रविवार, २७ जून, २०२१

मूल्यमापनाची गरज


सीबीएससी बोर्डाने बारावीच्या मूल्यांकनाचे सूत्र जाहीर केले. आज उद्या राज्याचा फॉर्म्युलाही जाहीर होईल; पण केवळ कोरोनामुळे ही तडजोड स्वीकारली आहे, असे न समजता आता इथून पुढे कायमच हे सूत्र वापरले, तर विद्यार्थीवर्ग सतत अभ्यास करेल. केवळ परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याऐवजी सातत्यपूर्ण मूल्यमापनाची गरज कोरोनाच्या संकटामुळे अधोरेखित झाली असल्याने, परीक्षा पद्धतीतील गुणदोषांवरही चर्चा होणे आवश्यक आहे; पण ही प्रथा कायमची केली तर जास्त बरे होईल. आपल्याकडे अकरावीचे वर्ष म्हणजे मजा करायचे वर्ष, रेस्ट इअर असे म्हटले जाते; पण अकरावी हा पण बारावीचा महत्त्वाचा पाया ठरणार असल्याने अकरावीलाही चांगले मार्क मिळवणे आता आवश्यक असणार आहे.


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेच्या निकालाचे सूत्र ठरल्याने, विद्यार्थी आणि पालक यांच्यात असलेला संभ्रम दूर झाला आहे. तसाच तो आता राज्यातील सूत्र आज जाहीर झाल्यावर होण्यास हरकत नाही. बहुदा हाच फॉर्म्युला राज्यात राबवला जाईल असे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रातच बदल होत असल्याने, परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, याविषयी गोंधळाचे वातावरण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आॅनलाइन बैठकीत १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सर्वच राज्यांच्या उच्च माध्यमिक मंडळांच्या १२वीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परीक्षा रद्द झाल्या, तरी या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी त्यांची गुणवत्ता कशी ठरवणार, हा प्रश्न होताच. विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी गुणवत्तेचे निकष ठरवण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन किंवा या विद्यार्थ्यांनी आधीच्या इयत्तांमध्ये केलेल्या कामगिरीवर आधारित त्यांचे मूल्यमापन हाच एक पर्याय होता; मात्र अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवायची, तर गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थी वार्षिक परीक्षा न देताच बारावीत आले होते. अनेक विद्यार्थी सीईटी, नीट यांसारख्या परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने, अकरावीत अपेक्षित अभ्यासाकडे त्यांचे दुर्लक्षच होते. त्यामुळे बारावीचे निकाल जाहीर करताना अकरावीचे गुण ग्राह्य धरले जाऊ नयेत, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती; पण बोर्डाच्या परीक्षेपेक्षा सीईटीला महत्त्व देणे हे चुकीचे आहे. अभ्यास हा ज्ञानसंपादनासाठी असला पाहिजे, गुण संपादनासाठी नाही. जर सीईटीला चांगले मार्क मिळवता येतात, तर बोर्डाच्या परीक्षेला का नाही? पण स्कोअरींगकडे लक्ष दिले जाते, पळवाटा काढल्या जातात त्यामुळे फसगत होते. एकूणच बारावीच्या परीक्षेतील मूल्यमापन करण्यासाठी विशिष्ट सूत्र असणे आवश्यक होते. त्यामुळे सीबीएसईच्या वतीने मूल्यमापनाचे वस्तुनिष्ठ निकष ठरवण्यासाठी १२ सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल दोन दिवसांपूर्वीच तयार केला होता; तथापि ही बाब या आधी सर्वोच्च न्यायालयात गेली असल्याने, न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हे निकष परवा जाहीर करण्यात आले. न्यायालयाच्या मान्यतेनुसार आता या निकषांच्या आधारे मूल्यमापन करून सीबीएसईचा १२वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावा लागणार आहे.

बारावीच्या निकालासाठी ३०-३०-४० हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या सीबीएसईच्या बारावीच्या निकालाच्या सूत्रानुसार विद्यार्थ्यांचे १०वी, ११वीच्या परीक्षांतील सर्वाधिक गुण मिळालेल्या विषयांचे गुण लक्षात घेऊन या कामगिरीवर त्यांना प्रत्येकी ३०-३० गुण देण्यात येतील, तर उरलेले ४० गुण बारावीत घेतल्या गेलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या गुणांच्या आधारे दिले जातील. विद्यार्थ्यांचे या तिन्ही इयत्तांतील कामगिरीच्या आधारे हे मूल्यमापन होणार असल्याने, त्याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण उरणार नाही; पण यामुळे ज्यांनी टाईमपास केलेला आहे, वर्षभर काही खास कामगिरी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. अर्थात त्याला तेच जबाबदार असतील. आपण कॉलेजला टाईमपास करायला येत नाही ही जाणीव, जबाबदारी असणे आवश्यक आहे. हाच फॉर्म्युला आता राज्य बोर्डानेही स्वीकारला तर ते उत्तमच आहे. पण हा फॉर्म्युला केवळ कोरोनाची तडजोड म्हणून न राबवता इथून पुढे कायमच ठेवला जावा. म्हणजे प्रत्येक वर्षी विद्यार्थी अभ्यास करतील आणि खºया अर्थाने ज्ञानार्जन होईल.


कोरोनाच्या काळात एकूणच शिक्षण क्षेत्रात झालेले बदल हे आता कायमस्वरूपी असतील याचे भान सर्वांनी राखले पाहिजे. त्याचप्रमाणे जर कोरोना आला नसता, तर पूर्वीचीच पद्धती राहिली असती, असेही समजणे बाळबोधपणाचे ठरेल. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला आॅनलाईन शिक्षणाला सामोरे जावे लागले असते. कोरोनामुळे ते गेल्यावर्षींपासून सुरू झाले इतकेच; पण खºया अर्थाने हा बदल केव्हा ना केव्हा होणारच होता. बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार आपण मूल्यावर आधारित शिक्षण, उपक्रमांवर आधारित शिक्षण गेल्या काही वर्षांपासून घेत आहोतच. फक्त पुस्तकी शिक्षण नाही, तर व्यावहारिक शिक्षण घेताना दिसतो आहोत. त्यामुळे आता गुणांना नाही, तर मूल्यांकनाचे महत्त्व वाढले आहे. वर्षभर झोपा काढायच्या, रात्रभर जागून अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळवायचे दिवस संपले आहेत. वर्षभर केलेल्या कामाचीच, प्रामाणिकपणाचीच पावती मिळणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: