आजची ग्रामपंचायतीची सभा चांगलीच गाजणार होती, कारण होतंही तसंच. कोणतीही साथ आली, लाट आली, फॅड आलं, खूळ आलं की ते लगेच मान्याच्या वाडीत आलंच पाहिजे, असा अट्टाहास या गावात होता. एकापेक्षा एक विचित्र माणसांचं हे गाव. त्यामुळंच सरपंचानं शहरातनं फ्लेक्स तयार करून आणले अन् गावात ठिकठिकाणी लावले. बसस्टॉपवर लावला, ग्रामपंचायतीच्या दारात लावला, पारावर लावला, शाळेपाशी लावला सगळीकडे बॅनर. लवकरच होणार मान्याच्या वाडीचे नामांतर.
मान्याच्या वाडीचे नामांतर हुनार म्हणल्यावर समद्या गावात खळबळ माजली. नाव बदलणार, नाव बदलणार, कशाचं नाव बदलणार, गावाचं बदलणार का अशा चर्चा सुरू झाल्या अन् कसलाही भोंगा न फिरवता, कसलीही नोटीस न लावता ग्रामसभेला जमावेत, तसे सगळे गावकरी जमा झाले. सरपंच लईच खूश झाला. गावकºयांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असे वाटून सरपंच हिुंदराव मानेऐटीत आला. गावकºयांना बघून खूश झाला. मिशांवरून हात फिरवला आणि रांगड्या भाषेत बोलाय लागला.
‘राम राम माज्या भावांनू, भईनींनो.... माज्या प्रेमापोटी निसत बॅनर पावून तुमी समदी जमला म्हनून माझं उर अक्षरश: भरून आलंय बगा... लई आनंद झाला मला. मला वाटलं बी नव्हतं की, इकत्या झटाकदिशी न बोलीवता समदा गाव गोळा हुईन म्हणून... त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं मी आबार मानतो. आता मला सांगा... गावात झळाकलेलं ब्यानर सर्वांनी पायलं हायत, तर काय वाटतं तुमाला भावांनो?’
तसा पुढं येत दौलती म्हणाला, ‘नामांतर समजलं पण कसलं ते काय बी कळालं न्हाई.’
‘येडा का.. हाहाहा... आवं दौलतराव... आपण आपल्या मान्याच्या वाडीचं नाव बदलणार हाओत. आता मोटमोटे नेते, राज्यात गावांची, शेरांची नाव बदलतात. अलाबादचं प्रयागराज झालं, औरंगाबादचं संभाजीनगर झालं, सगळीकडं चाललंय मग आपण तरी का कमी असावं?’
सरपंचाचं वाक्यही पूर्ण झालं नाय तवरच विरोधीपक्ष नेता जित्या माने बोलायला आला. ‘आमचा याला तीव्र इरोध हाय... गावात पाचशे उंबरा मान्यांचा हाय. सिक्सीट पर्सेंटपेक्षा जादा माने हायत... तवा मान्याच्या वाडीचं नाव बदलून देणार न्हाय.’
तसे सरपंच भावूक झाले. डोळ्यात पानी आणलं अन् म्हणाले, ‘माज्या सन्माननीय विरोदी पक्ष नेते जितुभाउंना मी सांगू इच्छितो की, मी माज्या वडिलांना वचन दिलं हुतं. त्यांना मरण्यापूर्वी दिलेलं वचन पूर्ण करणं माझा पुत्रधर्म आहे, म्हणून माज्या वडलांचं नाव राम हुतं यासाठी आपण मान्याच्या वाडीला रामनगर असं नाव द्यावं.’
आता गावकºयांत चुळबुळ सुरू झाली. ती पाहून जित्याभाऊ थेट भिडलाच. म्हणाला, ‘आवं सरपंच... वडिलांना वचन दिलं म्हणून गावाचं नाव बदलाय निगालाय... पण निवडणुकीत मतदारांना दिलेल्या वचनाचं काय? येकदा तरी आपल्या घराचा झेंडा ग्रामपंचायतीत झळकवीन अन् सरपंच हुईन असा शबुद तुमी वडिलांना दिला. सरपंच हुन्यासाठी आगाडी तोडुन दुसºया गटात गेला, तरी आमी गप्प बसलो; पण जितंतिथं नाव लावायला लागल्यावर गब बसणार न्हाय. मान्याच्या वाडीचं नाव बदलून देणार नाय.’
सरपंच म्हनाले, ‘ये पगा... आरपारची लडाई आमी करू... आमची राज्यात सत्ता हाय... कुटंबी आमची नावं लावण्याचा आमाला लोकशाईनी अधिकार दिलाय. आमी कॅबिनेटमधी ठराव करू अन मान्याच्या वाडीचं रामनगर करणार म्हंजी करणारच.’
सरपंचांनी जाहीर केलं अन् निघून गेले. गावकरी मात्र कुजबुजत राहिले. गावाचं नाव काय झालं तरी बदलायचं नाय, असा परत्येकाच्या मनात विचार होता. जित्यानं तो हेरला अन् सभा पुढं चालू केली. ‘माज्या मान्याच्या वाडीतील बंधुंनो... सरपंचाच्या निष्क्रियतेमुळे गावावर नवं संकट आलं आहे. ते आपण एकजुटीनं मोडून काढायचं आहे. कोनत्याबी परिस्थीतीत मान्याच्या वाडीचं नाव बदलायचं नाही. हिंदुराव सरपंच झाल्यापासून ग्रामपंचायतीचा कारभार त्यांच्या वाड्यातून चालतो. तो पहिला बंद करायचा आणि ग्रामपंचातीयचा कारभार ग्रामपंचायतीच्या कार्यालयातूनच हुईल यासाठी आपल्याला पुढाकार घेतला पायिजे. उठसूट परत्येक ठिकाणी आपल्या बापाचं नाव देत असेल, तर आपण एक बी जागा बिननावाची ठेवायची नाई. यासाठी आपण सर्वात प्रथम आपल्या वाडीतील महत्त्वाच्या बाबींच्या नामांतराचं आरक्षण करून टाकू. सर्वांनी मला बहुमताने याला पाठिंबा दिला पाहिजे. तरच आपल्या मान्याच्या वाडीचं अस्तित्व टिकंल.’
सर्वांनी घोषणा सुरू केल्या, ‘जित्या भाऊ माने तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’...कोण आलारे कोण आला... मान्याच्या वाडीचा वाघ आला...., नही चलेगी नही चलेगी.... दादागिरी नहीं चलेगी... जोरदार घोषणाबाजीनंतर जित्याभाऊनं हात वर करून सर्वांना शांत केलं अन् बोलायला लागला.
‘मान्याच्या वाडीतल्या तमाम बांधवांनो आता कशाकशाचं नामांतर करून आपण त्यावर आपला हक्क दाखवायचं ते सांगतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला संमती द्या आणि एकमुखानं ठराव मंजूर केल्याचं जाहीर करा.
सर्वात परथम आपण आपल्या गावाच्या बसस्थानकाला दादासाहेबांचं नाव देऊ... म्हंजी पुना वडिलांना वचन दिलं म्हणून बसस्थानकाचं नाव बदलायला नको.’ सगळ्यांनी टाळ्या वाजवून होकार दिला.
‘आता आपल्या गावातली जी शाळा आहे, त्याला नानासाहेबांचे नाव देऊ....’ सगळ्यांनी टाळ्या वाजवून होकार दिला. जित्या खूश होत होता. सरपंचाची सगळी हवाच जित्या काडून घेत होता. जित्या म्हणाला, ‘आता गावातला जो वडाचा पार आहे त्याला आपण मामाचा पार, असे नाव देऊया’
पर जित्या भाऊ, दौलत्यानं शंका विचारलीच...‘वडाच्या झाडावर पार बांधलाय म्हणून याला आपण वडाचा पार म्हणतो आता मामाचा पार कसं म्हणायचं?’
‘ आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक मामासाहेब माने हे या पारावर नेहमी बसायचे म्हणून त्यांचं नाव द्यायचं.’ सगळ्यांनी माना डोलावल्या.
आता गावात येण्याचा जो मुख्य रस्ता आहे, त्याला आपण आपल्या आदरनीय, वंदनीय, पूजनीय अशा काही लोकांची नावे सुचवा.’
जित्याभाऊंनी प्रस्ताव ठेवला. तसा परबत्या पाटील म्हणाला, ‘म्या येकनंबर आयडीया सुचवतो...पटलं तर पगा...’
सगळ्यांनी सांगा सांगा म्हणून कालवा केला. तसा परबत्या म्हणाला, ‘मान्याच्या वाडीत येणाºया या रस्त्याला आपण आदरनीय, पुजनीय, वंदनीय मान्याची वाडी हृदयसम्राट सरपंचाचे वडील रामराव मान्याचं नाव देऊ.’
तसे सगळे आवाक् झाले. मान्याच्या वाडीला त्याचं नाव देण्यास विरोद केला अन् हितं त्यांच्या नावाचा आग्रह का धरला? सगळ्यांच्या मनातले भाव ओळखून परबत्या म्हणाला, ‘आपण गावात येतो तेव्हा चालत येतो, गाडीनं येतो, फटफटीवरनं येतो. त्या परत्येकवेळी या रामराव मान्याला पायानं तुडवल्याचा आनंद मिळेल, झालंच तर तंबाकू खाऊन आपण रस्त्यावरच थुंकतो... त्यानिमित्तानं या वंदनीय पूजनीय माणसाच्या रस्त्यावर थुंकून त्यांचा सूड उगवता येईल... आणि त्यांना रस्त्यावर आनल्याचा आनदबी मिळंल.’
इकतावेळ लांबून सगळं ऐकणारा सरपंच पळतच आला अन् म्हणाला, ‘समद्या गावकºयांच्या म्या पाया पडतो, माफी मागतो पण या रस्त्याला माज्या वडिलांचं नाव देऊ नका... मी मान्याच्या वाडीचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मागं घेतो... कोनीबी मान्याच्या वाडीचं नाव बदलणार न्हाई अशी ग्वाही देतो.’
अन् सगळ्यांनी टाळ्या वाजवून हा नामांतराचा विषय खोडून काढला. सरपंच अन् जित्याभाऊंनी कडकडून मिठी मारली अन् मान्याची वाडी शाबूत राहिली.
रविवारची कथा/ प्रफुल्ल फडके
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा