स्टायलीश अभिनेता रजनीकांतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला. खरं तर त्याने गाजवलेली कारकीर्द पाहता हा त्याचा उचित सन्मान आहे, पण कारण नसताना त्यावर राजकारण करून काही राजकीय पक्षांनी तामिळनाडूतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिल्याची टीका सुरू केली. खरं तर रजनीकांतने आपण या निवडणुकीत सक्रीय नाही असे अगोदरच जाहीर केलेले असल्याामुळे या टीकेला काहीच अर्थ नाही, पण काहीही घडले की त्यात मोदी आणि सरकारवर टीका केलीच पाहिजे असे काही प्रवृत्तींचे मत असते. एखाद्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे मोठे मन आपल्यात का नाही, असा प्रश्न पडतो.
खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात एका मराठी माणसाने करमणुकीच्या क्षेत्रात, चित्रपट निर्माण करण्याची बहुमोल अशी कामगिरी केली, त्यामुळेच कदाचित रसिकत्वाचा गौरव झाल्याचा आनंद चित्रपट बघितला की नेहमी द्विगुणित होत असतो. ‘राजा हरिश्चंद्र’ असो की ‘आलमआरा’ ते आजच्या काळातील ‘रोबोट’ आणि ‘मख्खी’पर्यंतचा प्रवास जरी अनुभवला तरी ही काय जादू आहे, याची प्रचिती प्रत्येक रसिकाला आलेली असते. चित्रपटसृष्टीने भारतात फार मोठा उद्योग आणि आर्थिक विकास केलेला आहे. त्याचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार रजनीकांतला जाहीर झाला हे योग्यच आहे. मराठी माणूस दादासाहेब फाळके यांच्यामुळेच आपण हा आनंद घेऊ शकत आहोत, हे अभिमानाने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते. दादासाहेबांच्या नावाने दिला जाणारा या क्षेत्रातील सर्वोच्च असा प्रतिष्ठेचा पुरस्कार लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला.
चित्रपट बघणं हे खरोखरच एक वेगळं थ्रिल असतं. ते कालानुरूप बदलत गेलं. त्या काळी चित्रपट बघणं त्या पिढीला जसं आनंददायी वाटायचं तसंच आजदेखील वाटतं. तेव्हाचे चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोन आणि आता बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलला आहे. जसजसा चित्रपट निर्माण करण्याचा काळ बहरत गेला, तसतशी आपल्या सभोवतालची कल्पक, प्रतिभावान माणसं गवसत गेली. ज्या मराठी माणसाच्या नावाने हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो तो आपल्या मराठी माणसाला मिळण्यासाठी मात्र कितीतरी काळ जाऊ द्यावा लागला. १९६९ साली देविका राणी यांना हा सन्मान मिळाला आणि त्यानंतर १९८३ मध्ये तो मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांना मिळाला. त्यानंतरची मराठी नावे व्ही. शांताराम, लता मंगेशकर, भालजी पेंढारकर, आशा भोसले ही आहेत. या वर्षीचा म्हणजे ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. रजनीकांतदेखील मराठी माणूस. त्यांचं मूळ नाव शिवाजी गायकवाड. बंगळुरू येथे त्यांचा जन्म झाला, मात्र या कलाकाराने केवळ हिंदीच नव्हे, तर तमीळ, तेलगू, कन्नड या भाषांतील चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आणि रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला! एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील सामाजिक क्षेत्रातील रजनीकांत यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
रजनीकांत यांचा चित्रपट बघणे म्हणजे अक्षरश: थरारक, मजेशीर आणि अद्भूत अनुभव असतो. त्यांचा चित्रपट बघण्यासाठी मग आधीच्या पिढ्यादेखील उतावीळ असतात, यातच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीचं यश सामावलं आहे. सिगारेट भिरकावून ओठांत घेणे, गॉगल लावण्याची, हसण्याची स्टाइल अफलातून आहे. यामुळेच हा अभिनेता सर्वांचा लाडका आहे. त्याच्या या स्टायलीश आणि सुपरमॅन टाइप सर्वशक्तिमान व्यक्तिमत्त्वामुळे त्याच्यावर विनोदही भरपूर असतात. सोशल मीडियात तर रजनीकांतवर अतिशयोक्ती असे असंख्य विनोद सातत्याने फिरत असतात. ही त्याच्या लोकप्रियतेची पावती असते. कारण रजनीकांतच्या बाबतीत अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणेही अशक्य नव्हतेच. तो आत्ता मिळाला हे विशेष.
रजनीकांतच्या स्टाइल उचलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण तो कुणाला जमला नाही. त्यामुळेच त्यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिवस त्यांचे चाहते विश्व शैली दिवस म्हणून साजरा करीत असतात. तब्बल पाच दशके सिनेजगतावर राज्य करणाºया या अभिनेत्याच्या कलागुणांचा खºया अर्थाने या पुरस्कारामुळे गौरव झाल्याचे रसिकांना वाटत आहे. तसे बघितले तर रजनीकांत यांना २००० मध्ये पद्मभूषण, २०१६ मध्ये पद्मविभूषण तसेच अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जवळपास १९० चित्रपटांतून अभिनय केला आहे. दक्षिण भारतात, विशेषत: या कलाकाराला परमेश्वर म्हणून पुजले जाते इतकी त्यांची लोकप्रियता आहे. चाहत्यांनी रजनीकांत यांचे मंदिरदेखील उभारले आहे. त्यामुळे रजनीकांतच्या मुकुटात आणखी एक मानाचा महत्त्वाचा तुरा या पुरस्काराने खोवला गेला आहे.
दक्षिणेतील प्रेक्षकांचे आपल्या कलाकारावरील प्रेम हे अभूतपूर्व असते. तिथे पडद्यावरील नायकाला देव मानले जाते. मग ते एन. टी. रामाराव असोत, जे. जयललिता असोत, राजकुमार असो की रजनीकांत. मोहनलाल, मामुटी अशा अनेकांनी हा सन्मान मिळवला आहे, पण यात सर्वाधिक लोकप्रियता गेल्या काही दशकांत रजनीकांतने सातत्याने मिळवली आहे. कोणत्याही अभिनेत्याच्या चित्रपट शुभारंभ शोसाठी प्रेक्षक गर्दी करीत नाहीत, एवढी गर्दी रजनीकांत यांच्या पहिल्या शोसाठी होत असते. थलायवा अर्थात नेता किंवा बॉस म्हणून परिचित असलेल्या या अभिनेत्याच्या सामर्थ्यामुळे चित्रपटसृष्टीला एका अद्भूत कलाकाराची देणगीच जणू मिळाली. त्या कर्तृत्वाचा उचित गौरव झाला, असे म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा