माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सध्या काय झाले आहे, असा प्रश्न पडतो. शनिवारी मध्यरात्री जो हाय व्होल्टेज ड्रामा त्यांनी केला तो खरोखरच गरजेचा होता का? असा प्रश्न सामान्य माणसांना पडलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष कार्यक्षमतेने एकहाती राज्य चालवणाºया नेत्याने किती खालच्या पातळीवर उतरावे, असा प्रश्न यातून निर्माण होतो. खरं तर रेमडेसिवीर इंजेक्शनची नियमबाह्य निर्यात करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ब्रुक फार्माच्या मालकांना सोडवण्यासाठी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी शनिवारी रात्री थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. हे चुकीचे आहे. जे काम साध्या कार्यकर्त्यांकडून, स्थानिक आमदार, नगरसेवकाने करायला पाहिजे त्यासाठी दोन दोन विरोधी पक्षनेते येतात? त्यामुळे यात खरोखरच काहीतरी काळेबेरे आहे असे वाटल्यावाचून राहात नाही. अर्थात विरोधी पक्षाच्या या भूमिकेवर काँग्रेसनं कडाडून हल्ला चढवला आहे. शिवसेनेनेही त्यावर तोंडसुख घेण्याची संधी साधली, पण अशी संधी त्यांनी का द्यावी हे आश्चर्य आहे. ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का? एका व्यावसायिकासाठी विरोधी पक्षाचे नेते पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे,’ असा संताप काँग्रेसनं व्यक्त केला आहे. भाजप आणि अन्य पक्ष यात काही फरक आहे की नाही?
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाºया रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळं या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आहे. असं असताना ब्रुक फार्मा कंपनीकडे सुमारे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या कंपनीला महाराष्ट्रात इंजेक्शन विकण्याची तातडीनं परवानगी दिली गेली, मात्र तरीही त्यांच्याकडून इंजेक्शन मिळाले नाहीत. त्यामुळं पोलिसांनी या कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे कळताच फडणवीस व दरेकर हे भाजपच्या काही नेत्यांसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते. कंपनी मालकाने चूक केलेली असताना त्याची पाठराखण करण्याचे चुकीचे काम फडणवीस आणि त्यांच्या सहकाºयांकडून केले गेले आहे. फडणवीस हे मागच्या पाच वर्षांत गृहमंत्रीदेखील होते. त्यांचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. पोलिसांना किंवा अन्य कोणाला मिळत नाहीत असे पुरावे फडणवीस पटकन मिळवतात हे वाझे प्रकरणात आपण पाहिलेले आहे. असे असताना या प्रकरणात थेट पोलीस ठाण्यात येऊन संताप व्यक्त करण्याचे नेमके कारण काय होते? उद्या जर हा कंपनीचा मालक दोषी आढळला, तर त्यामुळे संपूर्ण भाजपची नाचक्की होणार आहे. कशासाठी हा रात्रीचा अट्टाहास केला? पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले असते. काही काळेबेरे असते तर डांबून ठेवले असते, पण त्याच्यासाठी एवढा आटापिटा का केला, हे अनाकलनीय आहे.
वाझे प्रकरणाचा शोध देवेंद्र फडणवीस यांनी लावल्यामुळे अगोदरच त्याला पाठीशी घालणारे संतापलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सावधपणे वागणे गरजेचे होते, पण अशा प्रकारच्या चुका करून फडणवीस आपल्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत देत आहेत. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची आणि व्यक्तिस्तोम माजवण्याची प्रथा भारतीय जनता पक्षात नाही. संघ परिवारात नाही. असे असताना जो संशयित म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे त्यासाठी रात्री-अपरात्री जाऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत चुकीचा आहे.
भाजप नेत्यांच्या या वर्तनावर सर्वत्र जोरदार टीका होत आहे. एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाºया विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? रेमडेसिवीरच्या ६०,००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रुक्स लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. त्याबाबतची माहिती दडवण्यात आली आहे, असं पोलिसांना कळलं होतं. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीनं या साठ्याची माहिती देणं आवश्यक होतं. त्याच अनुषंगानं मुंबई पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला चौकशीसाठी बोलावलं, पण त्यानं उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु त्याच्या मदतीला स्वत: फडणवीस रात्रीच्या वेळी धावले. खरं तर हे काम एकटे दरेकर किंवा प्रसाद लाड करू शकले असते, पण एकदम इतके नेते तिथे कशासाठी गेले? ‘कोरोना महामारीमध्ये रेमडेसिवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत का? भाजप नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का?,’ असा सवाल आज सामान्य माणसांना पडला आहे.
पण सध्या देवेंद्र फडणवीस सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहात आहेत. काँग्रेसने तर त्यांना निशाण्यावरच ठेवले आहे. त्यातच सोमवारी त्यांच्या पुतण्याने तन्मय फडणवीसने दुसरी लस घेतल्याचे सोशल मीडियावर टाकले. पंचेचाळीस वर्षांच्या आतील असूनही त्याला ही लस कशी मिळाली, यावरून फडणवीस यांच्यावर आता टीका सुरू झालेली आहे. त्यामुळे विनाकारण आपल्या राजकीय ताकदीचा, बळाचा दुरुपयोग फडणवीस करत आहेत का, असा संशय निर्माण केला जात आहे. अशा प्रकारांपासून फडणवीस यांनी लांब राहिले पाहिजे. वाझे प्रकरण महाविकास आघाडी सरकारच्या अंगलट आले आहे, अनिल देशमुख यांना राजीनामा देण्यास भाग पडले आहे, सात-सात तास त्यांची सीबीआयने चौकशी केली आहे. त्यातच वाझेनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. असे असताना महाविकास आघाडीचे एकेक गोंधळ समोर येत असताना आम्ही पण गोंधळ घालतो, असे दाखवण्यास फडणवीस कशाला समोर येत आहेत हे समजत नाही. तुम्ही पण स्वच्छ नाही असे दाखवण्याची संधी त्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळत आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही.
20/04/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा