झी मराठीवरील मालिकांचा दर्जा दिवसेंदिवस इतका घसरला आहे की, काहीही दाखवलं तरी चालतं असा भ्रम या निर्माता, दिग्दर्शक, लेखकांचा झाला आहे. अतिशय अतार्किक, न पटणाºया घटनांचा मारा करणे हे ध्येय घेऊन ही वाहिनी मालिका लादत आहे असे वाटते. हे असेच चालू राहिले तर रिमोट प्रेक्षकांच्या हातात आहे, ते अशा वाहिन्या बघणे बंद करतील. कारण स्पर्धेतील अन्य वाहिन्यांकडे दर्जेदार मालिका असताना इथे अक्षरश: फालतुगिरी चाललेली दिसते आहे. अशीच एक मालिका म्हणजे ‘पाहिले न मी तुला’... म्हणजे प्रेक्षकांना वाटते की पाहिले मी का तुला असे त्या मालिकेला विचारावे.
या मालिकेचा निर्माता आदिनाथ कोठारे आहे. या मालिकेची निर्मिती संस्था कोठारे व्हिजन आहे. असे असताना कोठारे व्हिजनचा इतिहास पाहता ही अशी मालिका कशी काय दिली आहे याचे आश्चर्य वाटते.
तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली तेव्हा ही मालिका त्यातील कलाकार पाहता चांगली असेल असे वाटत होते. कारण या मालिकेचा जो हीरो आहे तो म्हणजे आशय कुलकर्णी हा आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका केली होती. त्यावेळीही तो प्रेक्षकांना हीरोपेक्षा अधिक आवडला होता. आपल्याकडे अशी म्हण आहे की, या जन्मीचं पाप पुढच्या जन्मी फेडावं लागतं. ‘माझा होशील ना’मध्ये त्याने इतका दुष्टपणा केला होता की, त्याचे पाप फेडायला त्याला ही मालिका मिळाली आणि शशांक केतकर त्याचा छळ करतो आहे, अशी भाबडी समजूत आता प्रेक्षकांनी करून घेतली आहे.
आशय कुलकर्णीच्या प्रेमात पडलेल्या तन्वी मुंडले (मानसी राजन देसाई) हिचे महत्प्रयासाने त्याच्याशी लग्न होते, पण तिच्या मागे लागलेला खलनायक शशांक केतकर (समर प्रताप जहांगिरदार उर्फ विजय धावडे) हा आपली एकेक कारस्थाने करत आहे. ही कारस्थाने करताना तो इतक्या खालच्या पातळीवर जाताना दिसतो आहे, पण मानसी मात्र सगळं सहन करून सहजपणे त्याला शह देताना दिसते. आशयला बिझनेस करायचा आहे. त्याला आपण मदत करणार असल्याचे सांगून हा समर जो काही प्रकार करतो ते न पटणारे आहे. म्हणजे एका भागात तुला बिझनेसमन व्हायचे आहे ना? मग सगळी कामं यायला पाहिजेत असे सांगून त्याला बादली देतो आणि टॉयलेट साफ कर असे सांगतो. हे किती अतार्किक आहे. कोणी तयार होईल का? पण हा नायक तयार होतो. अर्थात मानसीमुळे तो इथेही वाचतो, पण खालच्या पातळीवरचा छळ करणे हेच झी मराठीवरील मालिकांच्या खलनायकांचे वैशिष्ट्य झालेले दिसते.
म्हणजे अगदी त्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ती मालविका त्या दादांना सगळी सफाई करायला लावते. त्यांना धुळीचा त्रास होईल अशा फायली देते. अन्नपदार्थ तयार करणाºया कंपनीच्या फायलीत तेही आंतरराष्ट्रीय खूप श्रीमंत असलेल्या कंपनीत इतकी धूळ आणि कचरा असतो का? ती त्या मोहितला म्हणजे निखिल राऊतला सतत थोबाडीत मारते आहे. चपला, सँडल जोडे पुसायला लावते आहे. ज्याची पोस्ट मॅनेजर आहे अशा पोस्टचा माणूस इतक्या थपडा कशा खाईल? त्याला निर्मात्याने फक्त थपडा खाण्याचा रोल आहे असे सांगून या भूमिकेसाठी निवडले आहे का? खालच्या पातळीवरचा दुष्टपणा या मालिकांमधून पहायला मिळतो. आता त्या दुष्टपणात स्वीटूची आई घुसली आहे. ओमला फोन करताना दिसली म्हणून स्विटूचा फोनच तिने जाळून टाकला. किती फालतूगिरी आहे ही? ओमने त्याच्या घरी नलूचा वाढदिवस केलेला चालतो, ओमच्या घरी दादा म्हणजे आपला नवरा नोकरीला गेलेला चालतो, ओमसाठी मैत्रिणीशी अबोला असताना मालविकाच्या आग्रहासाठी पूजेला जाणे जमते, मग स्वीटू ओमशी बोलली तर इतका टोकाचा राग येतो की त्याचा फोन आगीत टाकते? म्हणजे मैत्रिणींचे संबंध सुधारल्यावर केलेली ही कृती जरा अतिच वाटते. म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध. म्हणजे एखादा प्रकल्प आला की, लगेच प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा काढणाºया मेधा पाटकरांची आठवण या नलूला बघून येते. कदाचित भविष्यात कोणी मेधा पाटकरांवर चित्रपट काढला, तर त्यात या नलूला मेधा पाटकरांच्या भूमिकेसाठी घ्यायला हरकत नाही. त्या सुतरफेणीसारख्या विस्कटलेल्या केसांवरून तरी तसंच वाटतं. त्यामुळे इथेही प्रेक्षकांना ‘पाहिले मी का तुला’ असेच म्हणावेसे वाटते.
‘माझा होशील ना’ या मालिकेतही ती सीमा देशमुख म्हणजे सिंधू जे काही चाळीत उद्योग करते आहे आणि आदित्य आणि सईला ज्याप्रकारे त्रास देण्याचा प्रकार करते आहे ते अत्यंत हास्यास्पद आणि न पटणारे असेच आहेत.
प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ नसतं असा विचार घेऊन ही मालिका सुरू होते. मग मनू आणि अनिकेतच्या भाबड्या प्रेमावर समरची जहरी नजर पडते. मनू आणि अनिकेत लपून लग्न करण्याचा निर्णय घेतात. मग एक संकटांची मालिका उभी राहते. यात सगळी समरची कारस्थाने सुरू होतात. मनू समरला ठणकावून सांगते, या जगापेक्षा अनिकेतसोबत असलेल्या मैत्रीचा अभिमान तिला जास्त महत्त्वाचा आहे. समरचा अहंकार मोडून मनूने अनिकेतचा स्वाभिमान जपण्याचे काम केले आहे, पण अनिकेतच्या यशासाठी मानसीची अग्निपरीक्षा सुरू आहे. आता आज वटपौर्णिमेचं व्रत मानसी करेल का, म्हणून सर्वांना चिंता लागली आहे. या सगळ्यात समर सतत कारस्थाने करतो आहे, पण ही सगळी कारस्थाने हिडीस अशी वाटतात. त्यामुळे खलनायकाच्या अभिनयाचे कौतुक करण्याची संधी न मिळता मालिकेची कीव करावीशी वाटते. त्यामुळे पुन्हा मनात येते पाहिले मी का तुला असा प्रश्न विचारला पाहिजे.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा