कलर्स मराठी वाहिनीवर २८ डिसेंबर, २०२०पासून जय जय स्वामी समर्थ ही मालिका सुरू झाली. पाच साडेपाच महिन्यांच्या कालावधीत या मालिकेने चांगली पकड प्रेक्षकांच्या मनावर घेतली आहे. श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज अशा विभुतींवर मालिका, चित्रपट आल्यावर त्यांना प्रतिसाद मिळतोच; पण तो कायम टिकवणे फार आव्हान असते. मी मराठीवर यापूर्वी श्री स्वामी समर्थ यांच्यावर ‘कृपासिंधू’ नावाची मालिका काही वर्षांपूर्वी होती. त्या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. दत्त संप्रदाय आणि त्यातील अवतारांपैकी श्री स्वामी समर्थ हे अलिकडच्या काळातील श्री नृसिंह सरस्वतींचे पुढचे अवतार असे मानण्यात येत असल्यामुळे त्यांच्या जीवनावर चित्रपटही अनेक आले आहेत; मात्र दीपक देऊळकर यांनी संपूर्ण दत्त चरित्र आणि अवतारावार आधारीत मालिका दोन वर्षांपूर्वी सुरू केली ती मात्र अगदी सुमार आणि कल्पनेच्या पलिकडची होती. विसंगत कथानक आणि काळाचा ताळमेळ नसल्यामुळे रचलेले काल्पनिक कथानक अरेबियन नाईटसच्या कथांमध्ये नेले. त्यामुळे प्रेक्षकांनी त्या मालिकेकडे साफ पाठ फिरवली आणि मालिका बंद करावी लागली. त्या तुलनेत ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका चांगली पकड घेत आहे हे विशेष.
शिरीष लाटकर यांनी या मालिकेची पटकथा आणि कथानक मांडले आहे, तर विकास पाटील यांचे संवाद आहेत; पण यातील जमेची बाजू म्हणजे श्री स्वामींची मुख्य भूमिका करणारे कलाकार अक्षय मुडवाडकर यांनी समजून केलेली भूमिका हे आहे. बाकीच्या पात्रांमध्ये चंदाची भूमिका करणाºया विजया बाबरने अतिशय सहजपणे काम केले आहे. चोलोप्पाच्या भूमिकेतही त्याचा आत्मविश्वास आणि श्रद्धा हे दिसून येते. एकूणच चोलप्पा, चंदा, कृष्णप्पा यांचा एकीकडे असलेला स्वामींवरचा विश्वास विरुद्ध राधा, रामाचार्य, दाजिबा सरकार, कालिंदी यांचा खुनशीपणा यातील संघर्षही यात थीम ठेवली आहे. तर येसू, राधाबाई, हरी सुतार, रामाचार्याची बायको यांच्यातील द्विधा मन:स्थिती हा या मालिकेचा आलेख आहे. त्यातून कळत नकळत स्वामींकडून होणारे चमत्कार ही या मालिकेची जमेची बाजू ठरत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना ही मालिका जवळची वाटते.
स्वामींचा विचार हा अंधश्रद्धेवर प्रहार करणारा होता आणि माणसातील, प्राण्यांमधील देव ओळखा हे सांगणारा होता आणि दगडाच्या मागे धावू नका हे सांगणारा आहे, असे या कथानकातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच दाजिबा सरकार आणि रामाचार्य यांनी चालवलेला देवीचा बाजार हा कसा अंधश्रद्धा निर्माण करणारा आहे हे या मालिकेतून दाखवून दिले आहे.
यात कालिंदी त्या चंदाचा इतका छळ करते आहे; पण ती चंदा स्वामींच्या भरवशावर सगळा छळ निमूटपणे सहन करते आहे. त्याच चंदावर दाजिबा सरकारचा डोळा आहे. ही सगळी कथानकातील विकृती आणि चंदाच्या मनातील स्वामींच्यावरील असलेली भक्ती यांच्यातील संघर्ष म्हणजेच ही मालिका आहे. अनेक प्रसंग काल्पनिक आणि कथानक रंगवण्यासाठी घुसडले असले, तरी अशा मालिकांमध्ये ते खपून जातात. त्यापैकी पाट्यावर मिरच्या वाटून त्याचे लाडू तयार करून हिरव्या मिरच्याचे लाडू मुकाट्याने खा असा आदेश देणारी कालिंदी आणि ते लाडू सावत्र आईच्या धाकाला घाबरून तिने खाणे हे प्रसंग कमालीचे अतिरंजीत वाटतात; पण तरीही ही मालिका काहीतरी तत्वज्ञान देऊन जाते. स्वामींच्या तोंडूनच ‘कालिंदी ही व्यक्ती नाही, तर प्रवृत्ती आहे. समाजात ती ठिकठिकाणी दिसणार. तिच्या तावडीतून तुम्ही सुटायचा प्रयत्न केला, तरी ती दुसºया रूपात येणार’ हे सांगून दाजिबा सरकारकडे नाईलाजाने दासी म्हणून जाणाºया चंदाला स्वामींनी दिलेला आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे.
दाजिबाने पंढरपूरला जाणाºया भक्तांवर कर लावला आहे, कर देण्यासाठी पैसा नसल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी तळमळणारी चंदाची मावशी जनी आणि तिला स्वामींनी पंढरपुरात नेईपर्यंत केलेली मदत हे वातावरण भक्तिमय होते. चंदाची मैत्रीण सुंदरी ही गरीबीपोटी आपल्या आई-वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा बनून दत्तक जाते आणि दत्तक गेल्यावर ती मुलगा नाही तर मुलगी आहे, हे रहस्य समोर आल्यावर दाजिबा सरकार तिला फाशीची शिक्षा देतात. त्यावेळी सुंदरी या मुलीचे मुलात रूपांतर करण्याचा स्वामींनी केलेला चमत्कार, असे प्रसंग प्रेक्षकांना स्वामी चरित्राकडे खेचणारे आहेत. भातुकलीच्या खेळात मुलं खेळत असताना त्यांनी आणलेल्या मेव्यातील बोरं खाण्याची इच्छा सोवळी असलेल्या राधाबाईला खावीशी वाटणे आणि स्वामींनी पाण्याच्या ग्लासात ती पाठवणे हे चमत्कार प्रेक्षकांना खिळवणारे ठरतात. कथानकाची रंजकता वाढवतात. राधाबाईची मजा करण्यासाठी स्वामींनी तिची चूल विझवणे आणि तिने कांगावा केल्यावर ती चूल विझवलीच नव्हती हे दाखवून राधाबाईची गंमत करणे हे रंजकता निर्माण करणारे प्रसंग आहेत; पण इतके दाखले देऊनही आणि घरात कोणी नसताना ९ मैलांवरच्या गोंधळाचा आभास स्वामींनी राधाबाईला दिल्यावरही स्वामींचे महत्त्व तिला पटत नाही हे भरकटलेपणाचे लक्षण यातून दाखवले आहे. राधाबाईची भूमिकाही अत्यंत सहजपणे केलेली आहे.
या सगळ्या जमेच्या आणि आवडीच्या बाजू असल्या, तरी काही गोष्टींवर टीका करणे अपरिहार्य आहे. करायची म्हणून ती केली जाणार नाही; पण ठसकेबाज संवाद हवेत म्हणून कालिंदीच्या तोंडी सतत येणारे ‘माझ्याशी वाकडं, त्याची मसनात गेली लाकडं’ हे काय किंवा दाजिबा सरकारचं सारखं असलेलं पालुपद म्हणजे, ‘दाजिबाचा सुभा तिथं नाही कुणाला मुभा’ म्हणून तो जो पत्र्यावर पत्रा घासल्यासारखा हसतो किंवा मिक्सरच्या भांड्यात खारकांची पावडर करताना ब्लेडमध्ये खारकेची बी अडकल्यावर जसा अंगावर शहारा आणणारा आवाज उमटतो, तसे ते हसणे बिभत्स या प्रकारात वाटते. रामाचार्य कधीकधी पाहताना वाटते की, हे महाशय अजूनही ‘होणार सून मी या घरची’मधले ‘अनिल आपटे’च आहेत. त्या भूमिकेतून ते अजूनही बाहेर पडले नाहीत असा अभिनय होतो; पण तरीही ही मालिका प्रेक्षकांना गेल्या सहा महिन्यांत आवडते आहे. १३० पेक्षा जास्त आजपर्यंत या मालिकेचे एपिसोड झालेले आहेत. त्यामुळे कथानक बºयापैकी पुढे सरकले आहे. स्वामींच्या अक्कलकोटमधील २२ वर्षांचा कालावधी यात येणार असल्यामुळे ही मालिका दीर्घकाळ चालू शकते. फक्त त्यातील अतिरंजीतपणा आणि काळाचे भान सांभाळणे गरजेचे आहे.
प्रफुल्ल फडके/ छोटा पदडा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा