झी मराठीवर रात्री साडेदहाला प्रसारित होणारी ‘देवमाणूस’ ही मालिका आता संपवण्याची गरज आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला असला, तरी एकापाठोपाठ एक नवनवे खून करून ती वाढवण्यात अर्थ नाही. या मालिकेतील सर्वच पात्रांचा नैसर्गिक अभिनय असल्यामुळे ही मालिका चालते आहे, पण कथानक आता संपत आले आहे. अजून किती खून अजितकुमार देव उर्फ देवीसिंग करणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे आता खूप झाले. आता या मालिकेचा शेवट करायला हरकत नाही, असे प्रेक्षकांनाही वाटायला लागले आहे. फक्त खून करताना दाखवून उपयोग नाही, तर त्याला काय शिक्षा होते आणि कसा पकडला जातो, यावर आता प्रकाश टाकण्याची गरज आहे.
गेल्या काही भागांमधून हा अजितकुमार उर्फ देवीसिंग पोलिसांना कसा मूर्ख बनवतो आहे हे दाखवून दिले जात आहे. पोलीस इतके साधेभोळे कसे, असा प्रश्न यातून निर्माण होतो. काही ठिकाणी अत्यंत पोरकटपणा असल्याचे दिसते. दिव्यासिंग आपले हेर म्हणून नाम्या आणि बजा या दोघांची निवड करते. गावात लक्ष ठेवायला सांगते, पण नेमके हे डॉक्टरलाच अगोदर समजते. बजा सांगून मोकळा होतो. त्यामुळे डॉक्टर अधिकच जागरूक राहतो आणि आपली कारस्थाने करण्यास मोकाट सुटतो. पोलिसांचे खबरे असतात ते कधी कळून येत नसतात. त्यामुळे आता अजितकुमारचे डावपेच भरपूर झालेले आहेत. इथून पुढे पोलिसांच्या चातुर्यकथा आल्या तर बरे होईल, पण यात पोलिसांना अजितकुमार सहज उल्लू बनवत असल्याचे दिसत आहे.
मागच्या दोन आठवड्यांत तर कहरच झाला आहे. एकतर तपासासाठी जी एसीपी दिव्यासिंग आलेली आहे तिच्याच प्रेमात अजित पडला आहे. त्याच्यापेक्षा दिव्यासिंग त्या गुन्हेगाराच्या प्रेमात पडली आहे. आपण ज्याच्या तपासासाठी आलो आहोत त्यातील गुन्हेगाराच्याच प्रेमात आपण पडलो आहोत हे तिच्या लक्षातही येत नाही. हे थोडे विसंगतच आहे. तू तपास करायला आली आहेस की लग्न ठरवायला? तपासाचे सगळे प्लॅन, चर्चा, तपासाची दिशा सतत त्या डॉक्टरच्या समोरच करताना ती दिसते. पोलीस यंत्रणा इतकी लेचीपेची असते असे कसे काय दाखवले जात आहे?
इन्स्पेक्टर रणजीतचा देवीसिंगने खून केल्यानंतर त्याच्या घरात तपासासाठी जाते तेव्हा डॉक्टरचा पेन दिव्याला मिळतो, काही पुरावे मिळतात. ते आपण घरात ठेवले असल्याचे त्याला ती कशी काय सांगते. त्यामुळे रंगपंचमीला तिला वाड्यात गुंतवून तिच्या घरात शिरतो आणि केअरटेकर असलेल्या शांतारामवर हल्ला करून सगळे पुरावे गोळा करून येतो. तो केअरटेकर म्हणजे पोलीस दलातीलच आहे. तो अजितकुमारशी झटापट का करू शकत नाही? अजितकुमारपेक्षा कितीतरी धष्टपुष्ट असूनही तो मार खाऊन बेशुद्ध होऊन पडतो आणि दिव्यासिंग त्याच्यावर उपचाराला परत अजितकुमारलाच बोलावते. घरातून पुरावे पळवले असले तरी ती शांतच राहते आणि आपण बडतर्फ असल्यामुळे काही करू शकत नसल्याने स्वत:ला दोष देत बसते.
मंगळवारीही दिव्या मुंबईला जाऊन आपले निलंबन मागे करून आणते आणि निर्दाेषत्व सिद्ध करते. तपासाला लागणार म्हटल्यावर संतापलेला अजित दिव्याच्या मुलीला मायराला किडनॅप करतो, तिला गुंगीचे औषध नाकावर दाबून बेशु्द्ध करतो, पळवून आणतो, इंजेक्शन देतो हे प्रकार भयानक दाखवले आहेत. त्यावेळी डिंपल त्याला विरोध करते आणि दोघांमध्ये झटापट होते. इतका क्रूर चेहरा समोर आल्यावरही डिंपल अजितकुमारला साथ देते आहे हे चुकीचे वाटते. डिंपल यडपट आहे, तिला सिनेमात हिरॉईन होण्यासाठी मुंबईला जायचे आहे आणि त्यासाठी ती काहीही करते आहे हे जरी खरे असले, तरी ती प्रत्येक खुनाला मदत करते आहे हे भयानकच आहे. बाकीचे खून रेश्मा, अपर्णा, संजू हे त्याने परस्पर केले असले, तरी इन्स्पेक्टर रणजीतच्या खुनात डिंपल त्याला मदत करताना दाखवली आहे. त्यामुळे सिनेमात जाण्यासाठी कलाकार कोणत्याही थराला जातात, असा संदेश जात नाही का? आता तो फक्त खून करत सुटला आहे हे दाखवणे थांबवून, या सगळ्या प्रकाराचा पोलीस तपास कसा लावतात हे दाखवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता या मालिकेला शेवटाकडे नेले पाहिजे. रहस्यमय मालिका जास्त ताणता कामा नये. रात्रीस खेळ चाले १ नंतर हंड्रेड डेज ही शंभर भागातच मालिका आणली होती. तशीच ही मालिका थोडक्यात उरकता आली असती. विनाकारण ताणण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आता या मालिकेचा शेवट लवकरात लवकर करावा हेच योग्य राहील.
या मालिकेत सरू आजी आणि टोण्या हे दोघेही प्रेक्षकांना आवडतात. त्यांच्या करामती पहायला प्रेक्षकांना आवडतात. सरू आजीच्या म्हणी आणि शिव्या ज्या ठसक्यात येतात त्यातून अस्सल ग्रामीण भाषेचा ठसका दिसून येतो. टोण्याचा अतरंगीपणा दिसून येतो, पण हीच सरू आजी डोळ्याला सतत गॉगल लावून आंधळी आहे असे सांगते आहे, पण तिला वास्तवात सगळे दिसते आहे, त्यामागचे नेमके रहस्य काय आणि यातून दिग्दर्शकाला नेमके काय सुचवायचे आहे हे मात्र समजत नाही. या सरू आजीला प्रमुख साक्षीदार करून त्या डॉक्टरचे सगळे कारनामे बाहेर काढायचे आहेत का? पण त्याचे समीकरण जुळवणे तसेच अवघड आहे. ती या डॉक्टरला कायम कम्पाऊंडरच का म्हणते आहे? तिला तो कम्पाऊंडर आणि बोगस डॉक्टर असल्याचा सुगावा कसा लागला हे रहस्य आता समोर आले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा