झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका म्हणजे या आठवड्यात पोरकटणाचा कहर झाला, असे म्हणावे लागेल. कोणतीही तार्किक सुसंगती या मालिकेत दिसली नाही. लेखक, दिग्दर्शक यांनी काहीही दाखवावे, कलाकारांनी काहीही करावे आणि प्रेक्षकांनी निमुटपणे ते पहावे असे प्रकार या मालिकेत दिसून आले. आदिती शारंगधर हिने तर कहरच केलेला दिसून आला. म्हणजे एका ज्येष्ठ आणि नामांकित अभिनेत्रीने अशा प्रकारची अतार्किक भूमिका करणे हे प्रेक्षकांना पचणारे नाही. त्यामुळे ही शारंगधर वटी एक गोळी सटासट प्रमाणे एक एपिसोड फटाफट, असा उरकावा लागेल असे दिसते.
त्या मोमो आणि ओमचं लग्न लावायचा, त्यांचा साखरपुडा करायचा घाट या मालविकाने घातला आहे. त्यात किती वेळकाढूपणा दाखवला आहे. आईने उभा केलेला बिझनेस तिने म्हणे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला आहे. हा बिझनेस मोठा करण्यासाठी तिला मोमोच्या श्रीमंत वडिलांचा बिझनेस आपल्या खानविलकर उद्योगात सामील करून घ्यायचा आहे. याचा अर्थ मोमोच्या तथाकथीत दाखवलेल्या वडिलांचा बिझनेस काय आहे, याची माहिती तिने निट काढलेली असणार. त्यासाठीच मोमोला यूएस वरून आणले आहे आणि तिचे लाड चालवले आहेत; पण ती मोमो एका फटीचरबरोबर नाटक करत आहे आणि चोरटी आहे हे या दोन-चार भागात दाखवले आहे. हे पूर्णपणे अतार्किक आहे.
सुरुवातीला मोमो अगदी पाश्चिमात्य स्टाईलने श्रीमंत थाटात वावरते. वाटेल तसे कपडे घालते. कुठल्याही रंगाची लिपस्टीक लावते. ही तिची थेरं पाहिल्यावर असेल बुवा ती श्रीमंत बापाची पोर असा समज प्रेक्षकांचा होतो; पण ती भुरटी चोर आहे. याचा पत्ता एका बिझनेसमन मालविकाला असू नये हे अत्यंत हास्यास्पद आहे. साखरपुड्यासाठी ही मोमो जोडमी बाप उभा करते तो पण रस्त्यावरचा फटीचर भिकारी आणते. खोटा बापच उभा करायचा होता, तर कुठून तरी पडीक नट आणू शकली असती; पण देवळात भीक मागणारा फटीचर, कळकट माणूस ती पैसे देऊन आपला बाप म्हणून साखरपुड्याला आणते. तो एकेक वस्तू उचलत असतो. मालविका त्याचे स्वागत मोठा बिझनेसमन म्हणून करते. त्यावेळी त्याच्यापुढे जे खाण्याचे पदार्थ ठेवते तेव्हा तो ज्याप्रकारे भिकाºयासारखे खातो यावरून हा खरोखरच बिझनेसमन आहे का?, याचा साधा संशयही मालविकाला येत नसेल, तर ती कसली हुशार बिझनेसमन? ये बात तो हजम नही हो सकती. आता शारंगधर वटीच घेतली पाहिजे, असे आदिती शारंगधर यांना सांगायचे आहे का? एक गोळी फटाफट, हजम होईल सटासट असाच हा प्रकार आहे का?
ज्या मोमोला आपल्या भावाच्या गळ्यात मारून मोमोच्या बापाचा बिझनेस आपल्या घशात घालण्यासाठी मालविका आतुर झालेली आहे त्या मोमोच्या बापाचा खरंच बिझनेस आहे का? याची खात्री तिने कशी करून घेतली नाही? मोमो ही लफंगी चोरटी आहे, तर ती मालविकाला कुठे भेटली, तिची एंट्री तर विमानतळावरून दाखवली आहे. ती मालविकाला कुठे सापडली? सगळी फालतुगिरी आणि पोरकटपणा दाखवला आहे.
मोमोला ओममध्ये इंटरेस्ट नाही, ती मोहितच्या प्रेमात पडली आहे, दोघे मिळून नंतर खलनायक खलनायिका होऊ शकले असते. असेही ओम समजून तिने पहिल्या एंट्रीलाच मोहितची पप्पी घेऊन त्याच्या गालावर ओठांचा शिक्का मारला होता. मग त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब करायला काही हरकत नव्हते. मंदिरातही दोघांची जोडी जमली होती. अनेकदा ती मोहितबरोबर फिरली होती. त्यामुळे हे दोन लबाड एकत्र येऊन धिंगाणा घालू शकले असते; पण मोमो भिकाºयाला जवळ करते हे अजिबात पटणारे नाही. जो अमेरिकेत बिझनेसमन म्हणून मोमोचा बाप म्हणून आणला आहे, त्याचे वागणे जराही संशयास्पद वाटत नाही हे बिनडोकपणाचे आहे. त्यामुळे हा पोरकटपणाचा कहर या मालिकेने दाखवून ही मालिका भविष्यात कंटाळवाणी होणार असे दिसते. ओम आणि स्विटूच्या साखरपुड्यात नवा ट्विस्ट आणता आला असता. तिकडे स्वीटूची आईपण त्या मोहितशीच स्वीटूचे लग्न व्हावे म्हणून इतकी उतावीळ झालेली आहे की, तिच्यासमोर तो मोहित वाटेल तसा वागत असतो, तरी या आईला काही कसे वाटत नाही? त्यामुळे या मालिकेने या आठवड्यात कहर केला असेच म्हणावे लागेल.
स्वीटूचे वडील मोहितबरोबर लग्न लावून देण्यास तयार नाहीत. स्वीटूलाही मनापासून मोहितशी लग्न करायचे नाही; पण आईच्या धाकापोटी ती तयार होते, हे न पटणारे आहे. जी स्वीटू व्यवस्थीत, समंजस म्हणून ओळखली जात आहे. वडिलांची प्रिय आहे, आईला तिचा अभिमान आहे असे आई सांगते, तर ती आपल्या मुलीच्या मनाविरुद्ध तिचे मत जाणून न घेता कोणाशीही लग्न कसे काय लावून देऊ शकते? विशेषत: ज्या मुलाने सुरुवातीला नाकारले आहे, ज्याने अत्यंत अपमानित केलेले आहे, स्वीटूच्या वडिलांना छळले आहे त्या मुलाशी लग्न लावण्यासाठी आई कशी काय तयार होत आहे? स्वीटूचे वडील थेट सगळे सांगत का नाहीत? हे सगळंच अनाकलनीय आहे. मालिका तिथल्या तिथे रेंगाळल्यासारखी वाटते. गमतीशीर भाग म्हणजे ओमला मोमोशी लग्न करणे पसंत नाही, ओमची आई शकूला पसंत नाही, रॉकीला मान्य नाही, फक्त मालविकाच्या धाकासाठी हा साखरपुडा आहे; पण कोणीही तिला विरोध करू शकत नाही; पण एक कुत्रं ज्याचे नाव जादू आहे तो या लग्नाला विरोध करतो, म्हणजे हिंदी चित्रपटात श्रीमंत मुलीचा बाप ये शादी नही हो सकती म्हणून जसा गुरगुरतो तसा हा कुत्रा गुरगुरतो आणि बोटात अंगठी घालत असताना, झडप घालतो आणि साखरपुडा मोडतो. काय कल्पकता आहे ना? कुत्र्याला अक्कल आहे आणि माणसांनी अक्कल गहाण ठेवली आहे, हेच दाखवायचे होते का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा