रविवार, १८ एप्रिल, २०२१

लॉकडाऊन हा पर्याय नाहीच


कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शनिवारी सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात लॉकडाऊनवर एकमत झाले. लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही असे एकमताने सर्व जणांनी ठरवले. भाजपने त्याला विरोध केला. जनतेच्या होणाºया नुकसानीची जाणीव करून दिली; पण कडक निर्बंध लावल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही असेच दिसत आहे. त्यामुळे सामान्यांना पुन्हा झळ सोसावी लागणार आहे. खरं तर कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. मनुष्याने ओढवून आणलेले हे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आज आपल्या राज्यात आणि देशात कोरोनाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून परिस्थिती बिघडतच चालली आहे. गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात मजुरांचे जे स्थलांतर झाले, त्या स्थलांतरामुळे त्यांचे जे हाल झाले, ते आपल्या स्मरणात असतीलच. आज तर परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षाही बिकट झाली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी मोठा फटका बसणार आहे.

सर्वसामान्य नोकरदार, व्यापारी, रोजंदार, फेरीवाले, विक्रेत यांच्यावर याचा फार मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा येण्याचा मार्ग ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे हे नक्की; पण हे कितीकाळ चालू द्यायचे? एकदा जर आपण कोरोना बरोबर कायम जगायचे ठरवले आहे, तर कायम असे स्वत:ला बंद करून घेण्यात काय अर्थ आहे? यापूर्वी काय जगात अशा महामाºया आल्या नव्हत्या का? १९७०च्या दशकात आपण देवी रोगावर मात केली; पण देवीचा रोग फोफावला असताना आपण तत्कालीन परिस्थितीत उपाययोजना नसतानाही जगत होतो, बाहेर पडत होतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर अशा कितीतरी साथी मोठ्या प्रमाणात येत होत्या. गेल्या दोन दशकात डेंगू-मलेरिया यांचा संपर्क वाढला होता. पण या वर्षभरात त्या डेंगूचे कोणी नावही घेत नाही इतका तो विस्मरणात गेला आहे. स्वाईन फ्ल्यू पण दिसेनासा झाला आहे. कोरोनामुळे सगळे आजार एकाएकी बाजूला फेकले गेले की काय? पण या रोगाने माणसांना आजारी पाडले नाही, तर बेरोजगार केले, भिकेला लावले, कर्जबाजार केले, तिजोºया रिकाम्या केल्या, रोजगार घालवले. तर दुसरीकडे मुठभरांचे खिसे भरले. मेडिकल व्यवसाय आणि डॉक्टरांचे उखळ पांढरे झाले. त्यामुळे आर्थिक विषमतेचा नवा आजार या कोरोनामुळेच आपल्याला मिळाला आहे. डॉक्टरांनी तपासल्यावर कसल्या टेस्ट करायला लावल्या, तर त्याचे रिपोर्ट पाहण्याचेही वेगळे पैसे मागण्याची प्रथा सुरू झाली आणि वैद्यक क्षेत्रातली लूट वाढली आहे. त्यामुळे जर आता जास्त काळ लोकांना कामधंदा न करता घरात बसवून ठेवले, तर गुन्हेगारीला उत येईल. जे गुन्हे करू शकणार नाहीत ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील अशीही भीती आहे. त्यामुळेच केवळ लॉकडाऊन करून माणसांना घरात बसवून ठेवून काही साध्य होणार नाही हे तितकेच खरे. जनजीवन पूर्ववत होण्यासाठी काळजी घेत या रोगाबरोबर जगायचे आहे हे ठरवले पाहिजे. जे लोक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा सरकारने उभी करावी. दंडात्मक कारवाई करून सरकारचा महसूल वाढवावा; पण शक्यतो लॉकडाऊन न ठेवता सर्व व्यवहार सुरळीत कसे होतील याला प्राधान्य दिले पाहिजे. ब्रेक द चेनच्या नादात आता चेक द ब्रेन म्हणायची वेळ आलेली आहे. कोणाच्या मनात काय येते आणि काहीही निर्णय घेतले जातात. विशेषत: मंत्रीगणांना घाबरवून टाकण्याचे चित्र प्रशासनाचे दिसते आहे. प्रशासनाला हा लॉकडाऊन लादायचा आहे, असेच शनिवारच्या बैठकीतून दिसत आहे; पण शासनान, सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या अधिन न होता प्रशासनावर अंकुश ठेवून, प्रशासनावर पकड ठेवून कोरोनाबरोबर जगण्याचे कौशल्य प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.


खरं तर कोरोनामुळे गेल्या वर्षभरात जे नुकसान झाले ते कसे भरून काढायचे याचा विचार सरकारने केला पाहिजे. सामान्यांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे त्यातून त्यांना कसे सावरायचे याचा विचार केला पाहिजे. वर्षानुवर्ष घरात कोंडून घेऊन फक्त माणसांना आळशी बनवले जाईल. त्यांची जाडी वाढेल. जडत्व येईल. त्यांची काम करायची सवय जाईल. शाळा बंद, परीक्षा नाही यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय जाईल. त्यानंतरची तयार झालेली पिढी ही चांगले शिक्षण घेतेलेली असणार नाही. म्हणूनच हे भविष्यातील नुकसान टाळायचे असेल, तर आजच त्यावर विचार होणे गरजेचे आहे. आपली अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, तिचे स्वरूप कसे असावे, यावर मंथन सुरू झाले पाहिजे. आज आपण ज्याला अर्थव्यवस्थेचा सिद्धांत असे म्हणतो, त्याचा आधार एकमेव आहे आणि तो म्हणजे भौतिकवाद! अर्थशास्त्राच्या प्रत्येक मूळ कल्पनेचा आधार हाच आहे. हाच त्याचा दृष्टिकोनही आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने मानवाचे जे व्यवहार आहेत, ते उत्पादक वा अनुत्पादक असू शकतात. मनुष्याच्या ज्या व्यवहारामुळे काही ना काही प्रमाणात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या भौतिक गरजा पूर्ण होतात, त्याला उत्पादक व्यवहार असे आपण म्हणू शकतो. मनुष्याचे कल्याण करण्याचे काम अर्थशास्त्राने केलेच नाही असे अजिबात नाही; पण जिथे कल्याणाची बाब येते तिथे त्याची पाळेमुळे भौतिकवादाच्या खोलाशी गेली आहेत, हे वास्तव आहे. अर्थशास्त्राचे हे स्वरूप समजून घेणे तसे कठीणच आहे. पण, ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. लोक घरात बसून राहिले आणि त्यांच्याकडे पैसाच आला नाही, तर भविष्यात औषधोपचारालाही त्याच्याकडे पैसा राहणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन न करता सर्व सुरू करा आणि कोरोनाबरोबर राहायला शिकणे हाच पर्याय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: