गुरुवार, १० जून, २०२१

पवार : द गेम चेंजर


आजकाल हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत चरित्रपट काढण्याची लाट आलेली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत महेंद्रसिंह धोनीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, अण्णा हजारेंपासून संजय दत्तपर्यंत अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट येऊ लागले आहेत. त्या चित्रपटांच्या नावातही इंग्रजी टॅग असते. महेंद्रसिंह धोनी-द अनटोल्ड स्टोरी..., अ‍ॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर मनमोहन सिंग वगैरे वगैरे. त्यामुळे राजकारणातील दिग्गज असलेल्या शरद पवारांवर जर असा चित्रपट बनवायचा झाला, तर त्याला नाव मात्र पवार-द गेम चेंजर असे काहीसे असेल असे वाटते. कारण ऐनवेळी खेळ खल्लास करायचा किंवा त्याचा मार्ग बदलायचा आणि कुणाचे कसे उट्टे काढायचे हे सगळे खेळ शरद पवारांइतके कोणालाच ठाऊक नसतील. मागच्या आठवड्यातील फडणवीस-पवार भेट असो, दोन महिन्यांपूर्वी अमित शाह-शरद पवार भेट असो, लोकांना चर्चेला विषय मिळतात आणि राजकीय समीकरणेही बदलतात. गेम कसा चेंज करायचा याची ख्याती असलेले शरद पवार केव्हा काय करतील हे सांगता येत नाही.


शरद पवारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी असाच एक गेम सुरू केलेला होता. त्या खेळाचे सूत्रधार होऊन सगळी प्यादीच नव्हे तर हत्ती, घोडे, ऊंट यांची ताकद मिळवून आपण वजीर होण्याचा पट त्यांनी मांडलेला होता. आघाडीतील घटक पक्ष म्हणून शरद पवारांचा राष्ट्रवादी लहान पक्ष असला, तरी देशातील शरद पवारांचे नाव मोठे आहे, तर आघाडीतील राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष त्यातल्या त्यात आकाराने मोठा दिसला, तरी राहुल गांधींची प्रतिमा छोटी आहे असे चित्र उभे करण्यात पवार यशस्वी झाले.

कोणत्याही परिस्थितीत महाराष्टÑात काँग्रेस वरचढ झाली नाही पाहिजे, काँग्रेसच्या मतांचा आपल्याला फायदा मिळाला पाहिजे, पण काँग्रेस आपल्या ताब्यात राहिली पाहिजे हे शरद पवारांचे गणित आहे. त्यासाठी राहुल गांधींचे महत्त्व कमी करण्यासाठी सोयीचे राजकारण करण्यातही त्यांनी धन्यता मानलेली दिसते. साहजिकच कधी कधी भाजपबरोबरही जवळीक असल्याचे चित्र निर्माण करण्याची त्यांची ख्याती आहे. शरद पवारांना भाजपची भीती नाही, शिवसेनेची तर बिल्कूल नाही. त्यांना भीती आहे ती काँग्रेसची. कारण राष्ट्रवादीची निर्मिती ही काँग्रेसमधून झालेली आहे. त्यामुळे त्यांचा पहिला शत्रू आणि आघाडीतील पहिला मित्र काँग्रेस आहे. त्यामुळे केव्हा त्यांच्याशी मैत्रीची सलगी दाखवायची आणि केव्हा त्यांचे पंख छाटायचे याचे तंत्र शरद पवार व्यवस्थित साधत असतात. त्यामुळे ऐनवेळी गेम चेंज करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.


कोणाला कधी डोक्यावर घ्यायचे, कोणाला कधी खांद्यावर घ्यायचे आणि कोणाला कधी गुडघे टेकायला लावायचे हे पवारांना बरोबर समजते. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीत तृणमूलची सत्ता येणार हे सर्वांनाच माहिती होते. आपले तिथे काहीही काम नाही याची पवारांना जाणीव होती. तरीही त्या निवडणुकीच्या प्रचाराला भाजपविरोधी मत तयार करण्यासाठी आपण जाणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यावेळी त्यांचे लक्ष भाजप नव्हते, तर कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमधून काँग्रेसचे नामोनिशाण राहिले नाही पाहिजे. भाजप आणि तृणमूल हे दोघेच चर्चेत राहतील, अशी व्यूहरचना केली गेली. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधून काँग्रेस उखडून टाकण्याचे आणि काँग्रेसची अवस्था प्रादेशिक पक्षासारखी करण्याचे बिज सर्व राज्यांत शरद पवार यांनी रोवले. त्यामुळेच दिल्लीतही काँग्रेस शिल्लक राहिली नाही. आपण मोठे होत नसलो, तर दुसºयाला छोटे करायचे धोरण आखून पद्धतशीरपणे राहुल गांधींचा बोनसॉय करण्याचा प्रकार शरद पवारांनी केला.

मंगेश पाडगांवकरांची एक कविता आहे, एक जिप्सी आहे माझ्या मनात दडून... ही जिप्सी म्हणजे समुद्रकिनारी वाळूमध्ये घर उभे करण्यात रमलेली मुले. आई-वडील किंवा बरोबर आलेली मोठी माणसं गप्पात गुंतलेली असताना ही मुलं हा खेळ खेळत किल्ला, घर तयार करतात. सुंदर कलाकृती निर्माण होत असतानाच आई-वडील म्हणतात, चला अंधार पडू लागला, जाऊया आता.. मग ते उभारलेले वाळूचे शिल्प, घर, किल्ला ती मुलं लाथेने उधळून लावतात आणि नष्ट करतात. आपल्या हातानेच उभारायचे आणि आपल्या हातानेच संपवायचे, या वृत्तीलाच कदाचित जिप्सी म्हणत असावेत. अशी जिप्सी शरद पवारांमध्ये चांगलीच दडलेली दिसून येते. त्यामुळे कोणता गेम केव्हा ते चेंज करतील हे सांगता येत नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार उधळून लावून महापालिका-नगरपालिका निवडणुका आणि राज्यातील विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यास भाग पाडण्याचे काम शरद पवार केव्हाही करू शकतात. शिवसेनेला ठाणे आणि मुंबई महापालिका महत्त्वाची वाटते. या निवडणुका जर एकदम झाल्या, तर शिवसेनेचे नेते प्रचारासाठी बाहेर पडू शकणार नाहीत. बाहेर पडले, तर महापालिकेवरचे लक्ष हटेल. अशी काही रणनीती त्यांनी आखली तर आश्चर्य वाटायला नको.


             शरद पवारांना खरं तर या पंतप्रधानपदाने वेळोवेळी हुलकावणी दिलेली आहे. १९९१ च्या राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमधून जी पहिल्या फळीतील नेतेमंडळी पंतप्रधानपदाचे दावेदार होती त्यात पी. व्ही. नरसिंह राव यांच्याबरोबरच प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि माधवराव शिंदे (सिंधिया) यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत होती. नरसिंह रावांचा नंबर लागला. १९९६ ची निवडणूक काँग्रेस हरल्यावर वाजपेयींचे आणि नंतर देवेगौडांचे सरकार आले. तेव्हा पवारांचे महत्त्व चांगलेच वाढले होते. भाजपचे प्रमुख विरोधक म्हणून शरद पवारांचे नाव झाले आणि नंतर १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत ते लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही झाले. त्यामुळे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ते होते. परंतु काँग्रेसमधील गांधीनिष्ठ काही नेत्यांनी सोनिया गांधींना पक्षाध्यक्षच केले आणि पंतप्रधानपदाचा दावेदारही केले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी असताना, वाजपेयींचे सरकार एक मताने कोसळवण्याची ताकद असलेल्या शरद पवारांनी आपला पंतप्रधानपदाचा मार्ग सोनिया गांधींमुळे रोखला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यातील जिप्सी जागृत झाली आणि हा उभारलेला किल्ला मोडला. १९९९ मध्ये वाजपेयी पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या झाल्या. पवारांची अवस्था अवघड झाली. पंतप्रधानपद नाही, विरोधी पक्षनेतेपदही गेले. हा या गेम चेंजर हीरोच्या जीवनातील फार मोठा धक्का होता.

म्हणूनच आता सावध पावले ते टाकणार हे नक्की. पुढील वर्षी २६ जूनला राष्ट्रपतीपदाची मुदत संपत आहे. पंतप्रधानपद मिळवणे शक्य नसले तरी देशातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपतीपद पदरात पाडता आले तर ठीक असेही त्यांच्या मनात असू शकते. पंतप्रधानपदाची हुलकावणी दिलेल्या प्रणव मुखर्जींना काँग्रेसने राष्ट्रपती केले. आता हे पद मिळवण्यासाठी शरद पवार भाजपशी जवळीक साधतात का हे पहावे लागेल. त्यामुळे या गेम चेंजर नेत्याचा नवा गेम काय असेल हे पहावेच लागेल.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: