रविवार, १८ एप्रिल, २०२१

सुपरहिट चित्रपटांचा निर्माता शक्ती सामंत


हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक म्हणून शक्ती सामंत यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ ला बरद्वान (प. बंगाल) येथे झाला होता. त्यांचे वडील अभियंते होते. शक्ती दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांना शिक्षणाकरिता त्यांच्या नातेवाईकांकडे डेहराडून येथे पाठविण्यात आले. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण तेथेच झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली (१९४४). तेथे त्यांनी हिंदी व उर्दू भाषेचे अध्ययन केले. याचा उपयोग त्यांना नंतर हिंदी चित्रपटांचे संवाद व गीते परिणामकारक करण्यासाठी करता आला. हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथील विद्यालयात त्यांनी काही काळ उर्दू शिक्षकाची नोकरीही केली, पण दादामुनी अशोक कुमार यांनी इंडस्ट्रीत आणलेले हे हुकमी नाणे जेव्हा चालायला लागले तेव्हा सुपरहिट चित्रपटांचा निर्माता अशी ख्याती मिळवली होती त्यांनी. शम्मी कपूर यांना जम्पिंग जॅक आणि राजेश खन्नाला सुपरस्टार बनवण्यात शक्ती सामंत यांची भूमिका फार महत्त्वाची होती. त्या शक्ती सामंत यांचा आज स्मृतिदिन आहे.


१९४८ मध्ये सामंत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते बॉम्बे टॉकीजमध्ये अशोक कुमार यांना भेटले. त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी चित्रपट निर्मितीशी संबंधित काम करण्यास सुरुवात केली आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. सुरुवातीस फणी मजुमदार, ज्ञान मुखर्जी, सतीश निगम यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. राज कपूर अभिनित ‘सुनहरे दिन’ (१९४९) या चित्रपटाचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते. त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. यामध्ये फणी मजुमदार दिग्दर्शित ‘बादबान’ (१९५४) आणि ‘धोबी डॉक्टर’ (१९५४).

शक्ती सामंत यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथात्म चित्रपट ‘बहु’ (१९५४) हा होता. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘इन्स्पेक्टर’ (१९५६), ‘शेरू’ (१९५६), ‘डिटेक्टिव्ह’ (१९५७) व ‘हिलस्टेशन’ (१९५७) हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या यशानंतर त्यांनी शक्ती फिल्म्स ही स्वत:ची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘हावडा ब्रिज’ (१९५८) हा पहिला चित्रपट निर्माण केला. अशोक कुमार आणि मधुबाला अभिनित या चित्रपटाने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले.


सामंत यांनी एकूण ४३ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांतील ३७ हिंदी व ६ बंगाली चित्रपट होते. त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये ‘हावडा ब्रिज’, ‘चायना टाऊन’ (१९६२), ‘काश्मीर की कली’ (१९६४), ‘अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस’ (१९६७), ‘आराधना’ (१९६९), ‘कटी पतंग’ (१९७०), ‘अमर प्रेम’ (१९७१) इ. उल्लेखनीय आहेत.

१९५० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंत यांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्नाला नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी ‘आराधना’, ‘कटी पतंग’ व ‘अमर प्रेम’ हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. राजेश खन्नाला सुपरस्टार पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. ‘आराधना’ या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांचा प्रभावी अभिनय व सचिन देव बर्मन यांचे सुमधुर संगीत, यांचा या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा होता. त्यांनी ‘अमानुष’ हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांमध्ये निर्माण केला (१९७४). भारत व बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला ‘आवाज’ हा चित्रपट सामंत यांनी १९८४ मध्ये बनवला.


‘कश्मीर की कली’ या चित्रपटापासून सामंत रंगीत चित्रपट निर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत ‘जाने-अनजाने’ (१९७४), ‘मेहबूबा’ (१९७६), ‘आनंद आश्रम’, ‘अनुरोध’ (१९७७), ‘बरसात की एक रात’ (१९८१) व ‘अलग अलग’ (१९८५) इत्यादींचा समावेश होतो.

थोडेसे अतिरंजित पण महिला वर्गाला अधिक आकर्षित करेल असे भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत व लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही शक्ती सामंत यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची वैशिष्ट्ये होती. सामंत यांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशिम सामंत यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने आराधना साऊंड सर्व्हिस ही ध्वनिसेवा सुरू केली. निर्मितीपश्चात अंकीय श्राव्यसुविधा (डिजिटल आॅडिओ पोस्ट-प्रॉडक्शन फॅसिलिटी) पुरवणे, हे तिचे उद्दिष्ट होते. मुंबईच्या बॉलिवूड व पाश्चात्त्य हॉलिवूडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या ‘हावडा ब्रिज’, ‘आराधना’ आणि ‘बरसात की एक रात’ या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे सचेतपटामध्ये (अ‍ॅनिमेशन फिल्म) रूपांतर करण्यात आले.


सामंत यांना ‘आराधना’, ‘अनुराग’ व ‘अमानुष’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांच्या एकूण चित्रपट कारकिर्दीसाठी त्यांना झी वाहिनीतर्फे झी २००२ साली जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बेरूत या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ५ वर्षे काम केले. केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ७ वर्षे काम केले. तसेच कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

कोणतीही सदाबहार हिंदी चित्रपटांची यादी काढली किंवा गाण्यांची यादी काढायची झाली, तर त्यात शक्ती सामंत यांच्या चित्रपटातील गाणी हमखास असतात. अशा या सदाबहार निर्माता दिग्दर्शकाचा ९ एप्रिल २००९ ला हृदयविकाराने मृत्यू झाला, पण त्यांनी आपल्या चिरंतन आठवणी मात्र कायम ठेवल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: