नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम असतानाच या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे. याच मागणीसाठी आता आंदोलन करण्यात येत आहे. आज दि. बा. पाटील यांची पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन उभं होत आहे. दहा तारखेला पनवेल, बेलापूर, नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी हे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यावर स्थानिक ठाम आहेत. शिवसेनाप्रमुख आणि दि. बा. पाटील दोन्हीही व्यक्ती श्रेष्ठ आहेत. दोघांचे कार्यही महान आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिवाजी पार्कवरील सभेस जसा लाखोंचा समुदाय जमायचा तसाच लाखोंचा समुदाय दि. बा. पाटील रस्त्यावर उतरल्यावर उत्स्फूर्तपणे उतरायचा. एक खुर्ची टाकून सिडकोच्या दारात दि. बा. पाटील बसले की, सगळ्यांना घाम फुटायचा इतकी गर्दी जमायची. त्यांचे कार्य खूपच मोठे होते म्हणून या विमानतळाला तेही रायगडात, त्यांच्या कर्मभूमीत होत असल्याने त्यांचे नाव असावे हा आग्रह आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अध्वर्यू अशी दि. बा. पाटील यांची ओळख सांगितली जाते. माजी खासदार, आमदार व पनवेलचे नगराध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलेले आहे. दि. बा. हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. दिबांचा जन्म जासई गावामध्ये झाला. त्यांनी पुण्यामध्ये वकिलीचे शिक्षण घेतले. पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावाशेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकºयांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाºया या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.
दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. दिबा उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मुद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत ते शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता.
आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकºयांच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकºयांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. २०१२ साली अखेरचा लढा देत जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भूखंडाची मागणी सरकारकडून मान्य करून घेतली. त्यामुळे आज या सगळ्या कर्मभूमीत होत असलेल्या प्रगती, विकास आणि जनतेला न्याय मिळवून देणाºया नेत्याचे नाव अजरामर व्हावे यासाठी या जनतेची विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव असावे ही अपेक्षा आहे.
१६ आणि १७ जानेवारी १९८४ साली दिबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याच दिवशी सध्या जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या नवीन शेवा गावात पोलिसांनी शेतकºयांवर पहिला गोळीबार केला होता. त्यानंतर पेटलेल्या या आंदोलनाने उग्ररूप धारण केल्याने १६ जानेवारी रोजी दास्तान फाटा येथे झालेल्या आंदोलनात दोन शेतकºयांनी हौतात्म्य पत्करले, तर दुसºया दिवशी १७ जानेवारी रोजी नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात तीन शेतकºयांनी आपले आत्मबलिदान केले होते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर फार मोठा लढा देऊन, संघर्ष करून न्याय मिळवून देणाºया नेत्याचे नाव त्यांच्या कर्मभूमीत उभारल्या जाणाºया विमानतळाला असावे अशी मागणी आहे. त्यात गैर काहीच नाही. विमानतळाचा प्रकल्प गेले दहा वर्ष चालू आहे. त्याचवेळी हे नाव निश्चित केले गेले होते, पण त्याचा कुठे सरकारदरबारी कोणत्याही नेत्याने पाठपुरावा न केल्याने तो प्रश्न प्रलंबित राहिला. त्यादरम्यान या विमानतळाला नाव देण्याचा विषय सरकारदरबारी आल्यावर कोणी तोंड उघडले नाही. शेकापचे जयंत पाटील, बाळाराम पाटील हे विधान परिषदेचे आमदार गप्प बसले. खरं तर आज शिवसेनाप्रमुख असते तर त्यांनी दिबांचेच नाव द्या, असा आग्रह धरला असता. पण कारण नसताना हा प्रश्न चिघळवला गेला आहे त्याचे वाईट वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा