मान्याच्या वाडीत आज उत्साह संचारला होता. देन्या माने हातात पेपर घेऊन पारावर बसला होता. गावातले प्रतिष्ठीत दत्तू माने, रंगा माने, तुकाराम माने, सरपंच पाटील आणि काही गावकरी या पाराजवळ जमले होते. देन्या पेपर नाचवून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. त्याची ती चूळबूळ पाहून सरपंच म्हणाले, ‘देन्या, आरं कवाधरनं पाहतुय... तू त्यो पेपर नाचवून कायतरी सांगाय बघतुयस.. काय हाय काय भानगड?’
तसा देन्याला उत्साह आला. तो उभा राहिला अन म्हणाला, ‘ही बातमी वाचा...’
तसा रंगा म्हणाला, ‘आता तूच सांग की रं काय हाय त्या बातमीत?’
देन्या म्हणाला, ‘आवं सरपंच, सरकारनं चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली.’
सगळे कुजबुजू लागले. चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली. लई भारी झालं असणार. अन् एकेकाच्या तोंडून प्रतिक्रिया येत राहिल्या तसे सरपंच बोलू लागले, ‘पायलं का गावकºयांनो? तुमाला उगाच वाटतं की, आमचं सरकार काहीच करत नाही. मुख्यमंत्री घरातून बाहीरच पडत न्हाईत म्हणून विरोधक निसती टीका करतात; पण चंद्रपुरातील दारूबंदी उटवून दाकवली की नाही?’
तसा सरपंचाचा खानदानी विरोधक असलेला जित्या उटला अन् म्हणाला, ‘तुमच्या सरकारचं हेच तर चुकतंय....’
तसं सरपंच खवळून म्हणाला, ‘काय चुकतंय रं?’
जित्या म्हणाला, ‘आता दारूबंदी उटवायचीच होती, तर फकस्त चंद्रपुरातलीच कशापायी? सगळ्या राज्यातली उटवाय नगं का? विदर्भातल्या लोकांचे लाड हुतात अन इकडं पच्चिम माराष्ट्र, झालंच तर कोकण, मराटवाडा याचा कोणी इचार का न्हाईकेला? तुमच्या शीएमनं हा निर्णय घेताना संपूर्ण माराष्ट्रात दारूबंदी उठवणार, असा निर्णय घ्यायला पायजे होता.’
सरपंचानं डोक्याला हात लावला. तसा जित्या आणि त्याच्या कार्यकर्त्यांना चेव आला. जित्या भोवती ते समदे गोळा झाले अन् जित्या भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ हैं, कोण आला रे कोण आला? मान्याच्या वाडीचा वाग आला... हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं, भावी इतिहास हमारा हैं... अशा घोषणा सुरू झाल्या. तसे पंढरीनाथ माने ओरडून म्हणाले, ‘शांत ºहावा जरा... काय कालवा चालवलाय इनाकारन?’
तसा देन्या म्हनाला, ‘पर म्या म्हणतो, सरकारला दारूबंदी उटवायचीच हुती, तर आदुगर घातलीच कशापायी?’
तसा तिरपागडा पांडुतात्या म्हणाला, ‘ मला इचार ते मला इचार...’ सगळ्यांच्या माना आता पांडुतात्याकडं वळल्या. तसा पांडुतात्या म्हणाला, ‘आरं त्या चंद्रपुरात दारूच्या गुत्त्यावर येणारे दारूडेलईच दंगा करायचे. मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणून त्या अड्ड्यावर जायचे. कोणी म्हणायचे मी पुन्हा पिईन मी पुन्हा पिईन. मी पुन्हा पिईन.’ मग काय.... त्या पिणाºयानं पुन्हा पुन्हा येऊन दंगा करू नये, आपलं वजन वाडवू नये म्हणून त्यांच्याच गावातील लोकांनी त्याला रोखायचं ठरवलं. अन् मी पुन्हा येऊ नये म्हणून गावात दारूबंदीच केली.’
‘लेका... अस्सं झालं व्हय? पर मंग आता दारूबंदी उठवली म्हणजे..ते पुना येनार, ते पुना येणार. ते पुना येणार का?’
रंगा माने म्हणाला, ‘व्हय... ते पुना पेणार ते पुना पेणार...’
आता जित्या माने चवताळलाच. ‘बस करा आता त्या चंद्रपुराचं कौतिक.. आदी आपल्या गावाचं बोला... आपल्या गावातलीबी दारूबंदी उटली पायजे. फकस्त चंद्रपुरातली दारूबंदी उटवून सरकार हा सर्वसामान्य माणसांवर अन्याय करत आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार म्हंजी लढणार...’
तशी अनेकांनी आपल्या मुंड्या हालवाय सुरुवात केली. खराय खराय... आपल्या बी गावात मान्याच्या वाडीतली दारूबंदी उटली पायजे. सरकार हा फकस्त चंद्रपुराबाबत निर्णय कसा काय घिऊ शकतं?
सगळीकडं निसती कुजबूज. आपल्या गावावर अन्याव होता कामा नये. विदर्भातले नेते आपल्या कामाला प्राधान्य देतात. सगळे जण येक हुनशान ही बंदी उटवतात. पक्षभेद विसरून दारूबंदीसाटी समदे एक झाले. अशी एकजूट आपल्या गावात का नगं? आपल्या खासदाराचं, आमदाराचं मतदारसंघाकडं दुर्लक्षच हाय. दारूबंदी उटली नाय, तर गावात गरिबांनी प्याचं काय? गोरगरीबांचं हुणार कसं? येक ना अनेक मतं व्यक्त हुयला लागली. तसं सरपंचाचं टकुरच उटलं. सरपंच जोरात ओरडला, ‘आरं शान्यांनो, गप्प बसा की वाईच... आता माझी सटकली...’
सगळं येकदम शांत झालं. तसं सगळीकडं पहात सरपंच म्हणाले, ‘काय यो कालवा चालवलाय इनाकारन? समद्या पक्षांच्या, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींच्या नावानं बोंबलून झालं ना तुमचं आता? आता म्या काय इचारतो आन सांगतो ते सांगा...’ सरपंचाला यवडा खवाळलेला कदीच पायला नव्हता कुणी... आता सरपंच काय बोलतात हे पहायला सगळे सरसावून बसले, ‘आरं माझ्या गाववाल्यांनो, मागच्या महिन्यात चैत्री जत्रा झाली. आपल्या गावात घरटी येक लष्करात हाय.. लष्करातून सुट्टीवर आलेल्या जवानांनी आणलेले तुंबे या जत्रंत कुणी संपवलं? का आपोआप संपलं? पोळीच्या जत्रंला सगळ्यांच्या शेळ्या झाल्या व्हत्या... पर मटनाच्या जत्रंला हे तुंबे पिऊन गावातलं सगळं तरुण वाघ झालं व्हतं ना? खाल्ल्या आळीतला कंन्ट्रीबारला गेल्याशिवाय येरवी तुम्ही घरात जात न्हाय... शेरात कामावरून येणारी येताना आपली चपटी घिऊनच येतात. परत्येकजन आपापल्या घरात बसून पित हातच ना? मग काय दु:ख हाय तुम्हाला? आपल्या मान्याच्या वाडीत दारूबंदी कदी केलीच नव्हती, तर ती उटवायचा प्रश्न येतोच कुटं? आपण सगळी जण नियमीत पित हाओत, सगळं कसं गुमान चाललंय, तर ये दारूबंदी उटली पायजे म्हणून कशापायी कांगावा चालवलाय? ’
आता सगळ्यांच्या टकुºयात प्रकाश पडला. दारूबंदी उठवण्यासाठी अगोदर दारूबंदी करावी लागते. मग जित्या जोरात ओरडला, ‘जितेंगे भाई जितेंगे.. अरे हम ही जितेंगे.... आपल्या गावातली दारूबंदी उठवण्यासाठी आंदोलन करायचं असंल, तर सर्वात परथम आपल्याला अगुदर दारूबंदी केली पायजे. तवा म्या सर्वांना आवाहन करतो की, येत्या ५ तारखेच्या आत मान्याच्या वाडीतील समस्त महिलांनी आडवी बाटली आंदोलन करावे हो... ’
समद्या मान्याच्या वाडीनं या आंदोलनाला पाठिंबा दिला, कारण त्यांना भविष्यात दारूबंदी उठवा आंदोलन करायचं होतं.
प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा