हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मीनाकुमारी. ३१ मार्च हा तिचा मृत्यू दिन. चित्रपटात जसे तिच्या शोकांतिकांना सामोरे जावे लागले तसे तिचे पूर्ण जीवनच शोकांतिका होती. अगदी जन्मापासून ते मरणापर्यंत आकंठ दु:खच तिच्या वाट्याला आले. मीना कुमारी हिने वयाच्या सातव्या वर्षापासून सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली होती. कमाल अमरोही तिच्या कामाने प्रभावित झाले.
बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म १ आॅगस्ट १९३२ मध्ये झाला. जरी मीना कुमारी यांनी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले असले, तरी खाजगी जीवनातही ती नेहमीच दु:खी राहिली होती. ३१ मार्च १९७२ मध्ये मीना कुमारी यांचे निधन झाले, पण आपल्या कारकिर्दीत तिने सिनेमांमध्ये ज्या भूमिका निभावल्या त्यांनी मीना कुमारीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
मीना कुमारी यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी कमाल अमरोही त्यांच्या कामाने प्रभावित झाले. कमाल यांना मीना कुमारी यांनी आपल्या सिनेमात काम करावे अशी इच्छा होती, मात्र त्यांच्या आखडू स्वभावामुळे मीना कुमारी यांनी काम करण्यास नकार दिला असे म्हणतात, पण वडिलांच्या दबावामुळे मीना कुमारी यांना कमाल यांच्या सिनेमात काम करावे लागले. हा सिनेमा तर पुढे बनला नाही, मात्र कमाल अमरोही मीना कुमारी यांच्या प्रेमात पडले. मीना कुमारी यांनीही त्यांचे प्रेम स्वीकारले. कमाल यांचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे मीना कुमारी त्यांच्याशी लग्न करू शकत नव्हत्या, मात्र जेव्हा दोघेही आकंठ प्रेमात बुडाले होते तेव्हा त्यांनी लग्न केले. मीना यांचे वडील या लग्नाच्या विरोधात होते, मात्र कमाल यांच्या मित्राने मीना यांना काही कारणांनी लग्नासाठी तयार केले. १४ फेब्रुवारी १९५२ मध्ये दोघांनी लग्न केले.
कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या लग्नाची गोष्टही वेगळीच आहे. दोन तासांमध्ये त्यांचे लग्न झाले होते. ज्या क्लिनिकमध्ये मीना यांची फिजिओथेरपी सुरू होती तेथे वडील अली बख्श रोज आठ वाजता मीना यांना बहीण मधुसह सोडून जात आणि १० वाजता घ्यायला येत. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी याच दोन तासांत मीना यांच्या लग्नाचा प्लान ठरला होता. कमाल अमरोही यांचे मॅनेजर मित्र, काजी आणि काजीची दोन मुले तयार होती. जसे मीना यांचे वडील क्लिनिकबाहेर पडले तसेच काजीने लगेचच कमाल आणि मीना यांचे लग्न लावण्यास सुरुवात केली.
कमाल आणि मीना यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून परवानगी नव्हती. अखेर याला कंटाळून कमाल यांनी मीना यांना पत्र लिहिले की, हे लग्न एक अपघात होता. यावर उत्तर म्हणून मीना कुमारी यांनी लिहिले, तुम्ही मला कधीच समजू शकला नाहीत आणि यापुढेही समजू शकणार नाही. त्यापेक्षा मला घटस्फोट द्यावा. यानंतर मीना यांनी या पत्रासाठी कमाल यांची माफी मागितली. याप्रकारे मीना यांची सासरच्या घरी एण्ट्री झाली, मात्र मीना यांचे सौंदर्य पाहून कमाल त्यांच्यावर जळत असत. मीना कुमारी आणि कमाल यांच्यातील खटके वाढतच गेले. अमरोही यांनी मीना कुमारीना सिनेमात काम करण्यास मनाई केली होती, मात्र मीना यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे कौटुंबिक आयुष्यातही शोकांतिकाच झालेली होती.
काही माणसं जन्माला येतात ती अशीच येतात. मीनाकुमारींचा जन्म झाला तेव्हा बापाला ती पोसणं जड झालं होतं. म्हणून जन्म झाल्या झाल्या त्या बालिका अर्भकाला वडिलांनी उचलले अनाथाश्रमाच्या पायरीवर नेऊन ठेवले होते, पण आश्रम बंदच होता. आश्रमाचे दार उघडले नाही. खूप वेळाने त्या बालिकेचे काय झाले म्हणून तिचे वडील पहायला आले, तर ती तशीच तडफडत होती. अंगाला मुंग्या आणि किडे खात होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलीला सोडले हे पाहून वडिलांना वाईट वाटले. त्या चावणाºया मुंग्यांपासून वडिलांनी तिला सोडवले आणि स्वच्छ करून पुन्हा घरी आणले, मात्र तेव्हापासून आपल्या मुलीला कधी अंतर द्यायचे नाही हे त्यांनी ठरवले होते, पण जन्म घेऊन एकप्रकारचे पाप केल्यासारखेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे केवळ चित्रपटातच त्या ट्रॅजेडी क्वीन नव्हत्या, तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांना दु:खाच्या राशीवरून जावे लागले होते. अखेरच्या काळात दारूच्या व्यसनाने त्यांना कवटाळले होते. त्यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्री नर्गीसने एक लेख लिहिला होता, त्याचे शीर्षक होते, मीना मौत मुबारक हो. यातच सगळे आले. दु:खातून ती सुटली असेच नर्गीसला सुचवायचे होते. पडद्यावर आपल्या दर्शनाने रसिकांना सुखद आनंद देणारा हा चेहरा प्रत्यक्षात किती दु:खी होता हे यातून स्पष्ट होते.
मीना कुमारींचे खरे नाव ‘महजबीन बानो’ हे होते. केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही, तर त्या गायिका व कवयित्री होत्या. यासाठी त्यांनी ‘नाझ’ हे टोपणनाव धारण केले होते. ‘ट्रॅजेडी क्वीन’बरोबरच त्यांना कधी कधी ‘भारतीय चित्रपटांची सिंड्रेला’ असेही संबोधण्यात येत होते. १९३९ ते १९७२ या कालावधीत रुपेरी पडदा व्यापून टाकणारी ती अभिनेत्री होती. १९५० आणि १९६० चे दशक त्यांनी गाजवले. सत्तरच्या दशकात त्या चरित्र भूमिका करू लागल्या.
१९३९ च्या लेदरफेसपासून ते १९७२ च्या गोमती के किनारेपर्यंतचा त्यांचा रुपेरी प्रवास होता. यात रंगीत चित्रपट कमीच होते. कारण कृष्ण धवलच्या काळात त्यांचे पदार्पण झाले होते. साहब बिबी और गुलाम, मैं चूप रहुंगी, आरती, दिल एक मंदिर, शारदा, सहारा, चिराग कहाँ रोशनी कहाँ, दिल अपना और प्रीत पराई, आझाद, दो भिगा जमीन, बैजू बावरा, परिणीता हे त्यांचे विशेष गाजलेले आणि त्यांना पुरस्कार मिळालेले चित्रपट होते. त्या आजही तितक्याच सुंदर वाटतात, पण आयुष्यात मात्र दु:खी राहणारी ही एक गुणी अभिनेत्री बॉलिवूडच्या इतिहासात होऊन गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा