रविवार, ६ जून, २०२१

काँग्रेसचा दणका


दोन दिवसांपूर्वी काँग्रेसला दणका देण्याचा प्रयत्न करणाºया शिवसेनेला राज्य सरकारमध्ये तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेल्या अनलॉकच्या पाच टप्प्यांच्या निर्णयाला खो घालत अजून राज्य सरकारचा निर्णय झालेला नाही, असे कळवण्यात आले. हा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील असे सांगण्यात आले. वडेट्टीवार यांना चूक झाली असे वदवून घेण्यात आले; पण प्रत्यक्षात काँग्रेसनेच राज्य सरकारला पर्यायाने शिवसेनेला दणका दिल्याचे शनिवारी दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला सामोरे जाऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी रात्री १२ वाजता परिपत्रक काढून विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेला निर्णय मान्य केला. थोडासा मनाचा मोठेपणा दाखवला असता, तर शिवसेनेचे महत्त्व वाढले असते. विजय वडेट्टीवार हे आमच्या सरकारचे मंत्री आहेत, त्यांनी दिलेली माहिती ही सरकारच्या वतीने सरकाचे प्रतिनिधी म्हणून आहे असे शिवसेनेने म्हटले, असते तर सेनेचे मोठेपण दिसून आले असते. पण हा सरकारचा निर्णय नाही, त्याला मान्यता नाही, तत्वत: मान्यता आहे, असे वदवून घेऊन अंतिम मान्यता आमची असेल, तो निर्णय जाहीर आम्ही करू हा अट्टाहास करून आघाडीतील घटक पक्षाला अपमानीत करण्याचा प्रकार केला; पण मौन सर्वार्थ साधते या न्यायाने काँग्रेसने शिवसेनेला चांगलाच दणका दिला. तो निर्णय मान्य तर आपला हक्क डावलला, आपले श्रेय लाटले असे विनाकारण वाटल्याने ४ तारखेला होणारा अनलॉक ४ दिवस पुढे ढकलला. हे सगळे महाराष्ट्रातील जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. त्यामुळे काँग्रेसचा बसलेला हा दणका फार महत्त्वाचा आहे.


ज्या प्रकारे हे सरकार काम करते आहे त्यावर सर्वसामान्य जनता नाराज आहेच. ही कामाची पद्धत नाही. आघाडीत समन्वय नाही, असे वातावरण विनाकारण तयार केले गेले. ३ जूनला साडेबारा वाजता मुख्यमंत्री आणि सरकारचे प्रतिनिधी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची बैठक झाली. त्या बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला आणि पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवार यांनी तो जाहीर केला. याला नक्कीच मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे, असेच गृहीत धरले जाणार होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बाहेर पडल्यावर हा राज्य सरकारचा निर्णय नाही, असे सांगून काँग्रेसला जो नमवायचा प्रयत्न केला तो केवळ श्रेयवादासाठी होता. त्यामुळे काँग्रेस दुखावली. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इथून पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली. काँग्रेसचा अपमान तर केला, तोंडघशी तर पाडले; पण हा निर्णय नक्की झाला आहे ते जनतेपुढे येऊन सांगण्याचे धाडस मात्र झाले नाही. या अपमानामुळे काँग्रेस दुखावली आणि पाठिंबा काढून घेतला तर काय होईल? या भीतीने रात्री बारा वाजता परिपत्रक काढले आणि तो निर्णय मान्य केला. ही केवढी नामुष्की आहे. रात्रीत जाऊन पहाटे शपथविधी करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय किंवा असा रात्रीत परिपत्रक काढून अनलॉकचा आनंददायी निर्णय सांगण्यासाठीही जनतेच्या समोर येण्याचे धाडस नसणारे नेते काय हे एकाच माळेचे मणी म्हणावेत का? सगळी अंदाधुंदी माजली आहे. जो मनाला येईल तसा वागतो आहे. मुंबईसाठी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार. जगातल्या इतक्या कंपन्यांशी संपर्क साधून कोणीही दारात उभे केले नाही, ही नामुष्कीच नाही का? काही प्रोटोकॉल असतो. थेट परदेशातील कंपन्यांशी संवाद साधण्यासाठी काही यंत्रणा असते. महापालिका थेट कधी असे व्यवहार करते का? त्यासाठी केंद्राचे परराष्ट्र व्यवहार, गृह ही खाती महत्त्वाची असतात. त्यांच्या मार्फत हे करायचे असते; पण ग्लोबल टेंटर मागवले आणि त्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून तोंडावर पडायची वेळ आली. त्याला राग आला म्हणून महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी सामान्य जनतेचा सोशल मिडीयावर बाप काढला. नंतर ती पोस्ट माझी नाही, तर शिवसैनिकांनी केली होती, त्यांना काढून टाकले असे जाहीर केले. आपल्या अकाऊंटवरून अन्य शिवसैनिक कसे काय पोस्ट करू शकतील? जनतेला काय वेडे समजतात का हे लोक? ज्या शिवसैनिकांनी तुमच्या निष्ठेमुळे विरोधकांचा, सामान्य जनतेचा बाप काढला त्यांना शिवसेनेतून काढून टाकल्याचे जाहीर केले हा शिवसैनिकांचा अपमानच नव्हे काय? पण एकूणच ही वैफल्याची अवस्था आल्यामुळे असे निर्णय होत आहेत हे नक्की. यात काँग्रेसने चांगलाच दणका दिला हे मान्य करायला हवे. याचा फायदा नक्की काँग्रेसला होईल. मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यापासून भाई जगताप यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. तशी तयारी, भेटीगाठी सुरू केल्या होत्या. एकीकडे काँग्रेस आपले जनमत तयार करण्याचे प्रयत्न करत आहे, तर शिवसेनेचे नेते चुकीची पावले टाकताना दिसत आहेत. मुंबई म्हणजेच शिवसेना हे समीकरण मोडून काढण्याचा कोणी चंग बांधला आहे का, असा प्रश्न यातून निर्माण होतो. जे जुने जाणते नेते आहेत ते काही बोलत नाहीत. जे बोलत आहेत ते लोक अडचणी निर्माण करत आहेत. असे झाले तर कसे होणार हा प्रश्न आहे; पण श्रेयवाद आणि वर्चस्वाच्या नादात फार मोठी नामुष्की ओढवून घेण्याचा प्रकार मात्र इथे झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: