रविवार, ६ जून, २०२१

ऐतिहासिक भाषण


रविवारी रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. अर्थात हा संवाद पंधरा दिवसांनी लॉकडाऊन वाढवला आहे हे सांगण्यासाठी होता. तो ते एका वाक्यात सांगू शकले असते; पण त्यांनी ज्याप्रकारे हा संवाद साधला ती चाळीस मिनिटे महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी लागतील इतकी सुंदर होती.

आपल्याकडे सूरगाठ, उकल असे करून सांगायची प्रथा पूर्वी होती. तो प्रकार अवलंबत त्यांनी हा संवाद साधला. म्हणजे पहिली पंधरा मिनिटे वाटले की, हा संवाद साधण्याचा विषय वेगळा असेल कदाचित. त्यांना लॉकडाऊनवर बोलायचेच नसेल;


पण जवळपास एक महिन्याने ते संवाद साधायला आले आणि त्यांनी पूर्ण महिनाभराचा संवाद साधून घेतला. महिनाभरातील सगळ्या बातम्या सांगितल्या. घटनाचा आढावा घेतला. हे सांगताना त्यांची देहबोली इतकी आत्मविश्वासपूर्ण होती की, तीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रदीप भिडे बातम्या सांगतात अशाच प्रकारे ते बोलत होते.

सगळ्या बातम्या सांगून झाल्यावर त्यांनी मग पुन्हा आठवडाभरातील गोष्टी इतक्या छान सांगितल्या की पूर्वी दर रविवारी दुपारी दीड वाजता मुकबधिरांच्या बातम्या असायच्या. मागून एक बाई डिक्टेट करायच्या आणि समोर बसलेली बाई हातवारे करत, बोटं मोडत खाणाखुणा करून त्या शब्दांना मुकबधिरांच्या भाषेत समजावायचा प्रयत्न करायची. अगदी थोडावेळ तसेच वाटले. म्हणजे राज्यातील जनता मुकबधीर आहे. आपण काहीही केले तरी चालते; पण जे केले आहे ते समजले पाहिजे हे त्यांनी अगदी आळवून आळवून सांगितले.


पुढची पंधरा मिनिटे हे भाषण किंवा संवाद म्हणजे एखादी डॉक्युमेंटरी असावी आणि त्याचे मागून निवेदन असावे तशाप्रकारचे होते, म्हणजे पूर्वी कोणत्याही चित्रपटगृहात भारतीय समाचार चित्र यायचे किंवा त्याला इंडियन न्यूज असेही म्हणायचे. त्यावेळी पडद्यावर काहीतरी महिनाभरातील घटना दाखवली जायची आणि त्याचा एका विशिष्ठ अशा आवाजात मागून निवेदन यायचे. त्याप्रकारे कोव्हीड काळात सरकारने आॅक्सीजन, रेमडेसिवीर, लसीकरण, बेड याबाबत काय केले आणि कोरोनावर मात कशी केली याची डॉक्युमेंटरी आकडेवारीसह वाचून दाखवली. जवळपास यात अडतीस मिनिटे गेल्यावर शेवटच्या दोन मिनिटांत लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढवला आहे, हे सांगून मोकळे झाले. जे काम केवळ दोन मिनिटांचेही नव्हते आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते ते सांगण्यासाठी तब्बल चाळीस मिनिटे घेण्याचे अतिशय सुंदर कसब त्यांच्यात होते. असे कसब फार कमी लोकांमध्ये असते. भाषण सुश्राव्य असल्यावर सगळेच ऐकतात, म्हणून तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाळीस मिनिटांच्या भाषणात कसा वेळ गेला हे समजायचे नाही. राज ठाकरे बोलायला लागल्यावर कधी भाषण संपूच नाही असे वाटते; पण ही संगळी हसत खेळत, टोमणे मारत, चिमटे काढणारी भाषणे असतात. त्यामुळे ती रंगणे स्वाभाविक असते; पण कोव्हीडसारखा कंटाळवाणा विषय घेऊन त्यावर पाऊणतास जनतेला खिळवून ठेवणे सोपे नसते. ते अशक्य असे काम त्यांनी करून दाखवले.

वादळाला नावे कशी पडतात, ते तौक्ते वादळ हा शब्दही म्हणायला कसा अवघड आहे आणि त्याचा उच्चारही आपल्याला करता येत नाही हे त्यांनी इतक्या छानपणे कबूल केले. हे सौजन्य फार थोड्या लोकांमध्ये असते. त्यांच्या कोकणातल्या दौ‍ºयावर नारायण राणे यांनी टीका केली होती. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता भाष्य केले. माझा धावता दौरा होता; पण मी त्या तौक्तेवादळाची मिनिटामिनीटाला माहिती घेत होतो, हे सांगून टीका करणाºयांची तोंडे बंद करण्याचा सुरेख प्रयत्न केला. आपण जनतेशी संवाद साधायला आलो आहोत, त्याचा मुद्दा वेगळा आहे; पण तो बाजूला ठेवून आधी सगळे हिशोब चुकते करायचे आणि मग मुख्य मुद्दा शेवटी सांगायचा आणि वेळ मारून न्यायची ही त्यांची मुत्सद्देगिरी ज्येष्ठ राजकारणी शरद पवारांनाही जमेल की नाही याबाबत शंका आहे, कारण शरद पवार जेव्हा बोलतात तेव्हा ते फक्त मुद्याचे बोलतात. त्यांना पाल्हाळ लावून बोलायला आवडत नाही. स्पष्टपणे मत मांडतात आणि जनतेला समजते.


त्यामुळे रविवारचे हे भाषण राज्यातील एका मुख्यमंत्र्यांचे ऐतिहासिक भाषण या सदरात नोंदवावे लागेल यात शंकाच नाही. शेवटी त्यांनी कसेबसे सांगितले की, आता पर्यायच नाहीये. अजून पंधरा दिवस लॉकडाऊन लावावाच लागणार आहे. या लॉकडाऊनला त्यांनी अतिशय गोंडस शब्द दिला आहे. कडक निर्बंध, म्हणजे नागडा आहे म्हणणे अवघड जाते, म्हणून वस्त्रविरहीत आहे, असे म्हणायचे तसाच हा प्रकार आहे. जनतेवर निर्बंध लादले आहेत; पण जनता सहकार्य करते आहे असे म्हणायचे. जनतेची मुस्कटदाबी होते आहे; पण तो उपचाराचा भाग आहे असे म्हणायचे. महिनाभराने जनतेला सामोरे जाणे तसे सोपे नव्हते; पण जनतेला जे ऐकायचे होते ते न ऐकवता फिरून फिरून आडवळणाने आम्ही किती छान काम करत आहोत हे सांगण्याचे कसब फार वाखाणण्यासारखे होते.

वेळ निघून गेल्यावर उपचार करून उपयोग नसतो, अशा आशयाची ‘बैल गेला अन् झोपा केला’ ही म्हण आपल्याकडे आहे. कोरोनाकाळात आपल्या देशात, राज्यात, शहरांत, गावागावांत जे काही चालले आहे, त्या सगळ्यासाठी ती चपखल आहे. कोरोना आल्यापासून म्हणजे १६ महिन्यांपासूनच त्यासाठी आवश्यक धोरण, व्यवस्था, समन्वय, राजकीय प्रगल्भता, सामाजिक-आर्थिक भान यांची वानवा ठळकपणे जाणवते आहे. मग ते वर्षापूर्वीचे लॉकडाऊन, अनलॉक असो, लसीकरण, मदत पॅकेज असो की प्राणवायू, औषधी पुरवठा; सर्वच पातळ्यांवर कमालीचा गोंधळ दिसला. त्यातच निवडणुका, धार्मिक कार्यक्रमांची भर पडली. कोरोना आला तेव्हा केंद्राने सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवत लॉकडाऊन जाहीर केला. त्यातून मजुरांचे स्थलांतर, उद्योगांचे हाल, अर्थचक्राला खीळ अशा अनेक समस्या उद्भवल्या. हे ताकही फुंकून प्यायचे, अशा भूमिकेतून दुस‍ºया लाटेत सारी जबाबदारी राज्यांवर ढकलली. लसीकरणाच्या बाबतीतही असेच झाले.


सुपर स्प्रेडर ठरू शकणारा १८ ते ४५ वयोगट लसीकरणापासून दूर ठेवण्यात आला. मग दुस‍ºया लाटेचा आग्यावेताळ अंगावर येऊ लागताच १ मेपासून या वयोगटाला लस देण्याचा निर्णय झाला. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कोरोना रुग्णसंख्या घटली तेव्हा सर्व यंत्रणा गाफील राहिली. दुसरी लाट येणार हे जगातील सर्व तज्ज्ञ सांगत असताना, आपण ५ राज्यांतील निवडणुकांचा घाट घातला. या सगळ्याचा गोषवारा काढत जे अफलातून भाषण केले त्याला तोडच नाही. विशेष म्हणजे पूर्वी मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे किमान मर्द, मावळे, नामर्द हे शब्द त्यांच्या तोंडून किमान पाचसहा वेळा यायचे; पण हल्ली त्यांनी या मर्दानगीला तिलांजली देऊन भाषण करण्यास सुरुवात केली आहे, हे महाविकास आघाडीचे खरे फलीत आहे.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: