आता संपणार लॉकडाऊन, उठणार निर्बंध म्हणत असताना पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे संकट समोर आहे. पुढच्या लाटेत राज्यातील ५० लाख लोक बाधित होतील, असा अंदाज व्यक्त केल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण तयार झालेले आहे. निर्बंध उठण्याचे, लोकल सुरू होण्याचे, जनजीवन सुरळीत होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. लसीकरणाचा वेग वाढत नाही. शहरी भागात लसींचा तुटवडा आहे. ही सगळी निराशा निर्माण करणारी परिस्थिती तयार झालेली आहे. म्हणजे एकीकडे देश कोविडच्या दुसºया लाटेतून सावरत असताना आता दुसरीकडे सरकारसमोर कोविडचा कचरा हे आणखी मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसºया लाटेत हजारोंचे प्राण गेलेले असताना, बायोमेडिकल कचºयातदेखील प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारतात वेगाने खाजगी, सरकारी व नर्सिंग होम आणि प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या; पण या कचºयाची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण झाली. या कचºयामुळे नव्या लाटांना आमंत्रण नको असे वाटते.
तत्कालीन परिस्थितीची ती गरज होती हे मान्यच; पण त्यामुळे तितक्याच वेगाने बायोमेडिकल कचरादेखील वाढत चालला आहे. कोरोना आणि ब्लॅक फंगसच्या संकटात इंजेक्शन, सुई, सिरिंज, ग्लुकोज आदींचा प्रचंड वापर वाढला आहे. परिणामी बायोमेडिकल कचरा ही मोठी गंभीर समस्या म्हणून समोर आली आहे. हा कचरा तिसरी, चौथी, पाचवी लाट निर्माण करेल का, अशी शंका आहे.
वास्तविक बायोमेडिकल हे 'यूज अँड थ्रो' आहे. एका पीपीई किटमध्ये गॉगल्स, फेस शिल्डस, मास्क, ग्लोव्हज, गाऊन, हेड कव्हर आणि शू कव्हर यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. पीपीईमुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले; पण वापरानंतर त्याचे रूपांतर हे सिंगल यूज प्लॅस्टिक, मायक्रोप्लॅस्टिकमध्ये होते. आपल्याकडे रिसायकलिंगसाठीची योग्य व्यवस्था नसल्याने त्यावर पुनर्प्रक्रिया करणेदेखील कठीण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सध्या जगभरात दर महिन्याला वैद्यकीय कर्मचाºयांना सुमारे ८ कोटी ग्लोव्हज, १६ लाख मेडिकल गॉगल्सबरोबरच ९ कोटींहून अधिक मेडिकल मास्कची गरज भासत आहे. ही उपलब्धता करताना पहिले फेकून दिलेले हे साहित्य म्हणजे कचरा असणार आहे. कोरोनाशी लढताना अनेकवेळा यावर कोरोनाचे जंतू असू शकतात. त्यामुळे हा कचराच भविष्यात घातक बॉम्ब ठरणार का, ही एक भीती आहेच.
केवळ कोविड कचराच नाही, तर एकूणच मेडिकल कचºयाचा धोका आहेच. सर्वसाधारणपणे जे थ्री लेअर मास्कचा वापर करत आहेत त्यांची संख्या, तर अब्जाच्या घरात पोहोचली आहे. बायोमेडिकल कचºयात कॅप्स, मास्क, प्लासेंटो, पॅथॉलॉजिकल कचरा, प्लास्टर आॅफ पॅरिस, आॅपरेशन केल्यानंतर बाहेर काढलेला अवयव, कालबाह्य झालेली औषधे, डायलिसीस किट, आयव्ही सेट्स, युरिन बॅग, केमिकल कचरा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. शास्त्रीय मार्गाने त्याची विल्हेवाट होत नसेल, तर ही बाब पर्यावरणाबरोबरच माणसासाठीही धोकादायक आहे. म्हणजे लसीकरण करायचे, औषधोपचार करायचे आणि ते रोगजंतू या कचºयाच्या रूपाने साठवून ठेवायचे हे फार मोठे संकट आहे. याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही, तर हा रोग सतत उसळी घेत राहील, म्हणून रोगाचे आणि या लाटांचे मूळ कारणच दूर केले गेले पाहिजे.
१९८०च्या दशकात तो झोंबिज द फ्लेश इटर नावाचा चित्रपट आला होता. तसा प्रकार या कोविडच्या बाबतीत व्हायला नको. मारून टाकलेले जंतू, व्हायरस, माणसांचे अवयव, कचरा आपल्याच जिवावर त्या झोंबिजप्रमाणे यायला नको. त्यासाठी कोविड कचºयाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
सगळ्या रोगांना निमंत्रण हे कचरा, घाण हेच आहे. आपल्याकडे कचºयाची विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र यंत्रणा असते. मेडिकलचा कचरा गोळा करणारी प्रत्येक शहरात स्वतंत्र यंत्रणा असते. दवाखाने, हॉस्पिटलचा कचरा सार्वजनिक कचºयातून नेला जात नाही, कारण इन्फेक्शन नको हा त्यामागचा हेतू असतो; पण आता रोगाचे आणि रोग्यांचे प्रमाणच इतके वाढले आहे की, कळत नकळत हा कोविडचा कचरा कुठेही जाण्याची शक्यता आहे. त्या कचºयातून नवा फैलाव झाला, तर फार मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. हा कचरा म्हणजे नव्या रोगाचे, नव्या लाटेचे बिजारोपण आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हा कचरा जाळून टाकूनच त्यातील रोगजंतू नष्ट होत असतात. हे ध्यानात घेतले पाहिजे, म्हणूनच ते जमिनीत पुरणे, गाडणे, कंपोस्ट करणे असले प्रकार करू नयेत. इतकेच नाही, तर कोविडच्या बाबतीत सर्वांनी धर्म, जात, चालीरीती बाजूला ठेवून शास्त्रीय दृष्टीकोन बाळगला पाहिजे. कोविड पेशंट मृत झाल्यावर तो कोणत्याही धर्माचा असला, तरी त्यावर अग्निसंस्कारच करायला हवेत. ते गंगेत सोडले, जमिनीत पुरले असले प्रकार बंद झाले पाहिजेत. यानेच रोगाचा जास्त प्रसार होताना दिसतो आहे.
या समस्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, तशाच त्या सामूहिक, सार्वजनिकही आहेत. आधीच आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छतेबाबत उदासीनता आणि बेजबाबदारपणा दिसून येतो. आपल्या घरातला कचरा उंबºयाबाहेर कुठेही टाकणे ही बहुतेकांसाठी वैयक्तिक स्वच्छतेची व्याख्या आजही कायम आहे. याला गरीब-श्रीमंत असा कोणताही अपवाद नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळातही आपल्याला कचरापेट्यांमध्ये मास्क, गाऊन्स, असे पिशव्यांमध्ये बांधून किंवा उघड्यावर टाकलेले दिसून येतात. यामुळे कोविडचे संकट वाढण्याची शक्यता असते, हे माहीत असूनही याबाबतच्या जबाबदारीचे भान अद्यापही समाजाला आलेले नाही. आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छतेची साक्षरता नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा