महाराष्ट्र हे जगातील एकमेव राज्य आहे की, जे सरकारी पातळीवर गेली पन्नासपेक्षा जास्त वर्षं राज्य नाट्य स्पर्धा घेते. त्यामुळे कलाकारांना प्रोत्साहन देणारे हे राज्य आहे. या स्पर्धेतूनच आजचे दिग्गज कलाकार आपल्याला मिळाले आहेत, पण दरवर्षी स्पर्धेतील नाटकांसाठी करावी लागणारी धडपड आणि नाट्यसंहितेची निवड हे त्या संस्थाचालक आणि कलाकारांना फार मोठे आव्हान असते.
तीस-चाळीस वर्षांपूर्वी आजच्यासारखी या क्षेत्राला फारशी प्रतिष्ठा नव्हती. नाटक लोकांना आवडायचे, पण ते दुसºया कोणीतरी केलेले. त्यामुळे हौशी रंगमंचावर स्त्री पात्र मिळवणे, महिला कलाकार मिळवणे हे अत्यंत अवघड होते. अशा काळात स्पर्धेत शक्यतो स्त्री पात्र विरहीत नाटक मिळते का? किंवा कमीत कमी स्त्री पात्र असणारे नाटक मिळते का, याचा शोध व्हायचा. त्यामुळे मधुसुदन कालेलकरांची नाटके सहसा स्पर्धेत नसायची. ती व्यावसायिक रंगभूमीवर जोरदार चालायची. कारण कालेलकरांची नाटके म्हणजे चार ते पाच स्त्री पात्र असणार. इतक्या मुली आणायच्या कुठून ही स्पर्धेत नाटक सादर करणाºयांची अडचण असायची.
त्यामुळे एक किंवा दोन स्त्री पात्र असणारी नाटके ही स्पर्धेसाठी चालायची. त्यामध्ये ‘काका किशाचा’ हे श्याम फडके यांचे नाटक तुफान गाजले होते. मुळचे किशोर प्रधान, शोभा प्रधान यांनी गाजवलेले नाटक असले, तरी नंतर ते हौशी रंगभूमीवर राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, राज्य विद्युत मंडळाच्या स्पर्धा, एसटीच्या स्पर्धा यांतून जोरदार गाजले. टोणगांवकर बार्इंच्या हॉस्टेलवर राहणाºया किशा आणि लीलीच्या प्रेमासाठी मध्या आणि राजे सिंगापूरचा खानदानी काका बनून येतो आणि विनोदी धमाका हा सहज करायला सोपा होता. त्यामुळे अनेकांनी हे नाटक केले. स्पर्धांमधून जोरात चालत असल्यामुळे हौशी कलाकार त्याचे प्रयोग गणेशोत्सव आणि एखादा प्रयोग लावून करत असत. त्यामुळे हे नाटक व्यावसायिक नाटकातून सादर होणे बंद झाले. स्पर्धेतील नाटक अशीच त्याची ख्याती झाली.
शन्ना नवरे यांचे ‘धुम्मस’ हे नाटक असेच स्पर्धेतून चांगले गाजले होते. एकच स्त्री पात्र आणि रहस्यमय कथानक असल्याने या नाटकालाही स्पर्धेतून चांगला प्रतिसाद मिळाला. तुरुंगातून पळालेला एक कैदी एका घरात घुसतो आणि त्या घरात एकटीच असलेली महिला आणि तो. त्याच्या शोधात आलेले पोलीस. यातून एक रहस्य उलगडते. याच कथानकावर राजेश खन्नाचा ‘इत्तफाक’ हा चित्रपट आला होता, पण कमी पात्र असल्याने हे नाटक स्पर्धेतून अनेक संस्थांनी गाजवले होते.
काही नामांकित संस्था या गाजलेली व्यावसायिक नाटके हुबेहुब कॉपी करून सादर करत होते. त्यात ‘नटसम्राट’, ‘मोरूची मावशी’, ‘ती फुलराणी’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ या नाटकांचा उल्लेख करावा लागेल, पण खºया अर्थाने स्पर्धेत सादर करण्यासाठी नाटके लिहिणारे लेखक म्हणजे अलीकडच्या काळात दिलीप परदेशी, प्रल्हाद जाधव, प्रेमानंद गज्वी यांचा उल्लेख करावा लागेल. दिलीप परदेशी यांचे ‘काळोख देतं हुंकार’, ‘काळी बेबी’, प्रल्हाद जाधव यांचे ‘शेवंता जीत्ती हाय’, ‘भूमिका’, प्रेमानंद गज्वी यांचे ‘देवनवरी’, ‘किरवंत’, ‘तनमाजोरी’ ही नाटके खास स्पर्धा गाजवणारी आणि हमखास बक्षीस मिळवून देणारी म्हणून गाजली. खरं तर प्रेमानंद गज्वी यांनी परिवर्तन आणि चळवळीच्या हेतूने लिहिलेली ही नाटके होती. त्यातून परिवर्तन किती झाले हा संशोधनाचा विषय असेल कदाचित, पण अनेक कलाकारांनी त्या नाटकांना मोठे केले हे मात्र नक्कीच मान्य करावे लागेल. यातील ‘किरवंत’ या नाटकाला श्रीराम लागू, सुहास जोशी यांनी व्यावसायिक उंचीवर नेऊन ठेवले, पण हौशी स्पर्धेतील कलाकारांनाही हे नाटक फार आव्हानात्मक होते. त्यामुळे त्यांनीही ते नाटक तितकेच समसरसून केले.
१९८८ पर्यंत राज्य नाट्य स्पर्धेत नागरी-अनागरी अशा दोन विभागात स्पर्धा घेतल्या जात. यात ग्रामीण अनागरी संस्थांमधून हिराकांत कलगुटकर, जगन्नाथ शिंदे यांची नाटके तुफान गाजत होती. ‘वहिनी माझी मायमाऊली’, ‘जखम’, ‘भाऊच भावाचा वैरी’ अशी कौटुंबिक ग्रामीण नाटके ग्रामीण कलाकार चांगल्या प्रकारे सादर करत असत.
स्पर्धेतल्या नाटकांमध्ये दत्ता केशव यांची नाटकेही चांगली गाजली होती. यामध्ये ‘माझा कुणा म्हणू मी’ हे नाटक ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही विभागांत गाजले होते. यावर काही वर्षांपूर्वी सचिन पिळगांवकर यांनी ‘कुंकू’ नावाचा चित्रपट काढला होता. तोही गाजला होता. मधुसुदन कालेलकरांचे ‘पदरी पडलं पवित्र झालं’ हे नाटक मात्र स्पर्धांमधून अनेक वर्षं गाजले होते. अनेक हौशी संस्थांनी महाविद्यालयांच्या गॅदरिंगसाठी ते सादर केले होते. याशिवाय ‘वाटा पळवाटा’ या नाटकानेही अनेक स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली होती.
समांतर नाट्य चळवळीतील किंवा व्यावसायिक यश मिळवणाºया लेखकांमधील विजय तेंडुलकर, सतीश आळेकर यांचीही काही नाटके स्पर्धेत चांगली चालली. यामध्ये ‘अशी पाखरे येती’, ‘कन्यादान’ ही तेंडुलकरांची, तर ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’ या सतीश आळेकरांच्या नाटकांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बेगम बर्वे’ हे चार पुरुष पात्र असलेले, पण स्त्री वेषातील कलाकारांचे असलेले अतिशय सुंदर नाटक आहे. सगळ्याच नाटकांचा उल्लेख करणे शक्य नाही, पण स्पर्धेतील नाटक म्हणून काही नाटकांनी एक विशेष दर्जा प्राप्त केलेला होता हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा