गुरुवार, १० जून, २०२१

वाढती हिंसक मनोवृत्ती


गेल्या काही दिवसांत सामान्य माणसांमधील सहनशक्ती संपुष्टात आल्याचे चित्र समोर दिसत आहे. याला कोरोनाचा परिणाम म्हणता येणार नाही; पण घरात बसून, कुटुंबासमवेत राहूनही माणसं समाधानी नाहीत. आज श्रीमंत असणे, पैसा असणे यापेक्षा समाधानी आणि आनंदी असणे महत्त्वाचे आहे. माणसांची वाढती चिडचीड, अस्वस्थता यातून हिंसक प्रवृत्ती वाढीस लागत आहे. सरकारच्या काही धोरणांमुळे होणारा कोंडमारा यामुळे अनेक जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. काहीवेळा सरकारच्या धोरणामुळे माणसांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे एकूणच माणसा-माणसांमधील हिंसक प्रवृत्ती वाढीस लागत आहे. त्याचा परिणाम म्हणून खून आणि आत्महत्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे.


अशा कितीतरी घटना असतील. महाराष्ट्राबाहेर तर बोलायलाच नको. अशा घटनांमध्ये खूप वाढ झालेली आहे. माणसं हिंसक बनत चालली आहेत. मनावरचे नियंत्रण सुटत आहे. हे कशामुळे होते आहे, याचा शोध घ्यावा लागेल. हे सगळं कशाने घडत आहे, याचा शोध घेतलाच पाहिजे. कारण, हे फार घातक आहे. जगातले सगळे प्रश्न जर जीव देऊन किंवा जीव घेऊन सुटत असते, तर निम्मी माणसे मारून आणि निम्मी मृत्यूला कवटाळून संपतील आणि एक दिवस हे जग माणसांविना असेल. मारून किंवा मरून प्रश्न सुटत नसतात. प्रश्नांना, संकटांना धैर्याने सामोरे जाणे हा पुरुषार्थ असतो. आज तुम्हाला भांडता येत असेल, तरच तुम्ही जगू शकता अशी परिस्थिती आहे. जो आपल्या हक्कासाठी भांडू शकत नाही त्याला मरण जवळ करावे लागते असे चित्र आहे. सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा भेदभाव माणसांना मृत्यूला आणि आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. निर्बंधांचा अतिरेक करून फक्त ठराविक लोकांना सवलत द्यायची हा भेदभाव कशासाठी? भेदभावाची संस्कृती शासन प्रशासन लादत असल्यामुळे माणसांच्या मनात हिंसक विचार येताना दिसत आहेत.

खरं तर कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. या सरकारने संवादाचे दारच बंद करून टाकले आहे. मनाला येईल तसे निर्णय घ्यायचे, ठराविक मर्जीतील लोकांनाच आपलेसे करायचे आणि बाकीच्यांची कुचंबणा करायची हा प्रकार सामान्य माणसाला वैफल्याकडे, नैराश्याकडे घेऊन जातो. त्यातून आत्महत्येचे विचार मनात येतात. आज सगळीकडेच संवाद न होणारे वातावरण निर्माण होत आहे. शासन प्रशासनाचा संवाद नाही. सरकारच्या घटक पक्षांचा एकमेकांशी संवाद नाही. त्यातून घेतल्या जाणाºया निर्णयांमुळे सामान्यांचे शोषण होते आहे, याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.


आज घराघरातला संवाद हरवला आहे. प्रचंड ताणतणाव आणि आर्थिक विवंचनेत माणसे होरपळली जात आहेत. या तणावातून कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे असते. राग, ताणतणाव मनात साचत गेला, तर मनुष्य आजारी पडून, हृदयविकारासारखे रोग होऊन तरी संपतो किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन वैफल्यावस्थेत, नैराश्याने आत्महत्या करतो, स्वत:ला संपवतो. पण, हा त्यावरचा उपाय नाही. बदललेली जीवनशैली, हातात आलेला स्मार्ट फोन, पाठीवर असलेली लॅपटॉपची बॅग किंवा घरातील सर्व सुखसोयी या खरे सुख देतात का? हातात आलेला मोबाईल लांबवरचा संवाद साधण्यास उपयुक्त असेल कदाचित, पण त्या नादात आपण जवळची माणसे तर दुरावत नाही ना, याचा विचार करावा लागेल. कुटुंबातील संवाद हरवला आहे, त्यामुळे एकमेकांना धीर देणारे जोडीदार लांब झाले आहेत. माणूस एकाकीपणा अनुभवत आहे. घरात असलेले पती-पत्नी आणि मुलं हे फक्त लॉजिंग बोर्डिंगसारखे घरात फक्त झोपण्यासाठी येत असतील, तर त्यांच्यात प्रेम आणि संवाद राहणार नाही. भौतिक, ऐहिक सुखाच्या मागे लागताना आत्मिक सुख-समाधान माणूस गमावत आहे. त्या असमाधानी वृत्तीतून वैफल्यावस्था प्राप्त होते.

हे जग आपल्या कामाचे नाही, असे वाटून हिंसक प्रवृत्तीला जवळ करतो. हे वाढते प्रकार फार वेदनादायी आहेत. वाढते खर्च, अनियमित असणारे पगार यामुळे सामान्य माणूस चिंताग्रस्त आहे. कर्जबाजारी झालेला आहे. दररोज येणाºया बातम्यांमधील अनेक घटनांमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून हत्या, आत्महत्या अशा घडलेल्या आहेत. माणसाचे व्यवहार हे नियमित उत्पन्नावर अवलंबून असतात. पगार नियमितपणे ठरावीकपणे वेळेत मिळाला तर, माणसाला उधारी, उसनवारी करावी लागत नाही, कर्ज घेण्याची गरज भासत नाही. पण, पगार वेळेवर न मिळणे यामुळे देणेकरी रांग लावतात, तेव्हा सतत अपमानास्पद वागणूक माणसाला मिळत जाते. अशा परिस्थितीत कोणी जवळ करत नाही. माणूस एकाकी पडतो आणि आत्महत्या करतो. यासाठी कौटुंबिक संवाद व्यवस्थित होत असेल, एकमेकांना विश्वासात घेऊन काही मार्ग काढला तर त्यावर मात करता येते. पण, तसे होताना दिसत नाही. शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून कोणी आत्महत्या करते, हे फारच वेदनादायी आहे.


कोणाला कोणाशी बोलायला वेळच नाही. हे फार चिंताजनक आहे. रोगाची साथ यावी त्याप्रमाणे एकाने आत्महत्या केली की दुसरा करतो. पण, हा काही उपाय नाही. माणसाने मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या विकारांवर विजय मिळवला पाहिजे. चित्तवृत्ती स्थिर ठेवून शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. आत्महत्या करून किंवा हत्या करून कोणाचे प्रश्न सुटले आहेत? तरीही माणसे असे का करतात? त्यांच्यातील याच एकाकीपणाला बाहेर काढले पाहिजे. एकमेकांशी बोलले पाहिजे, कुटुंबातले एक जेवण तरी एकत्र बसून सवार्नी घेतले पाहिजे. यावेळी सर्वांनी आपल्या अडचणी, सुख-दु:खे एकमेकांना सांगितली, तर त्यावर तोडगा निघू शकतो. आपले कुटुंब, समाजव्यवस्था यांच्यात साधला जाणारा संवाद फार महत्त्वाचा आहे. अगदी देवधर्म करा किंवा मंदिरात जाऊन मनाला शांती मिळवा असे नाही, पण निदान कधीतरी समुद्रकिनारी किंवा शांत वाटेल अशा ठिकाणी जाऊन मन शांत करून आले पाहिजे, तरच हे प्रकार टळतील. मनातील या हिंसक प्रवृत्तीला बाहेर काढणे ही आजची गरज आहे. इथूनपुढे तणाव वाढतच जाणार आहेत, त्याला सिद्ध होण्याची ही वेळ आहे. आता सरकार आपल्यासाठी काही करणार नाही, सरकारमध्येच संवाद नसल्याने सामान्य माणसांची कोंडमारा हा होतच राहणार आहे. त्यासाठी जेंव्हा निवडणुका येतील तेंव्हा मतपेटीतून त्यांना उत्तर देण्यासाठी माणसांनी जगलं पाहिजे. त्यासाठी आपल्या कौटुंबिक संवादाचा वापर केला पाहिजे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: