राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप हे सरकार कोसळवेल, अशा आशयाच्या बातम्या येत राहिल्या. अनेकांनी भाकितेही केली; पण सरकार दीड वर्ष चालले आहे. हे सरकार पाच वर्ष चालेल, असा दावा शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. फक्त तसा विचार काँग्रेसकडून केला गेलेला नाही. अर्थात ज्या आघाडीत काँग्रेस दुय्यम स्थानावर असते तिथे पाच वर्षांचा काळ पूर्ण होण्याची अपेक्षाच करता येत नाही, कारण दीड वर्षानंतर काँग्रेस पाठिंबा काढून घेते. आजवर तसा इतिहास आहे. काँग्रेस १ नंबरवर असते, तेव्हा ते पूर्णकाळ सरकार चालवतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना १५ वर्ष त्यांनी राज्य केले; पण काँग्रेस बाहेरून पाठिंबा देते किंवा दुय्यम स्थानावर असते, तेव्हा ती सरकारे कार्यकाल पूर्ण करत नाहीत असा इतिहास आहे. त्यामुळे भाजपला आॅपरेशन लोटसची महाराष्ट्रात गरज पडणार नाही, तर ते काम काँग्रेसच आॅपरेशन हाताच्या पंजाने करेल, असे दिसते आहे.
कर्नाटकात जनता दलाचे सरकार काँग्रेसने असेच पाडले आणि येडीयुरप्पांना पुन्हा सत्तेवर येण्याची संधी दिली होती. केंद्रातही असे प्रकार कितीवेळा झाले आहेत हे पाहा. चरण सिंगांना पाठिंबा देऊन काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि मोरारजीभाई देसाई सरकार कोसळवले. ते सरकार चार महिनेही टिकले नाही. व्ही. पी. सिंग सरकार कोसळल्यानंतर चंद्रशेखर यांना राजीव गांधींनी पंतप्रधान केले. तेही सहा महिने सरकार टिकवू शकले नव्हते. तोच इतिहास १९९६ला देवेगौडांच्या बाबतीत झाला होता, तोच प्रकार इंद्रकुमार गुजराल यांच्या बाबतीत झालेला होता. तोच प्रकार कर्नाटक विधानसभेत कुमार स्वामींबाबत झाला होता. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते ज्या प्रकारे आक्रमकता दाखवत आहेत, वक्तव्ये करत आहेत, हे पाहता हे सरकार २०२२च्या महापालिका निवडणुकांपर्यंत टिकेल की नाही याची शाश्वती नाही.
सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसचे कमजोर झालेले संघटन मजबूत करण्यासाठी नाना पटोले हे राज्याच्या विविध भागांचा झंझावाती दौरा करीत आहेत आणि जिथे जातील तिथे स्वबळाचा नारा देत आहेत. त्यामुळे आघाडीत अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ते कधी पडेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, हे सांगता यायचे नाही. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडी सरकारच्या पालखीच्या भोयांची जबाबदारी अधिकच वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनात सरकार काम करीत आहे. अजित पवार हे जरी उपमुख्यमंत्री असले, तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा त्यांचाच दबदबा जास्त असल्याचे जाणवते. बहुतांश प्रमुख निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाखालीच घेतले जात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामानाने काँग्रेसला फार भाव दिला जात नाही. हीच खदखद बाहेर पडून काँग्रेस हे सरकार केव्हा कोसळवेल याची शाश्वती नाही. त्यामुळे भाजपकडून हे सरकार पाडण्यासाठी आॅपरेशन लोटस केले जाणे शक्य नाही. ते काम आॅपरेशन हाताच्या पंजानेच होईल. ही काँग्रेसची सवय आहे, त्यांचा तो छंद आहे. अस्थिरता हा काँग्रेसचा स्थायीभाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यार सतत टांगती तलवार ठेवणे हे त्यांचे आवडते काम असते. त्यामुळे सतत त्या चिंतेत त्यांना ठेवून आपले साधायचे ही त्यांची कार्यशैली आहे. त्यामुळे सध्याचे आरक्षण, ओबीसींचे प्रश्न, अशा अनेक परिस्थितीत जवळ आलेल्या महापालिका आणि वारंवार स्वबळाचा दिलेला नारा पाहता २०२२ या वर्षात हे सरकार प्रवेश करणार का हा प्रश्नच आहे.
अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासातच घेतले जात नसल्याने काही महिन्यांपूर्वी तशी तक्रारही बाळासाहेब थोरात आणि इतर नेत्यांनी सोनिया गांधींकडे केली होती. त्यानंतर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रदेश अध्यक्ष झाले आणि पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आक्रमक शैलीत काम करायला प्रारंभ केला. त्यांची ही आक्रमकता काँग्रेसला फायदा करून देईल असे चित्र उभे आहे, कारण अशाप्रकारे आक्रमक भाषा काँग्रेसमध्ये कधीच चालली नव्हती. काँग्रेसमध्ये आक्रमकता चालत नाही म्हणून तर नारायण राणे यांची नेहमी तिथे कोंडी होत होती. श्रद्धा आणि सबुरीवर काँग्रेस चालते. हे सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या लवचीकपणातून दिसते. तिथे ताठपणे जगणाºया नाना पटोले यांचे कसे चालेल? त्यामुळे ही आक्रमकता काँग्रेस स्वीकारणार आणि हे सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीत कुरघोडी करणार का हा खरा प्रश्न आहे; पण नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झालेली आहे हे नक्की. त्यामुळेच काँग्रेसला बाजूला करून आगामी काळात सेन-राष्ट्रवादी एकत्र येतील, असा सूर संजय राऊत यांनी आळवला होता. अशा सततच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे हे सरकार पूर्ण कार्यकाल चालेल, असे वाटत नाही. त्यामुळे कर्नाटक, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांत भाजपने आॅपरेशन लोटस यशस्वी केले असले, तरी महाराष्ट्रात त्यांना तशी संधी मिळणार नाही. सरकार स्थापनेची संधी शिवसेनेने हिरावून घेतली, तर पाडण्याची संधी काँग्रेस हिरावून घेईल हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा