यावर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे. पाऊस म्हटलं की गरमागरम चहा, कांदाभजी खाण्याची जी मजा असते तसाच पावसाचा पडद्यावरचा आनंद पाहणे हेही सुंदर असते. खरं तर पावसाचा आणि रोमान्सचा संबंध फार जवळचा आहे. प्रेमाचा संबंध हा पावसाशी असल्यामुळे चित्रपटातील रोमँटिक मूड आणि रोमान्स दाखवण्यासाठी चित्रसृष्टीला पावसातली गाणी दाखवायला नेहमीच आवडले आहे. ही पावसातली गाणी पाहताना प्रेक्षकांनाही आंतर्बाह्य आनंद मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकालाच ‘बरसात में हमसे मिले तुम सजन’, असे वाटू लागते आणि रोमँटिक मूडसाठी ही पावसातली गाणी आनंदाने पाहिली जातात.
चित्रपटातले पावसाळी गीत म्हटले की, सर्वांना सर्वात प्रथम आठवतो तो पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याचे ‘आराधना’ चित्रपटातील गीत. ‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना’ या गीताचे चित्रीकरण इतके रोमहर्षक घेतले आहे की, त्यातील राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर दोघेही लाजबाब दिसतात. पावसात भिजल्यानंतर भरून आलेली थंडी घालवण्यासाठी पेटवलेली शेकोटी आणि त्या शेकोटीच्या प्रकाशातील दृश्य पाहताना, जेव्हा किशोरकुमारचा श्वास सोडत येणारा आवाज ऐकायला मिळतो, तेव्हा प्रत्येकाचे भान हरपून जाते.
आणखी एका सुपरस्टारचे पावसातले भन्नाट गीत म्हणजे अमिताभ बच्चन यांचे. ‘नमक हलाल’ चित्रपटातील ‘आज रपट जाये तो...’ या गाण्याने १९८० च्या दशकात हंगामा केला होता. त्या काळातील तसे ते भडक रोमँटिक गाणे होते. पावसात भिजणारे अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांची दृश्ये, पावसातील प्रणय यावर टीकाही झाली आणि लोकांनी कौतुकही केले. विशेषत: त्यातील पदरापासून पूर्ण साडी उलगडत अमिताभने नाचणे, नाचताना डोळे बंद करून वर पाहणे आणि त्याला प्रत्युत्तरादाखल स्मिता पाटीलने खाली बघणे. नाचत-नाचत साडीच्या निºया सोडणे आणि बांधणे या सादरीकरणाने प्रेक्षक अवाक् झाले होते. या गाण्यात किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी अक्षरश: धमाल उडवून दिली होती. पावसाचा मनमुराद आनंद कसा घ्यायचा असतो, ते अँग्री यंग मॅन अशी ख्याती असलेल्या अमिताभ बच्चननी रोमँटिक होऊन दाखवून दिले होते.
जम्पिंग जॅक अशी इमेज असलेल्या एव्हरग्रीन जितेंद्रने किती वेळा पावसात भिजण्याचा आनंद घेतला असेल हे त्यालाही आठवणार नाही, पण तरुणपणात आणि मध्यमवयातही त्याने पडद्यावर सादर केलेली पावसातील रोमँटिक गीते ही सदाबहार म्हणूनच वर्णन करावी लागतील. यातील पहिले गीत आहे ते १९७० च्या दशकातील ‘हमजोली’ या चित्रपटातील. ‘हाय रे हाय, निंद नहीं आए...’ या पावसातील प्रणयगीतात जितेंद्र आणि लिना चंदावरकर यांनी प्रेक्षकांना वेडं केलं होतं. नाचता-नाचता बैलगाडी खाली बसणे, पावसामुळे खेकडा बाहेर येणे या दृश्यांनी या गाण्याची लज्जत वाढवली होती. रफी-लता यांच्या अजरामर गीतांपैकी एक गीत म्हणून या पावसाळी गीताला आजही पसंती दिली जाते. जितेंद्रचेच आणखी एक पावसाळी प्रेमगीत म्हणजे मौसमी चॅटर्जी हिच्याबरोबरचे ‘मेघा रे मेघा रे.. आज तू प्रेम का संदेश बरसा दे...’ हे ‘प्यासा सावन’ चित्रपटातील गीत. अत्यंत संयमीपणे पावसात हलकेच शिडकावा घेत भिजवणारे हे प्रेमगीत तमाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले एक गीत म्हणून त्याचे वर्णन करावे लागेल.
आपल्या कल्पक आणि देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा निमार्ता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे मनोजकुमार. देशभक्तीबरोबरच त्याला प्रेमाची भूकही फार असायची. त्यामुळे त्याच्या चित्रपटातील पावसाचे प्रेमगीत हे नेहमीच सुपरहिट असायचे. ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातील ‘हाय हाय ये मजबुरी,’ हे त्यापैकी पहिले गीत. झीनत अमान आणि भारतकुमार अर्थात मनोजकुमारच्या प्रेमाचे हे गीत अतिशय सुंदर असे तत्कालीन तंत्रज्ञानाप्रमाणे चित्रीत केलेले आहे. पहिल्यांदाच या चित्रपटात प्रणयगीतासाठी म्हणून मल्टीइमेजचा वापर केलेला होता. प्रेक्षकांना हे गीत नेहमीच पाहायला आवडले आहे. विशेषत: झोपाळ्यावर झोके घेत झिनतचे भिजणे पाहताना प्रेक्षकांना खूप आवडायचे. म्हणजे तोपर्यंत त्रिमिती म्हणजे थ्री डायमेन्शन चित्रपटाचा शोध लागलेला नव्हता म्हणून, नाहीतर झिनतचा तो झोका आपल्यापर्यंत यावा, असे प्रत्येकाला वाटून गॉगल लावून त्या झोक्याला जोजवायचा प्रयत्न प्रत्येकाने केला असता.
मनोजकुमारनेच देशभक्तीच्या चित्रपटातून आणखी एक दिलेले लोकप्रिय गीत म्हणजे ‘क्रांती’ चित्रपटातील ‘जिंदगी की ना तुटे लडी, प्यार कर लो घडी दो घडी’ हे गीत. ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करणाºयांना गुलाम बनवून जहाजावरून नेत असताना या जहाजावर भरपावसात बेड्या बांधून असलेले मनोजकुमार आणि हेमामालिनी यांच्यावरचे हे प्रेमगीत प्रेम आणि देशभक्ती दाखवून देणारे उत्तम गीत आहे. लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांचे हे गाणे प्रचंड गाजलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणतात तो कृष्णधवल चित्रपटांचा काळही पावसात भिजलेला आहे. राज कपूरच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याची लज्जत अजूनही कायम आहे. १९५५ साली निर्माण झालेल्या या चित्रपटातून छत्रीत राज कपूर-नर्गीस यांचे जाणे आणि पाण्यातच ‘हम ना रहेंगे, तुम ना रहेंगे फिर भी रहेंगी निशानिया’ या कडव्याने रेनकोट घालून जाणारी ३ बालके म्हणजे प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाची प्रतीकेच दाखवली आहेत.
राज कपूरला पाण्याचा मोह कायमच असल्यामुळे पावसातील त्यांचे आणखी एक खास गीत म्हणजे ‘चोरी चोरी’ या चित्रपटातील १९५६ सालात प्रदर्शित झालेले ‘ये रात भिगी भिगी’ हे गीत. हे गीतही लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनीच गायलेले असून राज कपूर, नर्गीस या अजरामर जोडीवर चित्रीत झालेले आहे. या गाण्याचे संगीतकारही शंकर-जयकिशनच असून, गीत हसरत जयपुरी यांचे आहे.
कुठेही गाण्याच्या भेंड्या असतील किंवा अंताक्षरी असेल, तर एक गाणे हमखास असते. कारण ड अक्षर आल्यावर त्या गाण्याशिवाय अंताक्षरी पूर्णच होत नाही. ते म्हणजे राज कपूरच्या १९६० सालच्या ‘छलीया’ चित्रपटातील गीत. हे पण पावसातले गीत आहे. फक्त ते द्वंद्वगीत नाही, तर एकट्या मुकेशच्या तोंडून आलेले हे गीत आहे. ते म्हणजे ‘डम डम डिगा डिगा, मोसम भिगा भिगा,’ हे गीत. याशिवाय राज कपूरने आपल्या महत्त्वाकांक्षी आणि त्यांच्या आयुष्यात उलथापालथ करणारा चित्रपट म्हणजे ‘मेरा नाम जोकर’मध्येही पावसातले गीत आहे. ‘अंग लग जा बलमा’ हे गीत पद्मिनी या अभिनेत्रीवर चित्रीत झालेले असून, आशा भोसले यांनी ते गायलेले आहे. राज कपूरच्या चित्रपट कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘बरसात.’ या चित्रपटाचे नावच बरसात असल्यामुळे त्यात पावसाचे गाणे असणार हे सांगायलाच नको. त्यातील हसरत जयपुरींचे नर्गिस, निम्मी, राज कपूर आणि प्रेमनाथ यांच्यावर चित्रीत झालेले लता मंगेशकर यांचे गीत म्हणजे ‘बरसात में, हम से मिले तुम..’ हे गीत.
याच दशकात अष्टपैलू कलाकार असणाºया किशोरकुमारची निर्मिती असलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. १९५८ सालच्या या चित्रपटात किशोरकुमार आपल्या अशोककुमार आणि अनुपकुमार या भावांसह आहे. यात त्याची नायिका मधुबाला आहे. तिच्यावर चित्रीत झालेले ‘एक लडकी भिगी भागी सी,’ या गाण्याचा आवाज अर्थातच किशोरकुमारचा आहे आणि त्याला संगीतबद्ध केले आहे ते एस. डी. बर्मन यांनी. हळुवार प्रेमाचे हे गीत पाहताना फार मजा येते.
राज, देव आणि दिलीप यांच्या कारकिर्दीत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणे तसे सोपे नव्हते, पण त्या काळातील वेगळ्या वाटेने गेलेला म्हणूनच महिला आणि तरुणवर्गात लोकप्रिय ठरलेला नायक म्हणजे शम्मी कपूर. १९६० साली आलेले त्याचे पावसातले गीत म्हणजे ‘दिल तेरा दिवाना’ या चित्रपटातील ‘दिल तेरा दिवाना है सनम..’ हे गीत. शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचा आवाज होता मोहम्मद रफी यांचा. अनेक दशकांच्या या हिंदी रुपेरी पडद्यावर शेकडो पावसाची गीते आहेत. त्यातील सगळ्याच गाण्यांचा उल्लेख करणे शक्य नाही.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा