अक्षय हा एकाकी मुलगा होता. जेमतेम तेरा-चौदा वर्षांचा हा मुलगा घरात सगळं काही असूनही एकाकी जीवन जगत होता. त्याच्या वयाच्या बाकीच्या मुलांमध्ये हसणे, खेळणे, हुल्लडपणा करणे असले गुण होते; पण हा अगदी शांत-शांत आणि एकाकी होता. कारण माणसाला जीभ, तोंड हे संवादासाठी दिलेले जे अवयव आहेत त्याचा वापरच होत नव्हता. त्यामुळे त्याचे जीवनच एकटेपणाचे झाले होते. त्याचे विश्व एकट्याचे होते.
आई-वडील, घर सगळं काही होतं; पण त्याच्याकडे बघायला कुणाला वेळ नव्हता. आई-वडील दोघेही पैसा कमवण्यासाठी बाहेर पडत. पैसा कमावला पण त्यांना सुख आणि समाधान कमावता आले नव्हते. अजून कमवले पाहिजे या अट्टाहासापायी ते दिवस-दिवस बाहेर असायचे. लहान असल्यापासून पाळणाघर, प्लेस्कूल असा प्रवास करत-करत मोठा झाल्यावर ‘आता तू एकटा घरात राहू शकतोस’ असे बिंबवले गेले. त्यामुळे सकाळी जेवणा खाणाची सोय करून आई-वडील बाहेर पडले की रात्री उशिरा घरी येईपर्यंत अक्षय हा एकाकीच असायचा. आसपास मित्रांमध्ये मिसळावे असेही त्याला वाटायचे नाही. कारण आपलेच असलेले आई-वडील आपल्यापासून लांब आहेत, मग हे बाहेरचे मित्र कुठे जोडायचे.
पहिलीपासून सातवीपर्यंत स्कूल बसने तो शाळेत जायचा-यायचा. शाळेतून आल्यावर जे ठेवलेले असेल ते खायचे आणि वाट पहात बसायचे. कधीकधी आई-वडील यायच्या अगोदर झोपूनही जायचा. आई-वडिलांशी त्याचा संवादच होत नव्हता. त्यामुळे तो एकाकी बनत गेला होता.
आठवीला गेल्यावर मात्र त्याच्या मनात कल्पना आली. आईने स्कूल बससाठी दिलेले पैसे त्याने बसला भरलेच नाहीत. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपण चालतच शाळेला जायचे आणि यायचे असे ठरवून त्याने ते पैसे तसेच साठवून ठेवले. मग शाळेतून येताना रमत गमत रस्त्याने दिसेल ते पहात यायचे. कुठे बांधकामाची वाळू टाकलेली असते. त्या वाळूत खेळायचे. वाळूतील शंख गोळा करायचा नाद त्याला लागला. त्याने इतके शंख जमवले होते की, त्या शंखांबद्दल त्याला प्रेम वाटायचे. त्या शंखांप्रमाणेच आपण आहोत असे वाटायचे. आपणही एक प्रकारचे शंख आहोत, असेच वाटून त्या शंखांवर तो प्रेम करायचा. शंख म्हणजे पाण्यातून, समुद्रातून आलेले. या शंखांमध्ये छोट्या किटकांची घरे असतात. शंखांमुळे किटक सुरक्षित राहतात; पण त्या शंखांचे ओझे वाटल्यावर ते किडे त्या शंखांना बाजूला करतात आणि निघून जातात. आपल्यालाही असेच बाजूला केले का? पण हे कोणाशी बोलणार? त्यामुळे त्याने इतके शंख जमवले होते की, तो त्याचा छंदच बनला होता. कधी समुद्रावर, कधी खाडीत जायचे आणि मिळतील तेवढे शंख गोळा करायचे. त्याची सगळी खोली, स्टडी रूम, कपाट, वॉर्डरोब अशा शंखांनी भरून गेले होते.
एकेदिवशी असाच शाळेतून उशिराने घरी परत आला. तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. मम्मी-पप्पा दोघेही घरात होते. आल्या आल्या त्यांनी विचारले, ‘अक्षय, अरे किती उशीर? शाळा सुटून दोन तास उलटले. स्कूलबसमधून सगळी मुले घरी पोहोचली; पण तू अजून कसा आला नाहीस म्हणून आम्ही काळजी करत होतो. कुठे ट्यूशनला गेला होतास का?’ मम्मीने विचारले तसा फक्त मान हालवली आणि आपल्या स्टडीरूममध्ये गेला. दप्तर ठेवून हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. आईने किचनमधेूनच विचारले, ‘चहा घेणार आहेस का अक्षय?’
अक्षय बाहेर आला आणि काही न बोलता किचनमध्ये गेला. आपल्या हाताने डब्यात ठेवलेले बर्गर घेतले आणि रूममध्ये जाऊन खात बसला. त्यानंतर आपल्या हातानेच चहा केला आणि तो पिऊन पुन्हा खोलीत जाऊन बसला. पप्पा टीव्ही बघत बसले होते. मम्मीला अक्षयचे वागणे थोडे विचित्र वाटले; पण शाळेत कंटाळून आला असेल, म्हणून ती काहीच बोलली नाही. बाकी त्याची विचारपूसही खूप दिवसांत केलीच नव्हती. त्याला पाहिजे तसे पैसे दिले की, आपले पालन-पोषण संपले असेच दोघांना वाटत होते; पण अक्षयची भूक ही प्रेमाची होती. मम्मीने आई झाले पाहिजे, प्रेमाने डोक्यावरून हात फिरवावा, कौतुक करावे, लाड करावे, काहीतरी छान बोलावे, खाऊ घालावे असे त्याला वाटायचे; पण हे बोलण्याचे धाडसही त्याला उरले नव्हते, इतका तो एकाकी झाला होता. मम्मी आॅफीसला जाताना भरभरून पॉकेटमनी देत होती; पण तो खर्च करावा, असेही त्याला वाटत नव्हते. तो त्या पैशांचा उगाच वापरही करत नव्हता, तसेच साठवून ठेवत होता.
अशाच विचारात तो झोपी गेला. सकाळी उठून पाहतो तर सगळे वातावरण बदलले होते. तो उठायच्या आतच त्याची खोली, खिडक्या उघडल्या होत्या, त्याच्या खिडक्यांचे पडदे बदलले होते. मोकळी हवा घरात आली होती. त्याची भरलेली रूम अगदी रिकामी रिकामी झाली होती. तो ताडकन उठला. त्याच्या कपाटात, स्टडी रूममध्ये ठेवलेले सगळे शंख गायब झाले होते. तो जोराने ओरडला, ‘मम्मी...’ मम्मी धावत आली. हसून म्हणाली, ‘धक्का बसला ना? पाहिलंस मी घर कसं स्वच्छ केलं आहे ते? कितीरे पसारा केला होतास? आता छान वाटतंय ना? तो सगळा कचरा मी फेकून दिला बघ आणि काय रे अक्षय ते शंख काय जमवले होते उगाच?’
‘ते शंख पण तू फेकून दिलेस मम्मा?’ अक्षयने गंभीर होत विचारले. मम्मीने मान डोलावली. तसा अक्षयचा चेहरा रडवेला झाला. मम्मीने विचारले, ‘काय रे काय झाले? तुझी रूम मी साफ केली ना?’ ‘मम्मा... ते माझं विश्व होतं गं. त्या शंखाच्या साथीत तर मी जगत होतो. मीही एक शंखच बनलो होतो. शंखातले किडे आपलं घर सोडून निघून जातात. शंख एकाकी पडतो. असे सगळे एकाकी पडलेले शंख मी गोळा केले होते. मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांची समजूत काढत होतो. तुमच्या घरात ते किडे येतील परत. तुमचं शंखांच घर भरलं जाईल. मम्मा काल अचानक तुम्ही घरात आलात म्हणून तुम्हाला मी उशिरा आलो हे समजले; पण मी रोजच या वेळेला येतो. मुलांचा जीव आई बापात असतो. पण मी आसपास पाहायचो तसा माझा जीव त्या शंखांप्रमाणेच मला सोडून गेलेला दिसला. लॉकडाऊनमुळे तुम्ही काही काळ घरात रहाल. माझ्याबरोबर असाल. पण नंतर तर माझं विश्व हे शंखांचंच असणार ना? ’
मम्मीला तिची चूक कळली आणि तीने आई होऊन त्याला जवळ घेतले. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, ‘बाकीच्यांचं माहिती नाही मला; पण आता तुझी अतृप्ती मी पूर्ण करणार आहे. आता पैशांच्या नाही, तर तुझ्यासोबत असेन मी. त्या शंखांसारखं निर्जिव झालेलं तुला मला नाही पहायचं. आता मी घर सांभाळायचा निर्णय घेतला आहे.’ हे ऐकून अक्षयला इतका आनंद झाला की त्यानं आई म्हणून जवळ जात कडकडून मिठी मारली. लांबून पाहणाºया वडिलांनीही आपले डोळे पुसले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा