केंद्रीय हवामान विभागानेही यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेट आणि केंद्रीय हवामान खात्याचे हे अंदाज बळीराजाला दिलासा देणारे आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात किमान पाऊस चांगला होणार आहे ही एक सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल हे नक्की. जेव्हा पाऊस चांगला पडणार आहे, असे भाकीत येते. तेव्हा नेहमीच शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण तयार होत असते. सेन्सेक्स वर जाण्यास मदत होते, कारण पाऊस समाधानकारक असेल, तर माणसांची क्रयशक्ती वाढणार असते. त्याचा परिणाम बाजारपेठेवर आणि शेअर बाजारावर होत असतो. म्हणूनच ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान खान्याने आणि स्कायमेटने चांगला अंदाज वर्तवून सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी याच्या मनाला गारवा दिलेला आहे.
हवामान खात्याच्या अंजाजानुसार गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आशादायक मान्सून बरसण्याचे शुभ वर्तमान आहे, तसेच स्कायमेट वेदर या हवामान वर्तवणाºया खाजगी संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदाचा पाऊसही सलग तिसºया वर्षी सामान्य आणि बळीराजाला दिलासा देणारा असेल. यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होईल, असे हा अंदाज सांगतो. यात ५ टक्के कमी-अधिक तफावत पडू शकते; तरीही सलग तिसºया वर्षी सरासरीइतका पाऊस होणे हे कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशाला निश्चितच सुखावणारे आहे.
नैर्ॠत्य मान्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अपेक्षित असतो. या चार महिन्यांची देशातील पावसाची सरासरी ८८० मिलिमीटर असली, तरी या काळात यंदा ९०७ मिलिमीटर पाऊस होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही सरासरी इतका पाऊस राहील; मात्र कोकणात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान राहील. देशाच्या उत्तर भागात काही ठिकाणी कमी पाऊस होईल; तर पावसाळ्याच्या प्रारंभी आणि परतीच्या वेळी संपूर्ण देशात चांगली वृष्टी होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने म्हटल्यानुसार जूनमध्ये सरासरीच्या १०६ टक्के, जुलैमध्ये सरासरीच्या ९७ टक्के, आॅगस्टमध्ये त्या महिन्याच्या सरासरीच्या ९९ टक्के आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ११६ टक्के पाऊस होईल. स्कायमेटचे याआधीही व्यक्त केलेले मान्सूनविषयक अंदाज थोड्याफार फरकाने वस्तुनिष्ठ ठरले आहेत. हे लक्षात घेता यंदा देशात किंवा महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट नसेल, ही दिलासा देणारी बाब होय. कोरोनानंतर अर्थव्यवस्था सावरायची म्हटल्यावर काहीतरी चांगले घडणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने निसर्ग आपल्याला भरभरून देत आहे, असे समजायला हरकत नाही.
कमी पर्जन्यमान झाल्यास दुष्काळाची, तर अतिरिक्त पाऊस झाल्यास भयावह पूरस्थितीशी देशाला सामना करावा लागतो. गेल्या वर्षी देशाला आणि महाराष्ट्राला कोरोनाबरोबरच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीशी सामना करावा लागला होता. कोरोनाच्या प्रभावामुळे अर्थचक्राला गती देणाºया उद्योग व्यवसायांची चाके थांबली होती; मात्र चांगल्या पावसामुळे कृषिक्षेत्राची साथ या संकटात मिळाल्याने अर्थव्यवस्थेने काहीसा तग धरला. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवरच अवलंबून असल्याने चांगला पाऊस होणे ही कृषी अर्थव्यवस्थेची गरज बनली आहे. ती पूर्ण होण्यासारखे आशादायक चित्र हवामान खात्याने दाखवले आहे ही समाधानाची बाब आहे.
शेतीप्रधान देशांच्या अर्थव्यवस्थेत मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणे हे स्वाभाविक आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत एकूण वर्षभराच्या पावसापैकी ७५ ते ८० टक्के पाऊस पडतो. त्यामुळे या काळातील पाऊस वेळेवर पडणे, वेळापत्रकानुसार बरसणे आणि पुरेशा प्रमाणात बरसणे, या तिन्ही गोष्टी अन्न सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. याचे कारण शेतीचा खरिपाचा हंगाम हा केवळ मान्सूनच्या पावसावरच अवलंबून असतो. वर्षभरातील कृषी उत्पादनापैकी निम्मे म्हणजे ५३ टक्के उत्पादन खरीप हंगामावरच अवलंबून असते. चांगला पाऊस झाला, तर तो खरीप पिकांसाठी उपयुक्त आणि पुढे येणाºया रब्बी हंगामाला आधार देणारा ठरतो. देशात लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रापुरतीच सिंचनाची हमी आहे. महाराष्ट्रात तर एकूण क्षेत्रापैकी १७ ते १८ टक्के क्षेत्रापुरतीच ती आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठवणे, पाणी जिरवणे यांसारख्या उपक्रमांची खरोखरीच गरज आहे. त्यासाठी हे अंदाज महत्त्वाचे आहेत. हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे पाऊस होईल याची दखल घेऊन सरकारने पाणी साठवणे, जिरवणे आणि सिंचनाचे नियोजन केले, तर त्या अंदाजाचा फायदा आहे.
आपल्याकडे हवामान खात्याचे अंदाज हे चुकण्यासाठी आहेत आणि त्या खात्याचा काही उपयोग नाही असाच समज असतो; पण जेव्हा स्कायमेट किंवा शासकीय हवामान खाते मानसूनचे पावसाचे अंदाज व्यक्त करते, तेव्हा त्याचा उपयोग कसा केला पाहिजे याची माहिती दिली गेली पाहिजे. कोणत्या भागात किती पाऊस पडणार आहे. अशा पावसात कोणते पीक घेणे योग्य ठरेल इथपासून ते पाण्याची साठवण कशी करता येईल. पावसाळ्या मध्यात आपल्याकडची धरणे इतकी तुडूंब भरतात की त्या पाण्याचा विसर्ग करावा लागतो. त्यामुळे या सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती येते किंवा ते समुद्रात वाया जाते. मग या जादा पावसाचा उपयोग काय? धरणातून सोडलेले पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे संचय करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था असली पाहिजे. पाटबंधारे, जलसंपदा, कृषी खाते यांनी ताळमेळ ठेवून याचा विचार केला, तर पावसाचा आणि त्याच्या अंदाजाचा खºया अर्थाने उपयोग करून घेता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा