देशातले आणि राज्यातले एकूणच राजकारण पाहता सर्वसामान्य जनतेला या राज्यकर्त्यांची कीव करावीशी वाटते. सामान्य जनता पोटासाठी, कामासाठी, किमान गरजांसाठी तडफडते आहे आणि राज्यकर्त्यांना फक्त राजकारण करून आपले मोठेपण दाखवण्यात आनंद वाटतोय. हा प्रकार म्हणजे रोमन इतिहासातील राजाच्या कथेप्रमाणे म्हणावे लागेल. रोम एकीकडे जळत होता आणि तो राजा मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करून आपले फिडल वाजवण्यात गुंग होता. आज केंद्रातील असो वा राज्यातील राज्यकर्ते असेच वागताना दिसत आहेत. जनतेचे हाल होत असताना केंद्र सरकारमधले महत्वाचे नेते अगदी पंतप्रधान, गृहमंत्री आणि सर्व दिग्गज पश्चिम बंगालच्या निवडणुकीत गुंतले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी धडपडणे यापलीकडे काही दिसत नाही. तोच प्रकार राज्यातही होताना दिसत आहे. जनतेने अतोनात हाल होत असताना, राज्यातले नेते रेमडेसिवीर, लसीकरण याचे राजकारण करून आपली जबाबदारी झटकत आहेत. हे अत्यंत क्लेशदायक असे वातावरण आहे.
कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटाच्या कालावधीमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही, असे पालुपद सर्वच राजकीय पक्ष आळवत असले, तरी देशात या परिस्थितीतही राजकारण मात्र सुरूच आहे. त्यामुळे आम्हाला राजकारण करायचे नाही असे एकीकडे म्हटले जात असताना, मग राजकारण नक्की कोण करतेय, असा प्रश्न जर सामान्य नागरिकांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांना विचारला, तर त्याचे खरे उत्तर कोण देणार? भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये राजकारण हा अपरिहार्य घटक मानला जातो. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी राजकारण्यांची असल्याचे दिसते. राजकारणापलीकडे देश, जनहित, समाजहित काही आहे की नाही?
देशात घडणाºया कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटनेचा राजकीय फायदा आपल्याला व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात हे लपून राहिलेले नाही. कोरोना महामारीच्या संकटाचाही आपल्याला राजकीय फायदा व्हावा, अशी भूमिका जर या राजकीय पक्षांनी घेतली, तर त्यात सामान्य नागरिकांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही, असे दांभिक विधान मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करू नये. कारण सर्वसामान्यांचे कोणाला काहीही पडलेले नाही. लॉकडाऊन झाल्यावर सामान्य माणसांचे काय हाल होत आहेत, याची राज्यकर्त्यांना काही पडलेली नाही. त्यांना आपली खुर्ची स्थिर कशी राहील, अशी फिल्डींग लावायची आहे. त्यामुळे या सर्वांचीच अवस्था एकीकडे रोम जळतोय; पण राजा मात्र फिडल वाजवत बसला आहे. रोमन राजाला फिडल या वाद्याचा छंद होता. त्या पलीकडे त्याला काही दिसत नव्हते. तसेच आजचे राजकीय पक्ष आपल्या तोंडातून जे शाब्दीक बुडबुडे सोडत आहेत तो प्रकार म्हणजे फिडल वाजवण्याचा प्रकार आहे. जनता मरू देत, जनता गेली खड्ड्यात, आम्ही फक्त राजकारण करत राहणार एवढेच राज्यकर्त्यांना, राजकीय पक्षांना जमते. त्यामुळे कोणत्याच पक्षावर आता सामान्य माणसाचा विश्वास राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे.
गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध घटना आणि त्या घटनेच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेली विधाने पाहिली, तर प्रत्येकालाच राजकारण करायचे आहे आणि त्या राजकारणाचा फायदा हवा आहे. हाच निष्कर्ष काढता येऊ शकतो. फक्त मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली, याप्रमाणे आम्ही राजकारण करत नाही एवढे बडबडत रहायचे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला होणारा लसींचा पुरवठा असो किंवा महाराष्ट्रात जाणवणारी आॅक्सिजनची टंचाई असो किंवा रेमडेसिवीर या इंजेक्शनची टंचाई असो या सर्वच विषयांमध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हे राजकारण सध्या रंगत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस देशात सर्वात जास्त असूनही त्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही हे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांचे गाºहाणे आजही कायम आहे. महाराष्ट्राला कमी प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शने मिळावीत यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा आरोपही महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून केला जात आहे.
हे काही चांगले नाही. असे कोणी करेल का? ते लसींचे वाटप काय मोदी करत बसले आहेत का? महाराष्ट्रात कोरोना लसींची उपलब्धता वाढविण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूटसारख्या संस्थेला लस निर्मितीची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा राजकीय फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि शिवसेनेचे नेते प्रयत्नशील आहेत. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामुळेच हाफकिन इन्स्टिट्यूटलाही परवानगी मिळाली, असा दावा आता मनसेकडून केला जात आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यातच नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवल्यामुळे ही परवानगी मिळाली आहे, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे जनहित महत्त्वाचे नाही तर श्रेयवाद, सत्तेचे कारण यासाठी सारे काही. सर्वसामान्य जनतेला लस मिळो ना मिळो, अत्यावश्यक सेवा मिळो ना मिळो आम्ही काय केले आहे हे फक्त समजले पाहिजे. आज जनता जीवंत आहे, जगत आहे ते आमच्यामुळे यासाठी आम्हाला श्रेय मिळाले पाहिजे यासाठी अट्टाहास. बाजारात तुरी म्हणतात तसा हा प्रकार आहे. हाफकीनची लस तयार होण्यासाठी कितीतरी कालावधी लागणार आहे; पण काही नेत्यांनी आता तुटवडा कमी झाला आहे, कारण हाफकीनची लस आली आहे, अशी वाच्यता सुरू केलेली आहे. हा प्रकार राजकारण नाही तर काय? त्यामुळे केंद्र ते राज्यच नाही तर अगदी गल्ली ते दिल्ली नेतेमंडळींना जनतेचे काही पडलेले नाही, फक्त फिडल वाजवत बसायचे माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा