ही परिस्थिती केवळ भारतात आहे असे नाही, संपूर्ण जगभरात आहे. फक्त जगभरातील अंमलबजावणी आणि भारतातील अंमलबजावणी यात जमीनअस्मानाचा फरक आहे. माणसांना वेठीस धरणे हा प्रकार यातून होताना दिसत आहे. यात शोषणकर्त्याची वाढ होताना दिसत आहे. अधिकाराच्या आधारावर सामान्यांचे होणारे शोषण हे सर्वांच्या दृष्टीने घातक आहे. म्हणूनच शोषणमुक्त निर्बंध असले पाहिजेत.
आज संपूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त झाले आहे. आता मनुष्यजात स्वत:ला घरात कोंडून बसली नसली, तरी कोरोनाने माणसावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. अजूनही जर आम्ही स्वत:ला सुधारू शकलो नाही, तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी मनुष्यजातच या भूतलावरून नष्ट होईल! म्हणजे अशी भीती तर निर्माण केली जात आहे. कोरोना विषाणूने मानवजातीच्या विनाशाची सुरुवात केली आहे. भारतासह जगातल्या अनेक प्रगत देशांतील मृतांचा आकडा तपासला तर या संकटाचे स्वरूप किती भयंकर राहू शकते, याचा विचार आताच केला पाहिजे. मनुष्यजातीने आत्मसंयम बाळगणे फारच महत्त्वाचे झाले आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेपायी संपूर्ण मनुष्यजातीचे, जगाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सगळ्या देशांनी घेतली पाहिजे. आर्थिक विकासाची एक मर्यादा प्रत्येक देशाने ठरवून टाकली पाहिजे. या मर्यादेपलीकडे आपल्याला जायचे नाही आणि ते आपल्याला परवडणारेही नाही, हे एकदाचे ठरवून टाकले, तर निश्चिंतपणे पुढली वाटचाल करता येणार आहे. कोरोना संकटापासून धडा घेत आम्ही दिशा निश्चित करून वाटचाल केली, तर मनुष्यजातीला कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही, याची खात्री बाळगली पाहिजे. याचे प्रमुख कारण ही स्पर्धा आहे.
स्पर्धेमुळे आणि आम्हीच कायम नंबर एकचे राहिलो पाहिजे या अहमहमिकेतून गैरमार्गांचा अवलंब होतो. चीनने जगाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी, आपले वर्चस्व जगावर दिसावे यासाठी हे महासंकट जगावर लादले आणि त्या संकटाशी मुकाबला करण्यात सगळं जग गुरफटलेले आहे. राज्यकर्ते आम्हीच कसे जनतेचे कैवारी आहोत आणि विरोधक कसे दुष्ट आहेत या स्पर्धेत जनतेला वेठीस धरत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या देशाचा कैवारी आहे आणि त्यांचे विरोधक कसे बेफिकीर आहेत हे दाखवण्यात धन्यता मानतात. या स्पर्धेमुळे विनाशाकडे वाटचाल चालली आहे. वृत्त प्रसारित करणारी चॅनेल आपल्याकडे कशी खास ब्रेकिंग न्यूज असेल आणि नंबर वन आपण राहू या विचाराने गॉसिपिंग आणि घाबरवणारी वृत्ते देताना दिसत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा सामान्यांचे शोषण करताना दिसत आहे. या वृत्तवाहिन्या जर १५ दिवस बंद ठेवल्या तर देशातले बरेचसे प्रश्न सुटतील. सध्या राज्यात लसीचा तुटवडा आहे यावरून जे राजकारण आणि अतिरंजीत बातम्या दिल्या जात आहेत त्यावरून या वाहिन्या सामान्यांची फसवणूक करतात असे दिसून येते. नेत्यांना, मंत्र्यांना चुकीचे बोलण्यास भाग पाडतात. हे सगळे स्पर्धेतून घडते आहे. लसीचा पुरवठा हा काही गहू, तांदूळ, ज्वारीसारखा गोडावूनमध्ये साठवून ठेवता येत नाही. त्याला एक्स्पायरी असते. त्यामुळे तो ठराविक काळानेच पुरवठा होणार असतो. त्याचे नियोजन महत्त्वाचे असते, पण ते या वाहिन्यांच्या अतिरंजीत बातम्यांमुळे झाले नाही. सुरुवातीला आवाहन करूनही कोणी लसीला तयार होत नव्हते, पण पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री मोठमोठ्या नेत्यांनी लस घेतल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळू लागला, पण वाहिन्यांनी लसींचा पुरवठा कमी, राज्यावर केंद्र सरकार अन्याय करते, असे वृत्त देण्यास सुरुवात केली आणि आता इथून पुढे लस मिळणारच नाही, असे वातावरण तयार केले. त्यामुळे आहेत तोपर्यंत लस घेतली पाहिजे म्हणून लोक गर्दी करू लागले. उद्या पाणी येणार नाही, असे पालिकेने जाहीर केल्यावर लोक विनाकारण जास्तीचा संचय करतात आणि दुसºया दिवशी तो साठा ओतून देतात, तसाच प्रकार झाला. टंचाईचे राजकारण केले की, माणसं साठेबाजी करतात, रांगा लावतात, गर्दी करतात हे तत्त्व लक्षात घेऊन स्पर्धेतून आम्ही काहीतरी वेगळे वृत्त देत आहोत या भूमिकेने अतिरंजीत बातम्या दिल्या गेल्या. हे फार घातक आहे.
स्पर्धा कोणतीही वाईटच. या स्पर्धेतून कोरोनाचा जन्म झाला आहे. त्या कोरोनापायी बाकीचे नको त्या स्पर्धा करायला लागले आणि जगाला वेठीला धरू लागले. यात सामान्यांचे हाल होताना दिसत आहे. हे शोषण थांबले पाहिजे.
कोरोना विषाणूने आज संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. मनुष्याने ओढवून आणलेले हे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आज आपल्या राज्यात आणि देशात कोरोनाने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून परिस्थिती बिघडतच चालली आहे. गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात मजुरांचे जे स्थलांतर झाले, त्या स्थलांतरामुळे त्यांचे जे हाल झाले, ते आपल्या स्मरणात असतीलच. आज तर परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षाही बिकट झाली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी मोठा फटका बसणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील स्पर्धा आणि वाहिन्यांची वृत्तं देऊन टीआरपी सांभाळण्याची स्पर्धा यात सामान्यांची फरफट होत आहे. त्यामुळे या स्पर्धेला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा