गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

नगरसेवक गेले कुठे?


सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत मोठे नेते, मंत्रिगण, पालक मंत्री ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असे सगळेजण जोरदार कामात आहेत, पण यामध्ये काम करताना स्थानिक नगरसेवक मात्र कुठेच दिसत नाहीत. सध्याच्या लसीकरणाची टंचाई, गर्दी होणे, गोंधळ होणे, यात ज्यांच्या सहभागाची आवश्यकता होती त्यांचा सहभाग नसल्याने हा फार मोठा गोंधळ दिसतो आहे. म्हणूनच प्रश्न पडतो की, नगरसेवक सध्या गेले कुठे?


लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्यावर प्रत्येक पक्ष बुथ लेव्हलवरून काम करतो. प्रत्येक स्थानिक प्रतिनिधी, नगरसेवक यांच्या माध्यमांतून आपले मतांचे गठ्ठे जमवत असतो, अंदाज घेत असतो, पण कोणत्याही पक्षाने किंवा सरकारने ही किमया लसीकरण आणि कोरोनाच्या निर्बंधांबाबत घेतलेली दिसत नाही. आज जो सध्या प्रत्येक रुग्णालयांमधून धिंगाणा चालला आहे, लसीकरणासाठी गर्दी आणि गोंधळ उडत आहे तिथे नगरसेवकांनी मदत करण्याची गरज होती. प्रत्येकाने आपापल्या प्रभागातील नागरिकांची जबाबदारी घेतली असती, तर हा गोंधळ उडाला नसता. येणारा लसींचा साठा आणि होणारे लसीकरण याचा ताळमेळ बसवण्यासाठी नगरसेवकांनी आपली कार्यक्षमता दाखवण्याची गरज होती.

प्रत्येक नगरसेवकाकडे आपल्या प्रभागातील नागरिकांची नोंद असते. त्यातील ज्येष्ठ नागरिक किती, ४५ वर्षांच्या पुढचे किती हे सगळे नगरसेवकांना माहिती असते. त्यामुळे आज प्रत्येक रुग्णालयाकडे किती लसींचा साठा आहे त्याप्रमाणे नगरसेवकांच्या माध्यमातून नियोजन केले असते, तर खूप बरे झाले असते. रुग्णालयात लसीसाठी गेल्यावर अगोदर टोकनची रांग धरायची. टोकनच्या रांगेत तीन-चार तास थांबल्यावर पुन्हा लसीची रांग. यामध्ये कुठे बसायला जागा नसते, पाणी प्यायला मिळत नाही, उभे राहून शक्ती जाते. अशा परिस्थितीत नगरसेवकांनी जनतेला सहकार्य करण्याची गरज होती. टोकनसाठी नागरिकांना रांगेत पाठवण्यापेक्षा प्रत्येक नगरसेवकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे. नगरसेवकांनी टोकन घरोघर पोहोचवली आणि कोणी कधी लस घेण्यासाठी जावे हे सांगितले, तर त्या आरोग्य कर्मचाºयांनाही गर्दीचा त्रास झाला नसता. निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी जी जागरूकता दाखवली जाते ती इथे दाखवण्याची गरज आहे. लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे. जनतेसाठी ही चांगल्या कामाची संधी आलेली असताना नगरसेवक कुठे दिसतच नाहीत.


आज फक्त दुसºयांवर टीका करण्याचे काम चालते आहे. मुंबईच्या महापौर दररोज सकाळी प्रसारमाध्यमांपुढे येऊन केंद्र सरकार कशा अडचणी करते आहे, लसींचा साठा पुरेसा कसा नाही, म्हणून रडगाणं गाताना दिसतात. पण त्यांनी जर सर्व नगरसेवकांना आदेश काढला की प्रत्येकाने आपल्या वार्डातील लसीकरणाचे नियोजन करावे. कोणत्या नागरिकांनी कधी यावे याप्रमाणे टोकनची जबाबदारी घ्यावी, असे आदेश काढले तर बरेच प्रश्न सुटतील, पण आज नगरसेवक कुठेच काम करताना दिसत नाहीत. टीव्ही लावला की मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि महापौर आलटूनपालटून येताना दिसतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात, पण कोणीही नियोजन करताना दिसत नाहीत. सतत लसींचा तुटवडा आहे, अशी वक्तव्ये केल्याने लोक गर्दी करताना दिसत आहेत. जणू काही लसींचे उत्पादन पूर्णपणे थांबले आहे आणि आता कोणाला मिळणारच नाही, असे वातावरण कॅमेºयापुढे येऊन हे मोठे नेते करतात. त्यामुळे लोक धावाधाव करून लसीसाठी गर्दी करताना दिसतात. यासाठी नगरसेवकांना यात सामावून घेतले पाहिजे.

एकूणच संपूर्ण कोरोनाच्या साथीत वर्ष-सव्वा वर्षात स्थानिक पातळीवर नगरसेवकांचा सहभाग कुठे दिसलाच नाही. सरकारने सुरुवातील मोफत धान्यवाटप केले. त्यात नगरसेवकांचा सहभाग नव्हता. सुरुवातीला मास्क वाटपासाठी काहीजणांनी उत्साह दाखवला, पण नंतर सगळे ढेपाळले ते ढेपाळलेच. म्हणूनच निवडणुकीत मतदानाच्यावेळी मतदारांना बाहेर काढण्यासाठी जशी यंत्रणा हलते तशीच लसीकरणासाठी प्रत्येक नगरसेवकाने काम करण्याची गरज आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे. विनाकारण कांगावा केला जातो आहे. लसी मिळत नाहीत. साठा उपलब्ध होत नाही. महाराष्ट्रात लसीकरणाचा विक्रम होताना दिसतो आहे. एका दिवसात पाच लाख लस देण्याची घटना इथे घडत आहे. तुटवडा असता हे झाले नसते. टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला लस मिळणार आहे, पण याचे नियोजन करण्यासाठी जे स्वयंसेवक हवे आहेत त्यात नगरसेवकांना सामावून घेतले असते, तर काम सोपे झाले असते.


प्रत्येक नगरसेवकाकडे नागरिकांची नोंद असते. त्याच्याकडे कोणाचा पहिला डोस, कोणाचा दुसरा डोस याची जबाबदारी टाकली म्हणजे कोणी केव्हा जावे हे त्याने बरोबर सांगितले असते. नगरसेवकांचा त्या निमित्ताने जनतेशी संपर्क राहिला असता, पण सगळीकडेच याबाबत निरुत्साह दिसतो आहे. आपल्या वार्डातील लोक लस घेत आहेत की नाही, याच्याशी त्यांना काहीही पडलेले नाही. लोक परस्पर लसीकरण केंद्रावर जात आहेत, गर्दी करत आहेत, रांगेत उभे राहत आहेत, लस संपली की पुन्हा परत येत आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे. हा गोंधळ थांबवण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपल्या ग्राऊंड लेव्हलच्या, रूट लेव्हलच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना कार्यरत केले पाहिजे. हे चित्र दिसत नाही याचे कारण पक्षबांधणी व्यवस्थित नाही हेच असावे. प्रत्येक ठिकाणी थेट मंत्रीच कशाला यायला पाहिजे? या परिस्थितीत घरटी सर्व्हे करून नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लसीकरणाचा पुढाकार घेतला असता आणि कोणी केव्हा लसीकरणाला जावे याचे नियोजन जवळच्या रुग्णालयाच्या सहकार्याने केले असते, तर कसलाही गोंधळ उडाला नसता. हे काम केले असते, तर आगामी निवडणुकीत वेगळा प्रचारही करावा लागणार नाही हे तरी नगरसेवकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: