ हे नाटक लिहिले होते. त्या नाटकात लखोबा लोखंडे हा अशाच प्रकारे वकिलाला अडचणीत आणतो. तोच प्रकार इथे अजित करतो, पण या मालिकेतून एका गुन्हेगाराला, लोकांना फसवणाºया व्यक्तीला हीरो करण्याचा जो प्रकार चालला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे ही मालिका आता लवकरात लवकर संपवणे आवश्यक आहे. उगाच त्यात नवीन कथानक घुसडून प्रेक्षकांचा अंत पाहू नये.
सत्यघटनेच्या जवळ जायचेच होते, तर त्यातील घडलेले प्रकारही या मालिकेत दाखवणे आवश्यक आहे. ज्या डॉक्टर पोळ या नराधमाच्या जीवनावर ही मालिका बेतली आहे, त्याला न्यायालयात आणताना तृप्ती देसाई आणि त्यांच्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चपलांचा प्रसाद दिला होता. असा एखादा प्रसंग दाखवला असता तरी चालले असते, पण या अजितला पोलिसांनी पकडून नेत असताना गावकरी ज्याप्रकारे त्याचा उदोउदो करतात, त्यातून त्याचे उदात्तीकरण चालल्याचे दिसते आहे.
गेले चार-पाच भाग सोडले तर या मालिकेतील पोलिसांची कामगिरी ही अत्यंत सुमार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी अशीच आहे. अर्थात हा कथालेखकाचा दोष आहे, पण सचिन वाझेने महाराष्ट्र पोलिसांना बदनाम केले नसेल त्यापेक्षा जास्त बदनाम या दिव्या सिंगने केलेले आहे. जेमतेम हजार-पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात एसीपी दिव्या सिंगची नेमणूक होते हे पण हास्यास्पदच आहे. चार पोलीस असलेल्या पोलीस चौकीत एसीपी बसतात का? बरं विशेष तपासासाठी, या केससाठी तिला इथे पाठवले असेल तर तिने बाकीचे उद्योग कशासाठी केले? दिव्या सिंग त्या अजितकुमार देव नामक बोगस डॉक्टरच्या प्रेमात पडते, त्याला लग्नाची मागणी घालते, हे किती चुकीचे वाटते? त्याच्या प्रेमात पडण्यासाठी, प्रेमाची लफडी करण्यासाठी तिची नेमणूक झालेली होती का? तू तपासासाठी आली आहेस की वर संशोधनासाठी आलेली आहेस? सुंदर दिसून रडायला आली आहेस की तपासासाठी आलेली आहेस? कसलेही भान नसलेले कथानक वाढवण्याचा प्रकार या मालिकेत चालवला आहे. त्यामुळे कसाबसा त्याला आता पकडला आहे तर तिथेच ही मालिका संपवणे अभिप्रेत आहे. वाईच्या डॉक्टर पोळला पाच वर्ष झाली पकडून तरी अजून शिक्षा झालेली नाही की त्या केसचे पुढे काही घडलेले नाही. त्यामुळे अजितकुमारलाही पकडून नेले इथपर्यंत कथानक चालले असते.
पण कहर म्हणजे ‘ब्युटीफूल’ असे उद्गार काढून बायकांना जाळ्यात ओढणारा अजितकुमार आता सरकारी वकील असलेल्या आर्याला जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करतो, हे अतिरंजित वाटते. गावकºयांवर त्याने इतकी मोहिनी घातलेली आहे का, की एकही जण त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही? आंधळी असणारी सरू आजी मात्र ठामपणे पहिल्या दिवसापासून हा कम्पाऊंडर आहे हे सांगते आहे. ती एकटी अजितच्या विरोधात आहे. यामागचे रहस्य काय आहे? कोणत्या आधारावर ती त्याला कम्पाऊंडर म्हणते आहे, हे सगळे अनाकलनीय आहे. किमान रूपानं अजितची माहिती सरू आजीला सांगितली होती, असे तरी काही कथानकात असले पाहिजे, पण कोणीही त्याच्या विरोधात जात नाही हे आश्चर्यच आहे. पण आता ही मालिका जास्त काळ चालू ठेवून गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यात वेळ घालवू नये, इतकीच प्रेक्षकांची माफक अपेक्षा आहे.
कम्पाऊंडर म्हणून अजितकुमार ज्या मुंबईतल्या डॉक्टरकडे कामाला होता तो एकमेव साक्षीदार शिल्लक आहे. हाच देवीसिंग आहे हे सांगणारा तो नेमका पुरावा आहे. इन्स्पेक्टर चव्हाण त्याच्यापर्यंत पोहोचला होताच, पण दिव्या सिंगही त्याच्यापर्यंत पोहोचली होती. पोलिसांच्या मदतीसाठी केव्हाही येण्यास तयार आहे असे त्याने सांगितलेही होते. असे असताना त्याला अजून साक्षीदार म्हणून का आणले नाही? मालिका उगाच वाढवण्यात आणि आता दिव्या सिंगची बदनामी करून अजितकुमारचे उदात्तीकरण करण्यात वेळ दवडता कामा नये. ही मालिका आता संपवली पाहिजे.
या मालिकेचा टीआरपी चांगला असला, ती सतत एक नंबर असली, तरी त्याची जमेची बाजू ही टोन्या आणि सरू आजी आहेत. लग्नाच्या आदल्या दिवशी सरू आजीला चुकून दारू पाजतात आणि त्यानंतर ती जी धमाल उडवून देते ती खरोखरच लक्षणीय होती. दारू प्यायल्याचे तिने सांभाळलेले बेअरिंग फार महत्त्वाचे आणि सुंदर होते, पण नंतर ऐन लग्नात लाथा मारून एसीपी दिव्या अजितकुमारला तुडवणार होती त्यासाठी हा प्रसंग उंचीवर नेणे आवश्यक होते, पण आता त्याला पकडून न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टातले छक्केपंजे, डावपेच दाखवण्याची गरज नाही.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा