शुक्रवार, १८ जून, २०२१

लेखा परीक्षक चुका सुधारून का घेत नाहीत?

 अग्रलेख


कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात मंगळवारी शेकापचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांन ईडीने अटक केली. अर्थात हे प्रकार काही महाराष्ट्राला नवीन नाहीत. गेल्या दोन दशकात शेकडो बँका अशा प्रकारे बुडाल्या आहेत; पेण अर्बन बँक, रोहा अर्बन बँक, कराड जनता बँक, मराठा सहकारी बँक, अजिंक्यतारा सहकारी बँक, जिजामाता महिला सहकारी बँक अशी शेकडो नावे घ्यावी लागतील. या बँकांचे नेतृत्व कुठल्या ना कुठल्या आमदार, खासदार किंवा राजकीय व्यक्तीकडेच होते; पण बँका जरी संचालक आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली चालत असल्या, तरी त्या रिझर्व बँक आणि सहकार खात्याच्या नियंत्रणाखाली असतात. असे असताना सातत्याने अनियमीत, असुरक्षित व्यवहार होत असतील, तर लेखा परीक्षक त्या चुका सुधारून का घेत नाहीत? लेखा परीक्षक या नेत्यांना घाबरतात का? ते त्यांना सामिल होतात का? का त्यांना अधिक अधिकार देण्याची गरज आहे, याचा विचार केला पाहिजे. इतक्या बुडालेल्या बँकांमधून हजारो लाखो लोकांचे नुकसान झालेले आहे, अनेक संचालक पळून जातात आणि काही वर्षांनी प्रकट होतात. एखादी बँक विलीन होती; पण बाकीच्या बँका मोडीत काढल्या जातात. यात ठेवीदारांचे नुकसान होत असतेच; पण सहकार या शब्दाचा अर्थ बदलला जात असतो. यासाठी लेखा परीक्षकांनी चोख काम करण्याची गरज आहे. अमूक एक व्यवहार चुकीचा आहे, नियमबाह्य आहे हे ठामपणे सांगण्याची गरज आहे; पण लेखा परीक्षक जर कायद्यातून सुटण्याच्या पळवाटा सुचवत असतील, तर तो सहकार बुडणारच. म्हणूनच खºया अर्थाने लेखा परीक्षण करणाºया लेखा परीक्षकांची निर्मिती होणे गरजेचे आहे.


बँकेचं अनियमित व्यवहार एकदा होईल; पण तो वेळीच निदर्शनास आणून देण्याचे काम लेखा परीक्षकांनी केले, तर त्या बँका बुडणार नाहीत. बँका बुडण्याच्या प्रक्रियेंतर्गत लेखा परीक्षक, चार्टर्ड अकाऊंटंट यांचा हात फार मोठा असू शकतो. गैर व्यवहार झाल्यावर तो लगेच शेरे मारून दुरूस्त करून घेण्याची जबाबदारी त्या लेखापालांची आहे. साधारणपणे बँकांवर निर्बंध लागेपर्यंत या बँका अ वर्ग आॅडीट वर्ग मिळवत असतात. त्या आजारी आहेत, असे कुठेही दिसत नाहीत. अचानक निर्बंध लागतात; पण पोखरायला सुरुवात काही एकाएकी झालेली नसते. संचालक मंडळाच्या या गोष्टी निदर्शनास आणून देण्याचे काम लेखा परीक्षकाचे आहे.

रिझर्व्ह बँकेच्या दरमहा गाईड लाईन्स सर्व बँकांना येत असतात. बँकांचे करंट आॅडीट होत असते. सहकार खात्याचे, विशेष लेखा परीक्षकांचे, फ्री झोनमधील, अंतर्गत असे कितीतरी प्रकारे आॅडीट नियमीत चाललेले असते. हे आॅडीट करताना हे घोटाळे कोणाच्याच लक्षात येत नाहीत का? कर्ज प्रकरणे सुरक्षित आहेत का? व्यवहार सुरक्षित आहेत का? त्यात काही चुकीचे नाही ना हे पाहण्यासाठी तर आॅडीट होत असते; पण आॅडीटरनी आपले काम चोख केले नाही तर गैरव्यवहारांना प्रोत्साहन मिळते. त्यासाठी सर्वात प्रथम ज्या बँका बुडाल्या आहेत त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट, लेखा परीक्षकांची चौकशी होण्याची गरज आहे. तुम्ही काय केलेत? तुम्ही शेरे काय मारलेत? शेरे मारल्यावर त्याचे दोष दुरूस्ती अहवाल करून घेतले होते का? ही न्याय करण्याची जबाबदारी त्यांची असताना संचालकांना पाठीशी का घातले याची चौकशी केली, एखादा लेखा परीक्षक यात सापडला, त्याला दंड, शिक्षा झाली, तर असे प्रकार थांबतील. नाहीतर दर चार-सहा महिन्यांनी कुठली तरी बँक बुडाली, कोणाला तरी अटक केली हे पहावे लागेल.


प्रत्येक बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षण असते. त्या लेखा परीक्षणासाठी दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखा परीक्षकाची नेमणूक करणे हा विषय विषय पत्रिकेत असतो. त्याच सभेत त्याच्या मानधनाची चर्चा झालेली असते. हा लेखा परीक्षक वर्षभर लेखा परीक्षण करत असतो. कीदॅ, पोटकीर्द, चलनं, व्हाऊचर, कर्जरोखे, कर्जाची प्रकरणे त्यासाठी कारण आणि तारण काय आहे, जामिनदारांची कागदपत्रे काय आहेत? परतफेडीची क्षमता आहे का नाही? हे सर्व अंतर्गत लेखा परीक्षक तपासत असतो. कर्जाच्या अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांत त्रुटी असेल, तर ती पूर्ण करून घेण्याच्या बाबी आपल्या शेºयांमध्ये लिहित असतो. ते शेरे पूर्ण केले की नाही, दुरूस्ती केली की नाही हे पुढच्या लेखा परीक्षणापूर्वी तपासतो आणि मग पुढचे काम करत असतो. त्याच त्याच चुका पुन्हा होत नाहीत ना याकडे लक्ष देऊन आॅडीटवर्ग तो देत असतो; पण बºयाचवेळी चार्टर्ड अकाऊंटंक किंवा लेखा परीक्षकांकडे शिकाऊ मुले-मुली असतात. ती शिकाऊ मुले फक्त येतात, आॅडीटच्या नावाखाली टीक मारतात, चहा नाष्टा जेवण उकळतात आणि निघून जातात. आॅडीटच्या नावाखाली टाईमपास होत असतो. हे प्रकार थांबले पाहिजेत. यापैकी अनेक शिकाऊ मुलांना व्याजही काढायला येत नसतात. आपल्याला आॅडीटरकडे खूप कमी पगार आहे, तुमच्या बँकेत व्हेकन्सी असेल तेव्हा सांगा, अशी गळ घालत ही मुले काहीही कामे करत असतात. त्यात चुका झाकल्या जातात. हा अनुभव सर्व ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे योग्य लेखा परीक्षक, त्याने खºया अर्थाने लेखा परीक्षण करून त्या चुका सुधारून घेण्याचे काम केले, तर कोणतीही बँक बुडणार नाही. त्यामुळे संचालकांइतकेच लेखा परीक्षकाला जबाबदार धरले पाहिजे, प्रसंगी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. लेखा परीक्षक हा बँकेचा सुरक्षारक्षक आहे. त्याने चोरांना मदत करायची नाही, तर रोखायचे असते. ते केले नाही, तर खरा दोषी लेखा परीक्षक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: