काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काश्िमरातील कलम ३७० विषयी क्लबहाऊस चर्चेत केलेल्या एका विधानामुळे चांगलाच वाद रंगला आहे. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर कलम ३७० च्या निर्णयाचा आम्ही फेरआढावा घेऊ, असे विधान त्यांनी त्या कार्यक्रमात केले होते. दिग्विजय सिंह यांचे हे विधान भारत विरोधी असून, पाकिस्तानशी त्यांनी हातमिळवणी केल्याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर केली आहे. अर्थात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा तर प्रश्न येतच नाही; पण संपूर्ण देशहितासाठी आणि देशाच्या अस्मितेसाठी भारताचेच काश्मीर आहे यावर शिक्कामोर्तब केलेले असताना ते पुन्हा पाकिस्तानच्या, दहशतवाद्यांच्या घशात घालण्याचा काँग्रेस नेत्यांचा निर्धार हे देशासाठी घातक आहे. त्यामुळे असे विधान करणाºया दिग्विजय सिंहांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
तसे दिग्विजय सिंह हे वादग्रस्त विधाने करण्यासाठी आणि मुर्खासारखे वागण्यात तरबेज आहेत. आपण राहुल गांधींच्या अतिशय जवळचे आहोत, त्यांच्या थिंक टँकपैकी एक आहोत हे भासवून राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यात जी चौकडी होती त्यात दिग्विजय सिंह हे आघाडीवर होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने नेहमीच प्रश्न गुंतागुंतीचे करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढायचा नाही आणि तो प्रश्न वादग्रस्त बनवत ठेवायचा, ताटकळत ठेवायचा ही काँग्रेसची रणनीती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न असाच साठ वर्ष रेंगाळत ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले. त्यामुळे या त्यांच्या रेंगाळत ठेवण्याच्या प्रवृत्तीचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून जनतेने दूर केलेले आहे. आपल्या साठ-सत्तर वर्षांच्या कारकीर्दीत काश्मीरचा प्रश्न सोडवावा हे कधीच काँग्रेसला वाटले नाही. तेथील पंडितांची वाताहात लावली आणि काश्मीर जे या देशाचे नंदनवन होते ते दहशतवाद्यांचे रण करण्याचे काम काँग्रेसने केले. आता तो प्रश्न नरेंद्र मोदी सरकारने सोडवला आहे, तर परत त्याचा गुंता करण्याची निती काँग्रेस आखणार असेल आणि काँग्रेस पुन्हा ३७० कलम लादण्याचा अजेंडा आगामी निवडणुकीत आणणार असेल, तर या देशातून ही संपूर्ण काँग्रेस उखडावी लागेल.
पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिग्विजय सिंह यांनी हे विधान केल्याचे भाजपने समोर आणले आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. त्या चर्चेत दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे की, कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय दु:खद निर्णय होता. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्िवटरवर प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या अडाणी माणसांना इंग्रजी शाल आणि कन्सीडर या शब्दांचे अर्थ समजत नाहीत. संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, दिग्विजय सिंह यांनी त्या कार्यक्रमात भारतावर गरळ ओकली आहे. त्यांचे पाकिस्तानशी संगनमत झाले आहे, असे यातून दिसत आहे. याच नेत्याने यापूर्वी केलेल्या अन्यही वादग्रस्त विधानांचे दाखले यावेळी दिले.
मोदींच्या विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे नेते चीन आणि पकिस्तानशी संगनमत करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसने आपल्या पक्षाचे नाव बदलून अँटी नॅशनल क्लब हाऊस असे ठेवावे, अशी उपरोधिक सूचनाही त्यांनी केली. भाजपचे नेते गिरीराज किशोर आणि किरेन रिजीजू यांनीही दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.
दिग्विजय सिंह यांच्या तोंडून काँग्रेसच्या पोटातलं ओठात आलेले आहे. काँग्रेसचा हाच अजेंडा असणार आहे. त्यामुळे देशहितासाठी आता काँग्रेस पूर्णपणे संपवणे हाच यावर उपाय असू शकतो. खरं तर असा देशद्रोहाचा खटाटोप काँग्रेस करणार असल्याची वाच्यता दिग्विजय सिंह करणार असतील, तर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे मणिशंकर अय्यर यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती त्याप्रमाणे दिग्विजय सिंहांवर काँग्रेसने कारवाई करून ही चूक सुधारण्याची गरज आहे. नाहीतर कोणत्याही प्रचारासाठी, संपर्कासाठी काँग्रेस नेते जनतेसमोर येतील, तेव्हा प्रत्येकाने त्या काँग्रेस कार्यकर्त्याला विचारले पाहिजे की, काय तुम्ही काश्मीरला भारतापासून वेगळा करणार का? हाच तुमचा अजेंडा आहे का? असे असेल तर तुम्हाला आम्ही कायमचे लांब ठेवतो. काँग्रेसच्या पोटातील ओठावर आणून दिग्विजय सिंहांनी उरली सुरली काँग्रेस संपवण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे, असेच वाटते. त्यामुळे उरली सुरली लाज वाचवायची असेल, तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी दिग्विजय सिंहांवर कारवाई करण्याची गरज आहे.
काँग्रेसचा हा पेपर वारंवार फुटत आहे याचे कारण पक्षाला नेतृत्व नाही. नेतृत्व नसल्याने सगळे जण आपणच पक्षाचे मालक आहोत, असे बोलायला लागले आहेत. कुणी स्वबळाची भाषा करतो आहे, तर कुणी काश्मीर भारतापासून वेगळे करण्याची भाषा करतो आहे. हे सगळे प्रकार म्हणजे वठलेल्या झाडाच्या उरल्यासुरल्या फांद्याही कापून टाकण्याचा प्रकारच म्हणावा लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा