रविवार, २७ जून, २०२१

अनलॉक मान्याची वाडी


मान्याच्या वाडीतील माणसं लई खूश व्हती. म्हंजी बातमीच तशी हुतीना. आज सक्काळ सक्काळ पेपरमदी आकडेवारी आली अन् जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५च्या आत आल्यानं समदा जिल्हा अनलॉक हुनार या बातमीनं गावकºयांना यकदम बाळसं धरल्यागतच झालं. आता मान्याची वाडी अनलॉक हुनार अन् पहिल्यागत हुंदडायला मिळणार म्हणून समदी लईच खूश झाली हुती.


गेलं काई महिनं ना शेरात जात येत हुतं ना कुणाला माहिरपणाला, पाहुणचाराला, जत्रंला बुलावता आलं. त्यामुळं घरोघर निसती चर्चा, अनलॉकचीच. परबत्या मान्याच्या घरात तर परत्येकजन आपल्याच नादात हुता. आता काय करायचं अन् काय नाय, याची जो-तो चर्चा करत हुता. परबत्यानं हातातला पेपर बाजूला ठिवला अन् म्हणाला, ‘चला... आता डोईवरचा भार कमी कराय हरकत नाई...’ त्याचं हे वाक्य पुरं हुईपातुर आतून कारभारीन वराडलीच, ‘तर तर.. घरात बसुनशान लई भार हुता कामाचा तुमच्या डोस्क्यावर...’ तसा लाडात हसत परबत्या म्हणाला, ‘अगं रानी, मला तसं न्हवतं म्हणायचं... आगं कित्येक म्हैन्यात केसं कापली न्हाईत, त्यानं लईच भार वाडलाय त्यो कमी करणार म्हणलं...’ ‘या बया... असं व्हय? मला वाटलं...’ लाजत कारभारीन म्हणाली तसा परबत्या म्हनाला... ‘नगं नगं.. कायबी बोलू नगं... ... म्या जातुय बग केसं कापाय आता..’ तसा समोर बसलेला किस्ना म्हणला, ‘वाट बगा... सकाळधरनं केसं कापायच्या दुकानात समद्या गावाची लाईन लागलीय... आत्ता तुमचा नंबर संद्याकाळपतुर लागत न्हाई...’ ‘आलेकालेकालेका...लईच प्रॉब्लेम की.. आत्ता कुटं अनलॉक झालं अन् लोकांनी इकती गर्दी केली?’

इकतावेळ ही चर्चा ऐकत बसलेला परबत्याचा धाकला पोरगा रम्या म्हणला, ‘आबा... फकस्त मान्याच्या वाडीतल्या लोकांचेच केस वाडत्यात का ओ?’


‘हेपा कायते.. कायबी कसं इचारतो रे?’ परबत्यानं हासत विचारलं तसा रम्या म्हणाला, ‘आवं शेरातून, मुंबईतून बी सलूनची दुकानं बंद हायत... मग हे टीवीपुडं येणारे नेते, फुडारी, टीवीवरचे लोक यांची ना दाडी वाडलेली दिसत ना केसं. मंग शेरातली दुकानं बंद तर हे लोकांचे केस कोण कापत हुतं? का वाडतच नाईत या लोकांचे केस? आता आपल्या पंतप्रधानांची दाडी वाडलेली दिसते पण बाकी कुणाचं काईच कसं वाडलं नाय?’

घरोघर मान्याच्या वाडीत अशीच चर्चा. अनलॉक तर हाय पण नेतेमंडळींच्या सभा, त्यांचे कार्यक्रम ठिक हुतात. त्यांची सौंदर्यसाधना नियमीत होते, पण गावातल्या लोकांना केसं कापायला दुकानं बंद. व्यायाम करायला परवानगी नाई. सकाळी सात ते अकराच काय ते खरेदी करा. आता शहरात जाऊन खरेदी करून यायचं म्हंजी आक्का दिवस जातो. मग हात हालवत दिवं मालवंत यावं लागतं नायतर काळ्या बाजारानं घ्यावं लागतं. हे नियम आपल्यालाच का? नेतेमंडळींना, राजकीय पक्षांना का न्हाईत? असा विचार घराघरात होऊ लागला अन् येकेकजन घराबाहीर पडू लागला.


गावच्या पारापाशी समदेजन गोळा झालं. परत्येकाच्या मनात हीच शंका हुती. आपल्या गावात तर चांगली हवा हाय. मोकळेपणा हाय. स्वच्छता हाय. तरीपन नियम, निर्बंध आपल्यालाच. पोराबाळांच्या शाळा बंद, शिक्षण बंद, कामधंदे बंद, शेरातल्या नोकºया बंद झाल्यानं समदी लोकं घरात बंद. पण जितं गर्दी हाय अशा शेरात तर समदं बिनबोभाट चाललंय. मग त्यांनी नियम तोडायचे आणि रोगाचा प्रसार हु नाय म्हणून आपली गावं बंद करायची. ह्यो काय प्रकार हाय? यो काय न्याय म्हणायचा काय? परत्येकजन कुजबुजत हुता.

आता या कुजबुजीचा फायदा घेत सरपंच माने पारावर उभे राहिले अन् त्यांनी सभाच सुरू केली. ‘मान्याच्या वाडीतल्या तमाम बंधुबगिनींनो... आपन सर्वांनी बातम्या पायल्या असतील. कुणी वाचल्या असतील. आता आपण ५ टक्क्यांच्या आत आलोय. त्यामुळे संपूर्ण अनलॉक झाल्याचं कलेक्टरनी जाहीर केलंय. तवा आता सर्वांनी जोमानं, आत्मनिर्भर हून कामाला लागलं पायजे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण हा बंद पाळला, म्हणून आपण यावर विजय मिळवू शकलो. आता गावच्या विकासासाठी सर्वांनी गटतट विसरून, पक्षभेद विसरून एकत्र यायला हवं.’ सर्वांनी टाळ्या वाजवल्या, तसा जित्याभाऊला जोर आला. तोही आता बोलायला उभा राहिला. सरपंचाच्या शेजारी जाऊन बोलू लागला, ‘जमलेल्या माझ्या तमाम मान्याच्या वाडीतील बंधुभगिनींनो.. सरपंचांच्या म्हणन्याला आमचं पूर्णपणे अनुमोदन हाय... आता काय बी झालं, तर आपण गप्प बसायचं न्हाय... आता आपण कायमचं अनलॉक हुन्याचाच निर्धार करायचा आहे. करायचा आहे, म्हणजे करायचाच आहे... आता कितवी बी लाट आली, तरी आपली जबाबदारी आपणच घ्यायची असल्यानं आता आजचं आपण निर्धार करायचा आहे की, मान्याची वाडी आता कायमसाठी अनलॉक असेल. आता आपण गावाचे हाल करून घ्यायचे न्हाईत. नेतेमंडळींचे सगळं नीट चाललंय, तर आपण का गप्प बसायचं? पुना निर्बंध आले, तरी आपण आपल्या जबाबदारीवर पूर्णपणे अनलॉकच व्हायचं.’


सगळ्यांनाच ही कल्पना आवडली अन् या अनलॉकनं फक्त सामान्यांचे नुकसान झाले. बाकीच्यांनी मात्र फक्त लुटालूट केली, आपली पोळी भाजून घेतल्याची भावना गावात परत्येकाच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे आता रडायचं नाही, लढायचं म्हणत घरात बसून नाही तर पुढच्या लाटेशी बाहेर पडूनच लढायचा निर्धार करत मान्याच्या वाडीतील सगळी दुकानं उघडली.

रविवारची कथा/ प्रफुल्ल फडके



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: