गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

काळाकुट्ट अंधार


आज देशापुढे फक्त कोरोनाचा प्रश्न आहे असे दिसत असले, तरी खरे गंभीर संकट फार वेगळे आणि मोठे आहे. यातून देशाला सावरणे फार अवघड जाणार आहे. त्यामुळे कोरोना हा फक्त आरोग्यावर हल्ला करणारा रोग ठरलेला नाही, तर सामाजिक आर्थिक स्वास्थ्य हिरावणारा रोग ठरलेला आहे. कोरोनावर लस घेऊन मात करता येईलही; पण त्यामुळे निर्माण झालेले परिणाम कसे सावरायचे हा खरा प्रश्न आहे. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा आहे. कोरोनाने आरोग्यापेक्षा रोजगारावर केलेला हल्ला फार मोठा आहे. कोरोनामुळे निर्माण झालेला लॉकडाऊन, उद्योग बंद पडणे, व्यवहार बंद पडणे यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी आणि नंतर त्या बेरोजगारांना सावरणे हे फार मोठे आव्हान आहे. त्यामुळे जर ही बेरोजगारी वाढत गेली आणि लवकरात लवकर लॉकडाऊन संपून रोजगार निर्मिती झाली नाही, तर या देशात अराजक माजू शकते. गुन्हेगारीचा विळखा तयार होऊ शकतो. आत्महत्यांचे प्रमाण वाढेल ही भीती आहे. ही भीती कोरोनापेक्षा भयानक आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि सगळं बंद करताना राज्यकर्त्यांना ही दुसरी बाजूही बघावी लागेल. कोरोनाच्या साथीत तब्बल १२ कोटी रोजगार गेल्याचे सीएमआयईचा अहवाल सांगतो. या श्रमिकांचे भवितव्य काय आहे, तर समोर फक्त अंधकार आहे. हा काळाकुट्ट अंधार देशाला कुठे घेऊन जाईल हा खरा प्रश्न आहे.

दरवर्षी एक कोटी नवे रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात दिले होते. ते आश्वासन पूर्ण करता आले नाहीच; पण सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आहे तोच रोजगार गेला, अशी परिस्थिती निर्माण झाली. ही फार भयानक स्थिती आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या साथीने लाखो जणांना बेरोजगार केले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)च्या नुसार कोरोनाच्या साथीत सुमारे ५५ लाख रोजगार नष्ट झाले. २०१९-२०च्या मार्चमधील रोजगारांच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च अखेरीस उपलब्ध माहितीवर हा निष्कर्ष आधारित आहे; मात्र या काळात तब्बल १ कोटी पगारी नोक‍ºया नाहीशा झाल्या. ही संख्या निश्चितच मोठी आहे. दरमहा ठराविक वेतन जेथे मिळते, ती पगारी नोकरी समजली जाते. केंद्र आणि राज्य सरकार दोघांकडेही आज याचे उत्तर नाही ही वस्तुस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे जनता कशी देशोधडीला लागते आहे, याचे विवेचन कोणी करण्यास तयार नाही. स्टुडीओत बसून त्यांचे पगार सुरू आहेत, म्हणून जनतेला कोंडून ठेवण्याचे आणि अक्कल शिकवण्याचे, गर्दी करू नका, बाहेर पडू नका सांगण्याचे काम हे करत आहेत; पण प्रचारसभांना हजारोंची गर्दी होत आहे. यावर एक अक्षर या वाहिन्या बोलत नाहीत, याचे आश्चर्य वाटते.


गेल्या वर्षभरात जे बेरोजगार झाले आहेत, त्या १ कोटी पैकी ६० टक्के नोक‍ºया ग्रामीण भागातील आहेत. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना कोरोनाच्या साथीपेक्षाही लॉकडाऊनचा फटका अधिक तीव्रतेने बसल्याने या क्षेत्रातील पगार मिळवणारे कामगार बेरोजगार झाले, असे या संस्थेचे प्रमुख महेश व्यास यांनी म्हटले आहे. रोजगार गमावलेली माणसे शेती क्षेत्राकडे वळल्याचे पाहणीत आढळले आहे. शेतीमध्ये उत्पन्न जास्त आहे असे नाही, तर जगण्यासाठी आधी मिळत असलेल्या वेतनापेक्षा कमी रोजंदारीवर काम करणे त्यांना भाग पडत आहे. अर्थव्यवस्था खुली होऊ लागल्यावर ग्रामीण भागातून शहरात कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी लोंढे येत होते आता त्या उलट चित्र दिसत आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर राज्यातील अर्ध्याहून अधिक कारखाने बंद पडले आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. बड्या उद्योगांचे कारखाने सुरू असले, तरी त्यांनीही कामगार कपात केली आहेच. देशाच्या इतर भागांतील स्थिती फार वेगळी नाही. कोरोनाची नवी साथ रोखण्यासाठी राज्ये नवे निर्बंध लागू करतील, तेव्हा आणखी रोजगार गमावले जातील हे स्पष्ट आहे.

गेल्या पंधरा दिवसांत लोंढेच्या लोंढे आपापल्या गावाकडे वळताना दिसत आहेत. रेल्वे स्थानके, बसस्थानके भरलेली दिसत आहेत. ही लोकं रोजगार गेल्यामुळे देशोधडीला लागून आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे दारिद्र्य रेषेखाली येणाºयांची संख्या वाढली आहे. बेरोजगारी वाढली त्याच बरोबर सामान्यांचे उत्पन्नही घटले आहे, कारण अनेक कंपन्या, कार्यालये यांनी वेतनकपात केली. देशपातळीवर सर्वसाधारणपणे घरगुती उत्पन्न २० टक्के घटले आहे. संकट काळात नवा रोजगार किंवा नोकरी मिळवण्यासाठी नवी कौशल्ये शिकून घ्यावीत, असा सल्ला तज्ज्ञ देतात; पण खाजगी बँकेतील व्यवस्थापक एका रात्रीत शेतकरी कसा बनू शकेल? गेल्या वर्षभरात रोजगार गमावणाºया महिलांची संख्याही वाढली आहे. सरकारकडून बेरोजगारीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यावर सरकार किंवा या वाहिन्या प्रतिक्रिया देत नाहीत. या घटनेचे विश्लेषण करण्याची गरजही त्यांना वाटत नाही ही खेदाची बाब आहे; पण ही सगळी अराजकतेकडे वाटचाल चालली आहे. त्यामुळे आगामी काळातील भवितव्य काय असणार आहे याची सर्वांना चिंता आहे. सगळीकडे अंधकार आहे. बेरोजगार निर्माण करण्याचे हे प्रकार कोरोनापेक्षा भयंकर आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर न करणे महत्त्वाचे आहे. माणसांना जगण्यासाठी म्हणे लॉकडाऊन आहे; पण जगली, तर त्यांनी उपाशी रहायचे का? जगायचे कसे असाही प्रश्न आहेच ना? त्यामुळे अनेक संकटे घेऊन आलेला हा रोग आहे; पण या रोगावर लॉकडाऊन हा पर्याय नाही, तर दोन हात करण्यासाठी फुल टाईम वर्क हाच पर्याय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: