मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर महाराष्ट्रात दाखल झाला. पहिल्या पावसाअगोदर प्रि मान्सून होणार, अतिवृष्टीचा इशाराही दिलेला होता, त्याप्रमाणे तो दाखल झाला आणि मुंबईची दाणादाण उडाली. मुंबई महापालिकेचा आणि महापालिकेच्या बोलघेवड्या नेत्यांची निष्क्रियता या पहिल्याच पावसात तरंगत वर आली. अगदी लोण्याचा गोळा ताक घुसळल्यावर यावा त्याप्रमाणे या पावसात मुंबई महापालिका आणि महापालिकेवर राज्य असणाºया शिवसेनेची निष्क्रियता दिसून आली. पहिल्याच पावसात मुंबई इतकी तुंबली की, वर्षभर महापालिकेने काही कामच केले नाही याचे ते चित्र स्पष्ट झाले. ही महापालिका प्रशासनाची अक्षम्य चूक आहे.
केरळहून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता अधिक वेगाने पुढे सरकत आहे. बुधवारी जोरदार पावसासह मुंबईत मान्सून दाखल झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे, तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडुप, घाटकोपर, चेंबूर या परिसरांतही पावसाची रिमझिम सुरू होती, मात्र बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासदेखील सुरुवात झाली. हे सगळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे दर्शन आहे. मुंबईत मान्सनचे आगमन झाल्यानंतर आता शहर आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पाऊस असाच सुरू राहिल्यास अनेक भागांमध्ये आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता, पण मुंबई महापालिकेची कसलीही तयारी नव्हती हे दिसून आले. खरं तर गेले दोन महिने लॉकडाऊन होता. लोक घराबाहेर पडत नव्हते. गर्दी नव्हती. ट्रॅफिक नव्हते. अशा परिस्थितीत महापालिकेने स्वच्छतेची, नालेसफाईची कामे केली असती तर बरे झाले असते. वर्षानुवर्ष ज्या भागात दादर, हिंदमाता पाणी साचते, अनेक लोकांचे बळी जातात त्या जागी पाण्याचा निचरा होण्याचे नियोजन करण्याची संधी महापालिकेला असतानाही महापालिका प्रशासन, महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी राजकारण करण्यात धन्यता मानली. दररोज सकाळी उठले की वाहिन्यांसमोर यायचे आणि केंद्राच्या नावाने शंख करायचा, हा एकच अजेंडा महापौरांनी राबवला. त्याऐवजी जर नालेसफाईचे आदेश दिले असते, ती कामे केली असती, तर मुंबईची ही अवस्था झाली नसती, पण सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेतली तर कोणी कौतुक करणार नाही, आपण चर्चेत राहणार नाही. त्यापेक्षा केंद्रावर टीका केलेली बरी, यात धन्यता मानली आणि मुंबईची तुंबई करून टाकली. त्यामुळे पहिल्याच पावसात शिवसेनेची निष्क्रियता दिसून आली. पहिल्याच दिवशी जनतेचे, प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या परिस्थितीला महापालिका जबाबदार आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात जनतेने स्वच्छतेची खबरदारी घेतली होती. लोक बाहेर पडत नव्हते. अशावेळी नालेसफाई, मुंबईत पाणी तुंबणाºया जागांची सफाई करणे सहज शक्य होते, पण या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष केले गेले आणि राजकारणात सगळा वेळ दवडला. त्याची शिक्षा आज सर्वसामान्य मुंबईकर भोगत आहे.
मुंबई महापालिकेवर अनेक दशके सत्ता शिवसेनेची आहे, पण इतक्या वर्षांत मुंबईत पाणी तुंबू नये आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये याची यंत्रणा महापालिकेला उभी करता आलेली नाही. केवळ भाषणबाजी करायची, माध्यमांमधून झळकायचे आणि थातूरमातूर बोलायचे, इतकेच वर्षानुवर्ष चालले आहे. मुंबईत पाऊस जोरदार असतो. कुठे बांधकामांना परवानगी द्यायची? पाणी कशामुळे तुंबते? वेळच्या वेळी नालेसफाई होते की नाही? मान्सूनपूर्व पावसाळी कामे करणे आवश्यक असते. याची यंत्रणा महापालिकेकडे नसावी ही अत्यंत शरमेची बाब आहे. रस्त्याच्या कडेला झाडे असतात. त्याच्या फांद्या तुटून खाली पडतात. झाडे उन्मळून पडतात. नाल्यांमध्ये काय काय पडत असते. त्यासाठी झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. धोकादायक फांद्या कापण्याची गरज असते. यासाठी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नसावी, यासारखी चिंताजनक बाब कोणती नसेल.
चार वर्षांपूर्वी एक कलाकार रेडिओ जॉकी असलेल्या मुलीने मुंबईतील खड्डे, तुंबणारी मुंबई यावर टीका करणारे गाणे गायले होते, तर त्या रेडिओ कलाकाराला ट्रोल केले होते. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी तोडफोड, दहशत निर्माण करणे आणि धाक दाखवणे यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा जर नालेसफाईकडे लक्ष दिले असते, तर बरे झाले असते. वर्षानुवर्ष हे चित्र बदलत नाही. २00५ च्या २६ जुलैला मुंबईत ढगफुटी झाली होती. त्यानंतरही आम्ही काही शहाणपणा घेणार नसू आणि मुंबईकरांच्या सुरक्षेचे प्रश्न सोडवत नसू, तर मुंबईकरांनी आता विचार केला पाहिजे. सुरक्षित हातात मुंबई सोपवण्यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे, असे म्हणावे लागेल. कोरोनाची साथ असताना, या नालेसफाई न झाल्यामुळे, पाणी तुंबल्यामुळे नवी रोगराई आली, तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? प्रत्येक गोष्टीत केंद्रावर ठपका ठेवणारे महापालिकेचे सत्ताधीश यातून काही बोध घेणार की, आपली निष्क्रियता झाकण्यात धन्यता मानणार आहेत?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा