कोरोनावर मात करायला हवीच; पण त्याला घाबरून बंद करून किती दिवस राहायचे? कोरोनावर विजय मिळवण्यासाठी प्रभावी आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण हाच उपाय आहे; पण लसीकरणावरून राजकारण न करता पुरेसा साठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. साठा आलेला असताना त्याचे वितरण व्यवस्थित होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, लसीचा साठा वाया जाणार नाही याचेही नियोजन करणे गरजेचे आहे.
खरं तर कोरोनावर मात करण्याचा पहिला उपाय जशी मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री आहे, त्याचप्रमाणे दुसरा उपाय आहे तो म्हणजे त्यावरील लसीकरण. केंद्र सरकारच्या नियोजनानुसार राज्यात लसीकरण सुरू झाले, तेव्हा पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाºयांना लस दिली गेली, त्यानंतर अन्य कोरोना योद्ध्यांना आणि मग साठ वर्षे व त्यावरील, पंचेचाळीस व त्यावरील अशा क्रमाक्रमाने लसीकरण सुरू झाले आहे; मात्र आजही त्याचा वेग जेवढा हवा तेवढा असल्याचे दिसत नाही. सुरुवातीच्या काळात लसीबाबत भीती निर्माण केली गेली होती. काँग्रेसचे नेते अगोदर लस घेणार नाही, असेच म्हणत होते. कारण ही लस म्हणे मोदी सरकारने आणललेली आहे असे राजकारण चालवले होते. काही काँग्रेस नेत्यांनी मोदींनी अगोदर लस घेऊन दाखवावी अशी टीका केली होती; पण मोदींनी लस घेतली. राष्ट्रपतींनी घेतली. दिग्गज नेत्यांनी घेतली. शरद पवार यांनी घेतली. दिग्गज कलाकार, सेलिब्रेटी यांनी घेतली. तसे या लसीत दम आहे, असे वाटू लागले आणि सर्वांनी लसीकडे धाव घेतली; पण या लसीचे सुरुवातीपासूनच राजकारण करण्याचे काम मोदी विरोधकांनी केले. लसीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, म्हटल्यावर मु्द्दाम १८ वर्षांवरील सर्वांना द्या, सगळ्यांनाच द्या असा आग्रह केला गेला. जेणेकरून साठा कमी पडावा आणि केंद्र सरकारच्या नावाने बोंब करता यावी. हे चुकीचे आहे. अगोदर दिलेला साठा नीट सांभाळता आला नाही, त्यातील पाच लाख लसी वाया गेल्या, वेळेत दिल्या गेल्या नाहीत, हे राहिले पण आता दोन दिवस पुरतील, मग कमी पडतील यावरून टीका करण्यास सुरुवात केली; पण आहे त्या लोकांना लसी देण्याचे काम करणे आवश्यक असताना फक्त फुकाच्या बोंबा मारण्याचे काम केले गेले; पण यातून काही साध्य होणार नाहीये. त्यासाठी सरकारने केंद्राशी समंजस्याने घेत नीट नियोजन करून सर्वांना लसीकरण करण्याचे धोरण आखण्याची गरज आहे.
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वायूवेगाने वाढते आहे आणि दुसरीकडे लसीकरणाला जेवढा प्रतिसाद असायला हवा त्यापेक्षा तो जास्त मिळत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला विरोध करणारे आता लसीसाठी पुढे येत आहेत. अगदी राहुल गांधीसुद्धा परदेशात पाठवणे थांबवा; पण आधी देशवासीयांना लस द्या असा आग्रह करू लागले आहेत. केंद्र सरकारने तर लसीकरणाचा उत्सव करण्यास सांगितले आहे. सुट्टीच्या दिवशीही लसीची सोय केलेली आहे.
कोरोनावरील लस घेण्यास नागरिकांना प्रवृत्त आणि प्रोत्साहित करणारे असे कोणतेही पाऊल राज्य सरकारने आजतागायत उचललेले नाही. ना वृत्तपत्रात एखादी जाहिरात, ना सामाजिक जागृतीचा एखादा उपक्रम. लसीची टंचाई आहे अशी बोंब उठवून नागरिकांना घाबरवण्याचे प्रकार करण्यापेक्षा सतत लस घेणे आवश्यक आहे, अशी जाहिरात सरकारने करण्याची गरज आहे. जनतेला प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. लसीकरणाचे नियोजन करून हा साठा कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणता साठा आॅर्डर केल्यानंतर किती दिवसात येतो याचा अभ्यास असला पाहिजे. तहान लागल्यावर विहिर खणायला जाण्यापेक्षा पुरेसा साठा शिल्लक असतानाच पुढची आॅर्डर केली पाहिजे. रोज तीन लाख लसी दिल्या जात असतील, तर २१ लाख लसीकरण आठवड्यात होणार. त्यामुळे वेळीच आॅर्डर दिली, तर हा प्रश्न येणार नाही; पण कोरोनावर मात करण्यासाठी वेगाने लसीकरण करणे हाच उपाय आहे. हे बंद करा, ते बंद करा, असे करून काही साध्य होणार नाही. जनतेचे हाल होतील बाकी काही होणार नाही. सर्वसामान्यांना मारण्याचे काम सरकारने थांबवावे आणि लसीकरणाचा वेग पकडावा.
आता केंद्र सरकारने सरकारी तसेच खाजगी कार्यालयांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारांना फर्मावले आहे. सरकारने त्याबाबत तत्परतेने पाऊल उचलून लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. पल्स पोलिओ किंवा आधार सारखी मोहीम ज्या व्यापक रीतीने राबविली गेली होती, तशाच प्रकारे कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवली गेली पाहिजे. पल्स पोलिओची मोहीम तर देशातील आरोग्यविषयक मोहिमांतील एक आदर्श मोहीम म्हणायला हवी. तशाच व्यापक प्रमाणात कोरोना लसीकरणही का होऊ शकत नाही?
येथे नमूद करण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या लस घेणाºया प्रत्येकाची कोविन पोर्टलवर किंवा आरोग्यसेतू अॅपवर नोंदणी बंधनकारक आहे, परंतु अशा प्रकारे रीतसर नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊन जाणाºयांना चांगला प्रतिसाद मिळतो. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी न करता अॅपचा फायदा घेण्याची गरज आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सुरुवातीलाच उल्लेखिलेल्या त्रिसूत्रीबरोबरच अधिकाधिक संख्येने कोविड चाचण्या आणि लसीकरण यांची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवून ते शिस्तीत पूर्ण करण्यासाठी सरकारने कंबर कसावी. त्याचे राजकारण न करता एक तरी काम आम्ही चांगल्या प्रकारे राजकारण न करता करू शकतो हे सरकारने करून दाखवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा