शुक्रवार, १८ जून, २०२१

आता कसोटी विश्वचषकाची!


एकदिवसीय, टी-२० या सर्व प्रकारातील विश्वचषक भारताने जिंकलेले आहेत. आजपासून प्रथमच कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. त्या चषकावर भारताने आपले नाव सर्वात प्रथम कोरावे ही तमाम भारतीयांची इच्छा आहे. म्हणूनच भारतीय संघाला आपण शुभेच्छा देऊया. अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतासमोर आहे. इंग्लंड, आॅस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंडलाही हरवून भारताला विराट सेनेला एक मोठा विक्रम करायची संधी आज प्राप्त झालेली आहे. त्याचे सोने ही विराट सेना करेल यात शंकाच नाही.


आपल्याकडे क्रिकेट या लोकप्रिय खेळातील सर्वात महत्त्वाचा आणि आदर्श प्रकार मानण्यात आलेल्या कसोटी क्रिकेटच्या विश्‍वचषक विजेतेपदासाठी आजपासून इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम सामना खेळण्यात येत आहे. कसोटी क्रिकेटसाठी खेळला गेलेला हा पहिलाच विश्‍वचषक स्पर्धा अंतिम सामना असल्यामुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानावा लागेल. क्रिकेट क्रीडा प्रकारातील एकदिवसीय क्रिकेट असो किंवा टी-२० क्रिकेट असो, या क्रिकेटची विश्‍वचषक स्पर्धा यापूर्वी अनेक वेळा खेळवण्यात आली आहे, पण आयसीसीने दोन वर्षांपूर्वी कसोटी विश्‍वविजेतेपदाची जी प्रक्रिया सुरू केली ती आता आज अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे आणि भारत किंवा न्यूझीलंड यांपैकी एका संघाच्या गळ्यात विश्‍वविजेतेपदाची माळ पडणार आहे. अर्थात भारताच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी भारतानेच हा विश्‍वचषक जिंकावा, अशी अपेक्षा असणे साहजिक आहे. त्यांच्यात तशी धमक आहेच.

विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जर हा विश्‍वचषक पटकावला तर क्रिकेटच्या सर्व प्रकारातील विश्‍वविजेता होण्याचा मान भारतीय संघाला मिळणार आहे. आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय क्रिकेटचा विश्‍वचषक आणि एक वेळा टी-२० क्रीडाप्रकारातील विश्‍वचषक जिंकणाºया भारतासाठी हा अनोखा विक्रम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्या संधीचे सोने विराट सेना करेल यात शंकाच नाही.


गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये भारताने जगातील सर्व देशांबरोबर कसोटी क्रिकेट खेळून त्यांना नामोहरम करूनच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तरी अंतिम सामना शेवटी महत्त्वाचा असतो. या सामन्यामध्ये कोण कशी कामगिरी करतो यावरच या सामन्याचा आणि विश्‍वविजेतेपदाचा निकाल लागणार असल्याने सर्वांच्या नजरा या सामन्याकडे राहणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताला या अंतिम सामन्यात ज्या संघाशी लढत द्यायची आहे तो न्यूझीलंडचा संघ अत्यंत तुल्यबळ आहे. २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक हातातून निसटल्यामुळे, प्रयत्नांची पराकाष्टा करूनही नशिबाने ती संधी हुकली. त्यामुळे कसोटी विश्वचषक मिळवण्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न असणार आहे. भारताबरोबर हा अंतिम सामना खेळण्यापूर्वी न्यूझीलंडला इंग्लंडमधल्या दोन कसोटी सामन्यांचा अनुभव मिळाला आहे. त्यापैकी एका सामन्यामध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत केले आहे. त्यामुळे निश्‍िचतच त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. इंग्लंडमधील वातावरणही न्यूझीलंडच्या खेळाडूंना जास्त पोषक आणि ओळखीचे आहे. तो संघ गेल्या काही दिवसांपासून तिथे स्थिरावला आहे, तर भारतीय संघाला आयपीएल, कोरोना ही अडथळ्यांची शर्यत पार करून तिथे पोहोचावे लागले आहे. तरीही विराट सेना ही अत्यंत मजबूत असल्याने हा सामना भारत जिंकेलच असा विश्वास बाळगून भारतीय संघाला शुभेच्छा देऊया.

आयपीएल टी-२० या सामन्यांच्या थोड्या अतिरेकाने भारतीय खेळाडूंना मैदानावर टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. टी-२० चा सततचा सराव आणि जलद खेळणे आणि प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा लागलेला नाद हा कसोटीसाठी तसा घातक असतो. कसोटीत ठामपणे मैदानावर टिकून राहणे महत्त्वाचे असते. आजकाल बहुतेक कसोटी सामने हे तीन दिवसांतच संपतात. पाच दिवसांचा कालावधी खेळलाच जात नाही. त्यामुळे फलंदाजांची मोठी खेळी, विक्रम हे कसोटीमध्ये कमी होताना दिसत आहे, पण या सगळ्यावर मात करून मैदानावर टिकून राहण्याची कसोटी सर्वात प्रथम भारतीय संघाला द्यावी लागणार आहे. त्यानंतरच धावा जमवणे, चेंडू अडवणे, बळी घेणे यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी संयमाची कसोटी असावी लागते. एकदिवसीय किंवा टी-२० मध्ये प्रेक्षक एखादा बॉल जरी डॉट गेला तरी चुकचुकतात. कारण १२० बॉल म्हणजे १२० षटके आहेत, त्यातील २० बॉल निर्धाव गेले, तर ती निर्धाव गेलेली षटके आहेत असा समज असतो, पण कसोटीत ती चिंता करायचे कारण नसते. एकदिवसीय सामना किंवा टी-२० हा निर्णायकच लागतो. कसोटीत अनिर्णित होण्याचा पर्याय असतो. कधी कधी हारत आलेला सामना अनिर्णित राखण्याचा केलेला प्रयत्न ही पण जीत असते. त्यासाठी विकेट टिकवणे महत्त्वाचे असते. बॉलर्स सामना जिंकून देतात, तर बॅट्समन सामना वाचवत असतात. हे कसोटीचे चित्र असते. त्यादृष्टीने बचाव करत आक्रमण केले, तर हा विजय आपल्याला अशक्य नाही. त्यामुळे भारतीय संघाकडून पहिला कसोटी विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे आणि ऋषभ पंत या फलंदाजांसोबतच रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाज असूनही अनेक वेळा उपयुक्‍त फलंदाजी करणारा रवीचंद्रन अश्‍िवन यांची अष्टपैलू उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. त्याच जोडीला जर जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि महंमद शमी या अनुभवी जलदगती गोलंदाजांची साथ लाभली, तर भारतीय संघ निश्‍िचतच समतोल आणि प्रबळ ठरेल यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: