गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

काळाचे भान हरपले, रात्रीस खेळ चाले...


‘रात्रीस खेळ चाले-३’ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसºया पर्वाचे ९ भाग झाले आहेत. त्यात रंजकताही भरपूर आहे. या पर्वाला पहिल्या दोन पर्वांपेक्षा अधिक पसंती मिळेल यात शंकाच नाही, पण या मालिकेत कथानकात आणि काळाच्या चक्रात बराच ढिसाळपणा दिसतो. त्यामुळे काळाचे भान हरपले रात्रीस खेळ चाले असे या मालिकेचे वर्णन करावे लागेल.

बहुतेक प्रेक्षकांनी या मालिकेची तीनही पर्व पाहिलेली आहेत. किंबहुना पहिले पाहिले त्यांनी दुसरे आवर्जून पाहिले आणि दुसºयाच्या लोकप्रियतेमुळे तिसरे पाहिले जात आहे, पण कथानकात रंजकता असली तरी काळाचे भान सुटले आहे हे वारंवार जाणवते.


पहिला भाग आणि दुसरा भाग यात २५ वर्षांचे अंतर होते. पहिला भाग आणि तिसरा भाग यात वीस वर्षांचे आणि दुसरा भाग आणि तिसरा भाग यात साधारण ४० वर्षांचे अंतर असले पाहिजे. दुसरा भाग हा काळाचे चक्र फिरवून अगोदरचे कथानक दाखवले होते. पहिल्या पर्वात दत्ताला गणेश आणि एक मुलगी पूर्वा असते. यातील गणेश मोठा साधारण २२ वर्षांचा, तर पूर्वा २० वर्षांची दाखवली आहे. सुषमा पण २० वर्षांची दाखवली आहे. दुसºया पर्वात गणेश आणि पूर्वा यांचा काही उल्लेखच नाही, मात्र सुषमा १० वर्षांची दाखवली आहे, तर अभिरामही १२ वर्षांचा दाखवला आहे. पहिल्या भागानंतरचा किमान १५ वर्षांचा आणि दुसºया भागानंतर किमान २५ वर्षांचा काळ लोटलेला आहे, पण काही पात्रं मोठी झाली आहेत, तर काही आहेत तेवढीच दिसतात. ही काळाची जादू न पटण्यासारखी आहे.

म्हणजे अभिराम आहे तसाच तरुण दिसतो. पहिल्या लग्नानंतर देविकाशी घटस्फोट होतो, कावेरीशी लग्न करतो, अमेरिका ते बंगळुरू असा प्रवास करतो आणि पंधरा वर्षांनी साधारण घरी येतो, पण आहे तेवढाच दिसतो. तीच गत पांडूची. त्यात पहिल्या, दुसºया आणि तिसºया भागात कसलीही वाढ नाही. आहे त्याच वयाचा पांडू राहतो. त्यामुळे लेखक, दिग्दर्शकाला विचारावेसे वाटते की, खुळ्यांची वाढ होत नाही का? इंदू पार काळी ठिक्कर पडली आहे, सुरकुत्या पडल्या आहेत, डोळ्यांच्या खाचा झालेल्या आहेत, अगदी नव्वदीच्या घरात आहेत, पण बाकीच्यांचे वय कसे वाढले नाही हा संदर्भ या मालिकेत गमतीशीर वाटता, पण मालिकेतील कथानक मात्र जबरदस्त रंजक घेतलेले आहे.


गमतीचा भाग म्हणजे पोस्टमनचा खून अण्णांनी केलेला आहे. तो मेलेला आहे हे दत्ता आणि सरिता फिरायला जाताना त्याचे प्रेत सापडते आणि पहिल्यांदा इंदूला कळवतात. तरीही अभिरामाला पत्र लिहायला तो समोर पोस्टमन येतो आणि त्याच्याकडून ती लिहून घेते. मग इंदू भ्रमिष्ट झालेली आहे की ती जिवंतच नाही, फक्त घुटमळते आहे तिथे? पांडू या खुळ्याला अण्णा, शेवंता यांचे अस्तित्व पहिल्या भागापासून जाणवते आहे. तसेच इंदूला जाणवत असेल तर इंदू वेडी झाली आहे का, असा प्रश्न पडतो.

सुशल्यामध्ये २० वर्षांत प्रचंड बदल झालेला आहे. तिने लोकांना लुबाडून बक्कळ पैसा कमावला आहे, बंगला बांधला आहे, गावात तिने अण्णांसारखा वट निर्माण केला आहे. हे सगळं होण्यासाठी किमान १५ वर्ष तरी लागलेली असतील. कारण गावात पूर्वीची माणसे नाहीत तर पुढची पिढी आहे. याचे कारण रघुकाकाचा रघुनाथ महाराज झाला आणि छायाची छाया माँ झालेली आहे. हा बदल होण्यास वीस वर्षं तरी लागली असतील. कारण रघुला सगळा गाव ओळखत असतो आणि छायालाही अण्णांची विधवा पोरगी म्हणून गाव ओळखत असतं. तरीही ती ओळख पुसून हे नवे महाराज आश्रम तयार करून राहात आहेत, हे होण्यासाठी २० वर्षं लोटली असावीत. गावातील ए टू झेड काम करणाºया दलालापासून सगळे लोक नवे आहेत. म्हणजे काळ खूपच पुढे लोटलेला असताना अभिरामचे वय कसे वाढले नाही? पांडूत काहीच बदल कसा घडला नाही? हे अनाकलनीय आहे.


दत्ताला लागलेले दारूचे व्यसन, चोºया करण्याची लागलेली सवय, सरितावर ओढवलेली दारिद्र्याची अवस्था हे ओघाने पुढील भागात समजेल, पण तिची मुलगी पूर्वा, मुलगा गणेश यांचे काय झाले हे अनुत्तरित आहे, पण सध्या जे कथानक दाखवले जात आहे त्यात पुरेशी रंजकता आहे हे नाकारता येणार नाही. कावेरीत शिरलेला शेवंताचा आत्मा पांडूला कळतो. आरशात कावेरीचे प्रतिबिंब शेवंताचे दिसते आणि पांडू शेवंता आली म्हणतो तेव्हा सगळेजण हादरतात. कावेरीला झपाटल्यानंतर स्वप्नात स्वत:चे प्रेत दिसणे, अभिराम आपल्याच प्रेतासमोर रडतो आहे, इंदू आपले दिवस घालत आहे, असले प्रकार दिसणे हे मालिकेतील नाट्यमयता वाढवणारे असले, तरी काही बाबतीत काळाचे पूर्ण भान हरपल्याचे दिसते हे नक्की.

आगामी काळात ही काळाची विसंगती काढून टाकली आणि सर्व अपूर्ण, अनुलेखीत गोष्टींचा उलगडा केला, तर ही मालिका यशस्वी ठरेल, दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरेल, माधवला वेड लागले आणि तो भरकटला आहे, पण अभिरामच्याच वयाचा असलेला आणि थोडा लहान असलेला माधवचा मुलगा आर्चितचे काय झाले हे पण समोर येणे आवश्यक आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना आपला ट्रॅक सापडला आहे, भूमिका समजली आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय नैसर्गिक आहे हे मान्य करावे लागेल. फक्त निसर्गाने त्यांना आपले नेमके वय काय हे सांगितले नाही, कारण ही काळाचे भान हरपलेली मालिका आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: