कोरोना विषाणूने अवघ्या जगात थैमान मांडले आहे. जागतिक पातळीवर आणि देश पातळीवर त्यासोबत लढण्यासाठी अविरत प्रयत्न चालू झाले आणि त्यातूनच आला हा लॉकडाऊन. एका विशिष्ट लयीत चाललेले आपले आयुष्य एकदम खीळ लागल्यासारखे थांबले. सुरुवातीला पहिला आठवडा सक्तीने का होईना, सगळे घरी होते. अगदी ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत. या आनंदात घरोघरच्या महिला आनंदित झाल्या होत्या. यानिमित्ताने का होईना आपले पतीराज घरात आहेत याचा आनंद मानत होत्या; पण जसजसा लॉकडाऊन वाढत गेला तसा त्याचा उपद्रवच वाटू लागला. बाहेर होता तर बरे होते, असे वाटायला लागले. लॉकडाऊनच्या काळात पती-पत्नींमधील भांडणाची प्रकरणे वाढली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भांडणे दिल्लीत, तर महाराष्ट्र दुसºया क्रमांकावर लागतो.
सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील पेडर रोडवर एका महिलेने नवºयाशी भांडताना त्याची कार अडवून रस्ता जॅम केला होता. हे लॉकडाऊनचे दुष्परिणामच म्हणावे लागतील.
म्हणजे एकीकडे सामान्य कुटुंबात मुलांच्या, नवरोबांच्या फर्माइशी पूर्ण करण्याचा महिलांनी जणू चंगच बांधला. यथावकाश रोज काय नवीन करायचे बाई?, हा आयांचा प्रश्न आपल्या कोरोना प्रश्नापेक्षाही मोठा झाला. दर वीकएण्डला बाहेरचं जेवायचे, अशी आपली संस्कृती बनल्यामुळे गृहिणींनी यु-ट्यूबला शरण जात अनेक आधुनिक पदार्थांची घरी करण्याची शर्थ पार पाडली. सोशल मीडियावर फोटो टाकायचे असल्याने पदार्थाची सजावट, टेबलाची मांडणीही आकर्षक व्हायला लागली; मात्र लॉकडाऊन जसजसा वाढत गेला, तसा भाजी किंवा वाणसामान मिळणे थोडे कठीण व्हायला लागले, तसा हा पदार्थांचा वेगळेपणा थोडा कमी झाला. गृहिणींसकट घरच्यांनाही आपले नेहमीचे जेवण आवडू लागले. मुख्य म्हणजे बाहेरचे न खाताही आपल्याला आनंदाने जेवता येते आणि पोटही भरते, हा साक्षात्कार अनेकांना, विशेषत: मुलांना झाला. भरीसभर वाढदिवस, लग्न वाढदिवसही घरच्या घरीच साधेपणाने व आनंदाने साजरे झाले. आपली आई-बायको किती काम करते, हे अनेकांना प्रत्यक्ष बघायला मिळाले. हे कोरोनाचे खरंतर गृहीणींवर उपकारच म्हणावे लागतील. घरच्या मोलकरणी, कामगारांना सुट्टी असल्याने ते ही काम वाढलेलेच. त्यामुळे अनेकांकडे मुलांनी, नवºयांनी सफाई कामे आनंदाने स्वीकारली. झाडू, भांडी ते पाककलेतली प्रगती अशा सोशल पोस्ट वाढल्या. एकामुळे दुसरा प्रोत्साहित होऊन एकूणच समाजाची मानसिकता बदलायला हातभार लागला; मात्र हा बदल किती वेळ टिकतो हे काळच ठरवेल. पण महत्त्वाचे हे की, घराघरातून सहकार्याची भावना वाढीला लागली. त्याचे पडसाद समाजातही उमटले. अनेक जण मास्क बांधून गरजूंना शिधा/अन्न वाटपासाठी रस्त्यावर उतरले. ज्यांना प्रत्यक्ष शक्य नव्हते त्यांनी आर्थिक मदत पुरवली. हे एकीकडे सकारात्मक परिणाम होत असताना त्याचे चांगले परिणाम काही मिळेनासे झाले. म्हणजे लॉकडाऊन संपणार कधी याची चिंता मात्र वाढत गेली आणि पती-पत्नी, कौटुंबिक वादात भर पडू लागली असे चित्र दिसते.
लॉकडाऊनच्या काळात पुरेसा वेळ हाताशी असल्याने अनेकांमधले सुप्त गुण जागे झाले. अनेकांमधले लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, वीणकाम, भरतकाम, बागकाम आपली कलाकृती सोशल मीडियावर पोस्ट करून वाहवा मिळवू लागले. यात सिने/टिव्ही कलाकार ही मागे नव्हते. तुम्ही कुठल्याही ठिकाणी असा, प्रत्येकाने स्वत:चा व्हिडीओ शूट करून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकसंध बांधायचा आणि पेश करायचा. त्यामुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले. टिव्हीपेक्षाही इंटरनेट हे संपर्काचे आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाले. कोरोनामुळे जगच बदलले. थिएटरमध्ये जाऊन नाटक-सिनेमा पाहण्याचा ट्रेंड बदलला. वेळ जायला आणि मनोरंजनाला हॉट स्टार, अॅमेझॉन प्राईम, एमएक्स प्लेयर, नेट फ्लिक्सच्या बरोबरीने केबल टिव्ही आणि युट्यूब यांचा प्रसार दुपटीने वाढला. आधीच्या पिढीने जुने सिनेमे पाहिले, तर तरुण प्रेक्षकांकरता वेबसिरीज, शॉर्ट फ्लिम्सचा सागर समोर आहे. वेळही भरपूर आणि वाटही बघायला नको! अनेकांना फक्त घरच्यांबरोबर काय वेळ घालवायचा म्हणून मग नातेवाईकांशी, शाळा, कॉलेजसोबतींशी आॅनलाईन गप्पा वाढल्या, आॅनलाईन खेळ खेळता यायला लागले. झूम, गुगल हँगआऊट यांचा वापर भरपूर वाढला आणि आभासी जगातही माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे दिसून आले.
एकीकडे काही लोक याचा आनंद घेत होते, तर दुसरीकडे काही लोक अस्वस्थ होत होते. जे असुरक्षित होत होते त्यांच्यातील अस्वस्थता फारच वाढीस लागली होती. हा राग अन्यत्र निघून समोर असणाºया पती-पत्नीमधील वाद वाढू लागले. हाही कोरोनाचाच लॉकडाऊनचाच दुष्परिणाम होता. होता होता एका महिन्यात आॅफिसचे काम घरून करणाºया मोठ्यांच्या बरोबरीने तरुणांचा व लहानांचा स्क्रीन टाईम नकळत वाढला. आॅनलाईन शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळे कोर्सेस जाहीर केले. सर्टिफिकेटचेही महत्त्व पटवून दिले. दहावी-बारावीचे क्लासेसवालेही आॅनलाईन क्लासरूमचे समर्थन करायला लागले. युट्यूबर्स शिक्षकही पुढे सरसावले. आता तर शाळा आणि कॉलेजेसनी आपले वर्गच झूम आणि गुगल क्लासरूममध्ये भरवायला सुरुवात केल्याने विद्यार्थांना वही-पेनपेक्षा ही संगणक-मोबाईल आणि डेटा कनेक्शन अत्यावश्यक झाले आहे. कोरोनामुळे आर्थिक मंदी आलेलीच आहे. बेरोजगारी आणि पगारातही कपात आहे. वैयक्तिक असो अथवा व्यावसायिक, दोन्हीकडे ही आपत्कालीन रक्कम ज्यांनी राखीव ठेवली होती त्यांना फारसा त्रास झाला नाही. लॉकडाऊनच्या काळात केवळ काही जोड कपड्यांचे सहज पुरतात, चपलांचे एकच जोड पुरतात, गाडी नाही चालवली तर बिघडत नाही, बाहेर खाल्ले नाही तरी चालते, या आणि अशा रोजच्या राहाणीमानातल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला सहज कळल्या आहेत; पण तरीही आमचे पूर्वीचे जीवनमान परत कधी सुरू होणार हा प्रश्न आहेच. जीवनशैली बदलून टाकणारा हा रोग आहे; पण ते सर्वांना शक्य नाही हेही समजण्याची गरज आहे.
20/04/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा