गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

विरोधकांची जबाबदारी


एखादी व्यक्ती अडचणीत असते, तेव्हा त्याला मदत करायची असते, चौकशी करून धीर द्यायचा असतो, काही पर्याय सुचवायचे असतात, सल्लामसलत करायची असते. त्याच्या अडचणींचा गैरफायदा घेत आपला स्वार्थ काही साधता येईल का हे पाहणे दुष्टपणाचे लक्षण असते. आज केंद्रात असो वा राज्यात विरोधी पक्षांचे हेच चुकते आहे. आज देशापुढे, राज्यापुढे अनेक संकटे आहेत, प्रश्न आहेत. या परिस्थितीत राजकारण सोडून सरकारच्या मदतीला येण्याचे मोठेपण विरोधकांनी दाखवायची गरज असताना दुष्टपणाचे राजकारण केले जात आहे, हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याने आपल्या जुन्या मित्र पक्षाला सध्या आपला विरोधक असला, तरी आपल्या अनुभवाचा फायदा देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नसलेल्या ताळमेळामुळे चुकीचे निर्णय घेतले जात असताना, संकटकाळात सल्ला देणे गरजेचे आहे. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकवेळा मागितला नसतानाही सल्ला देताना दिसतात. हे मोठेपण फडणवीस यांनी करण्याची आवश्यकता आहे.


म्हणजे, राज्यापुढील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी शासनास मदत करण्याऐवजी उखाळ्यापाखाळ्या काढण्यामध्ये विरोधक आपला वेळ खर्च करीत आहेत. जे केंद्रात राहुल गांधींची काँग्रेस करत आहे, तोच प्रकार राज्यात भाजप करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे भिन्न विचारधारेचे पक्ष आहेत, असे वाटतच नाही. याला झाकावा अन् त्याला काढावा अशी अवस्था आहे. विरोधकांनी आज संकटग्रस्त परिस्थितीतून देश, राज्य सावरण्यासाठी आपण काय केले असते, काय करू शकलो असतो हे सांगायला पाहिजे. सरकारशी बोलले पाहिजे. विरोधक म्हणजे लोकशाहीचा दुसरा स्तंभ आहे. तो इतका तकलादू मनोवृत्तीचा कसा काय असू शकतो? निंदकाचे घर असावे शेजारी आपण म्हणतो त्याप्रमाणे निंदकाच्या निंदेतून धडा घेऊन आपण आपली प्रगती करतो. तसे सरकार आणि विरोधक यांचे नाते असले पाहिजे. निंदा करणारे शेजारी संकटात मदतीला येत असतात. तसेच विरोधकांचे असले पाहिजे; पण दुर्दैवाने तसे ते दिसत नाही. आज भारत-पाक शत्रू असल्याप्रमाणे सरकार आणि विरोधक यांचे संबंध आहेत हे चुकीचे आहे.

एकीकडे कोरोना महामारीशी तोंड देत असतानाच सरकारने काही चांगले निर्णय घेऊन सकारात्मकतेच्या दिशेने काही पावले टाकली आहेत. सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहेच. त्या सरकारला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विरोधकांनी पुढे येणे हा मोठेपणा असतो; पण आज विरोधक खलनायकासारखे दुष्ट प्रवृत्तीने वागतात हे वाईट आहे. केंद्रात मोदींनी काही जाहीर केले की, काँग्रेसने त्यावर तुटून पडायचे, राहुल गांधींनी राफेलपासून नोटबंदी, जीएसटीपर्यंतचा पाढा वाचायचा आणि बरळायला सुरुवात करायची. कोरोना असला, तरी त्यांना तेच पाठ केलेले मुद्दे आठवतात. हे जरा अतीच होते. काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्यामुळे कोणताही लाचार काँग्रेसचा नेता राहुल गांधींना तुम्ही चुकता आहात, असे सांगू शकत नाही; पण भाजप नेत्यांनी तरी आपली विचारधारा जपली पाहिजे. राज्यात सरकारमध्ये राहून काँग्रेसचे नेते सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शंख करत असतील, तर विरोधात राहून फडणवीस सहकार्याची भूमिका का करू शकणार नाहीत? या संकट काळात टीकेपेक्षा मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री जे-जे मागत आहेत, ते-ते केंद्र सरकार मान्य करत आहेत. मुख्यमंत्री पंतप्रधानांचे आभार मानत आहेत. असे असताना आपले वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध ठेवत आहेत, तर राज्यातील नेते का तसे वागत नाहीत? नितीन गडकरी ठिकठिकाणहून आपली शक्ती पणाला लावून मदतीचा ओघ आणत आहेत. ते फडणवीसांनी पण करून दाखवले पाहिजे. काँग्रेसपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवण्याची गरज आहे.


विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद अपघातानेच आले. त्यांना कोणत्याही सभागृहाचा अनुभव नसताना ते शिकत-शिकत काम करत राहिले. त्या काळात अजित पवारांची त्यांना खूप मदत झालेली आहे. त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून कामे करून घेतली असती, मार्गदर्शकाची भूमिका घेतली असती, तर त्यांचे मोठेपण वाढले असते. आज राज्यातील अंदाधुंदीला, राज्य सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. आज जी चुकीच्या प्रकारे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादून सामान्य माणसांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारकडून झालेला आहे त्याचा राग सर्वसामान्य माणूस निवडणुकीत काढणार आणि फटका शिवसेनेला बसणार हे नक्की. हीच तर काँग्रेस-राष्ट्रवादीची चाल आहे. शुक्राचार्याचा संजिवनी मंत्र नष्ट करण्यासाठी देवांनी जसे कपट केले होते आणि कचाला शुक्राचार्यांकडे पाठवले होते, तसाच प्रकार शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. या गोष्टी शिवसेना नेतृत्वाला समजत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत फडणवीस यांनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेण्याची आवश्यकता आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, ब्रेक द चेन अशा घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी सगळी जबाबदारी सामान्य जनतेवर टाकली, कडक निर्बंध लादून आज सामान्यांचे हाल होत आहेत. अनेक जण बेरोजगार होत आहेत. केंद्राने लॉकडाऊन हा पर्याय नाही, असे सुचवलेले असतानाही लॉकडाऊन केला. अनेक लोकांची उपासमार होत आहे, सकाळचा चहा मिळत नाही, नाष्टा करायची सोय नाही, जीवनावश्यक वस्तू म्हणजे त्यात चहा, जेवण-खाणे येत नाही काय? पण स्थानिक प्रशासनांनी निर्णय घ्यावा, असे आदेश देऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पायावर कुºहाड पाडून घेतली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी चुकीचे काम करणाºया मुख्यमंत्र्यांना मोठेपणाने शिकवण्याची गरज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची ताकद कमी करते आहे, म्हणून आनंदाच्या उकळ्या जर भाजप नेत्यांना फुटत असतील, तर ते चुकीचे आहे. सहकारी घटक पक्षांच्या नादाने शिवसेनेला चुकीचे काम करावे लागत असेल, तर या संकट काळात फडणवीसांनी आपली हुशारी वापरण्याची गरज आहे. आज जनतेचे होत असलेले हाल अत्यंत वाईट आहेत. लसीकरणाचे राजकारण केले जात आहे. रेमडेसिवीरचे राजकारण केले जात आहे. या राजकारणाचा फटका पुढील वर्षी होणाºया महापालिका निवडणुकीत बसणार आहे. त्यादृष्टीने जनता आज सरकारच्या नावाने खडे फोडत आहे; पण नेमकी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी या अराजकातून बाहेर पडण्यासाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. हे सरकार तकलादू असले, तरी ते चालवण्याची जबाबदारी विरोधकांनी घेतली पाहिजे. सरकार पाडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा या सरकारकडून चांगली कामगिरी कशी करून घेता येईल ते डोक्यावर बसून करून घेण्याचे काम केले पाहिजे. चुकीच्या निर्णयापासून सरकारला रोखण्याचे काम केले पाहिजे.


1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

खुप चांगले मूल्य मापन केले आहे.