गेल्या काही वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरात श्वानप्रेमींचे फार मोठे पेव फुटले आहे. आज बहुसंख्य रोगप्रसाराला सुपर स्प्रेडर म्हणून ही कुत्री काम करत असताना या कुत्र्यांबाबत प्रेमाचा उमाळा फुटणारे श्वानप्रेमी शहरांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत घातक आहेत. त्यामुळे अशा श्वानप्रेमींना त्या त्या स्थानिक संस्थांनी, प्रशासनांनी कारवाई करून आवर घालण्याची गरज निर्माण झालेली आहे.
सकाळ झाली की उठायचे आणि एका पिशवीत बिस्कीटचे पुडे घेऊन बाहेर पडायचे. सार्वजनिक ठिकाणे, बसस्टॉप, बसस्टँड, रेल्वे स्थानकांवर जाऊन त्या भटक्या कुत्र्यांना गोळा करून बिस्किटे खायला घालायचे आणि आपण खूप मोठे श्वानप्रेमी आहोत, समाजसेवा करत आहोत, पुण्यकर्म करत आहोत असा आव आणत त्या घाणेरड्या कुत्र्यांना गोंजारत बसायचे. ती भटकी कुत्री या श्वानप्रेमींकडून कुरवाळून घेतात, जिथे आपल्या पायाचे भाग पोहोचत नाहीत तिथले भाग खाजवून घेतात, शेपूट हलवतात आणि बिस्किटे हुंगल्यासारखे करतात, एखादे हावरट कुत्रे बिस्किटे कडाकडा खातेही, पण बरीचशी बिस्किटे तशीच चुरा होऊन स्थानकात पडतात. हा सगळा कचरा तिथेच पडलेला असतो. महापालिकेचे सफाई कर्मचारी, रेल्वेचे सफाई कर्मचारी सकाळी येऊन सगळी सफाई करून गेलेले असतात आणि तिथे हे श्वानप्रेमी बिस्किटांची घाण करत असतात. बिस्किटे हे काय कुत्र्यांचे खाद्य आहे? ती बिस्किटे त्या कुत्र्यांना पचत नाहीत आणि लगेच प्लॅटफॉर्मवर, बसस्थानकात, सार्वजनिक ठिकाणी ती कुत्री घाण करतात, त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरते. या श्वानप्रेमींमुळे लांबवरची कुत्रीही भटकत भटकत सार्वजनिक ठिकाणी येतात. त्याचा त्रास प्रवाशांना होत असतो. याला सर्वस्वी हे अतिरेकी श्वानप्रेमी असतात. यासाठी महापालिका, रेल्वे, सिडको आणि संबंधित प्रशासनांनी अशाप्रकारे कुत्र्यांना खायला घालून घाण करणारांकडून स्थानकांची सफाई करून घेणे गरजेचे आहे.
किती घाणेरडी अशी ती कुत्री असतात. पावसाळ्यात तर चिखलात भरलेली बरबटलेली, अंगावर जखमा झालेली, पिसवा, गोचिड्या असलेली, सतत व्हायोलीन वाजवल्याप्रमाणे तार छेडत असल्याच्या अविर्भावात खाजवत बसणारी ही कुत्री असे श्वानप्रेमी आले की जोरात ओरडायला लागतात, शेपट्या आपटायला लागतात, आडवी पाठीवर लोळायला लागतात आणि लाडात येतात. मग हे श्वानप्रेमी त्यांना कुरवाळतात काय, पाठीवरून हात काय फिरवतात, बिस्किटे खायला घालतात. त्यावेळी प्रचंड प्रमाणात घाणीचे जंतू, व्हायरस हवेत पसरत असतात. हे श्वानप्रेमी हातपाय न धुताच इतरत्र हिंडत असतात. आजकाल महामारीचे दिवस आहेत. कुठेही शेण खाऊन आलेली कुत्री, घाणीत, कचºयातून लडबडून आलेली कुत्री रोगांचा प्रसार करत असतात. त्यांना पोसण्याचे काम हे श्वानप्रेमी करत असतात. त्यामुळे या घाणीला सार्वजनिक ठिकाणी पसरवण्याचे काम करणाºया या अतिरेकी श्वानप्रेमींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे.
या श्वानप्रेमींना कुत्र्यांबद्दल, प्राणिमात्रांबद्दल आपुलकी असेल तर त्यांनी ती आपल्या घरी घेऊन जावीत, पण सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल अशा ठिकाणी बोलावून स्टेशन, बसस्थानके, रस्ते घाण करायचे काम थांबवले पाहिजे. अशांवर महापालिकेने, सिडको आणि संबंधित प्रशासनांनी, रेल्वेने कारवाई केली पाहिजे. स्थानकांत कुत्र्यांसह त्यांना येण्यास बंदी घातली पाहिजे. कित्येक चहाच्या टपºयांवर हे श्वानप्रेमी येतात आणि बिस्किटाचा पुडा घेतात आणि जवळच खायला घालतात. ती कुत्री तिथेच घाण करतात. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ अशी घाणेरडी कुत्री घेऊन येणाºया सर्व श्वानप्रेमींवर कारवाई केली पाहिजे. त्यांना दंड केला पाहिजे. त्यांना आवर घातला पाहिजे. नाहीतर फार मोठी रोगाची साथ येण्याची भीती आहे.
या श्वानप्रेमींमुळे बिस्किटाचे पुडे खपतात म्हणून कित्येक चहाच्या स्टॉलवर मेसेज लिहिलेले असतात. त्यात भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्याने तुमच्या मागचा ग्रहदोष नाहीसा होतो ईथपासून ते पितृदोष, ग्रहशांती होते, असले मेसेज लिहिलेले असतात. त्यामुळे अनेक अभागी लोक आपल्या पिडांपासून मुक्त होण्यासाठी श्वानप्रेमी होतात. त्या स्टॉलवरच बिस्किटाचा पुडा घेतात आणि कुत्र्यांना बिस्किटे खायला घालतात. मग ती कुत्री तिथेच जोरजोरात ओरडायला लागतात. अंगावर धावून येतात. त्याठिकाणी उभे राहणे, चहा पिणे हे अशक्य होऊन जाते.
मुळात आज बहुतेक शहरांमधून भटकी कुत्री ही फार मोठी समस्या झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या मनेका गांधींच्या आग्रहामुळे कुत्री मारली जात नाहीत. पूर्वी पावसाळ्याच्या पूर्वी नगरपालिकेचे लोक भटकी कुत्री मारून टाकत होते, पण गेल्या पंचवीस वर्षांत मनेका प्रेमापोटी ते बंद झाले आहे. त्यातून काही आंतरराष्ट्रीय एनजीओ कुत्र्यांच्या नसबंदीचे अर्थकारण करत आल्या आहेत. त्या कुत्र्याची नसबंदी केली आहे त्याचे काही प्रमाणपत्र आहे का? पण फक्त कुत्रं दाखवा आणि अनुदान मिळवा असल्या भ्रष्ट कारभारात काही लोक असले श्वानप्रेमाचे धंदे करून अवैध मार्गाने पैसे कमवत असतात. त्याचा समाजाला, सार्वजनिक ठिकाणांना त्रास होत असतो. त्यामुळे अशा या अतिरेकी श्वानप्रेमींना आवर घालण्याची गरज आहे. सध्या पावसाच्या दिवसांत तर इतक्या टोळक्याने ही कुत्री हिंडत असतात की, जोरात भुंकत धावत सुटतात तेव्हा सगळा परिसर हादरवून सोडतात. हा अतिरेक थांबला पाहिजे. त्यासाठी या श्वानप्रेमींना आवर घातला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा