कोरोनाचा हल्ला हा माणसांपेक्षा व्यवस्थेवरच जास्त झालेला दिसतो. यातील सर्वात महत्त्वाची व्यवस्था असलेल्या शिक्षण क्षेत्रावर झालेला हा हल्ला तसा दुर्लक्षला जात आहे. त्या हल्ल्याच्या परिणामांची कोणी चिंता केल्याचे दिसत नाही. कोरोनाच्या दुसºया लाटेमुळे सलग दुसºया वर्षीही शालेय परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बारावीची परीक्षा रद्द झाली नसली, तरी या परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे या पिढीचे भवितव्य काय?, असा प्रश्न पडलेला आहे. कोरोनाच्या महामारीचा शिक्षण क्षेत्रावर झालेला हा हल्ला तसा चिंतेचाच विषय आहे; पण तो योग चिंतनातून सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द झाल्याने राज्य सरकारने शालांत परीक्षा मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या परीक्षेला बसणाºया सोळा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवरील परीक्षेची टांगती तलवार दूर झाली. ही परीक्षा घेतली असती, तर या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखे झाले असते. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे काय, त्यांचे मूल्यमापन कसे होणार, यांसारखे प्रश्न आणि चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थात ते रास्तही आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील दोन शैक्षणिक वर्षे मूल्यमापन न होता पुसली गेली आहेत. त्याचा त्यांच्या करिअर वर परिणाम होणार नाही हे कोण ठामपणे सांगू शकणार आहे? दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य निश्चित करणाºया असल्याने, या परीक्षांना महत्त्व आहे, हे नाकारता येणार नाही. ज्यांनी कोरोनाच्या साथीतही आॅनलाईन पद्धतीने शिकून मनापासून अभ्यास केला, उच्च गुणवत्तेचे ध्येय बाळगत परीक्षेची तयारी केली, तेही परीक्षेपासून वंचित राहणार असून, त्यांनाही इतर विद्यार्थ्यांच्या मोजपट्टीने मोजले जाणार आहे. हा त्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांनी केलेल्या कष्टसाध्य प्रयत्नांवर अन्याय करण्यासारखे आहे. सरसकट पद्धतीने सगळ्याच विद्यार्थ्यांचे निकाल लागणार असल्याने, अकरावीच्या प्रवेशाचे काय हा प्रश्न उरतो.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना स्वतंत्र आॅनलाईन परीक्षा होऊ शकते किंवा या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांना गुणदान केले जाईल, असे वाटते. आपल्याकडेही दहावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार याविषयी स्पष्टता नाही. नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना गुणवंत विद्यार्थ्यांना या स्पर्धेत डावलले जाण्याचीही भीती आहे. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांना एक-एक टक्का महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत गुण देताना नि:पक्षपाती आणि एकसमान पद्धती अवलंबण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे कोरोनाचा हा झालेला शिक्षण क्षेत्रावरचा हल्ला चिंतनीय असाच आहे. चिंतेचा विषय आहे. मंत्रीगण परीक्षा रद्द करून मोकळे होतील; पण प्रत्यक्षात ज्यांच्या घरात असे विद्यार्थी आहेत, त्यांचे भवितव्य काय हा प्रश्नही आहेच.
मुळात परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी कितपत ज्ञान मिळवले, संपादित ज्ञानाचे उपयोजन त्यांना कितपत करता येते. प्राप्त केलेल्या कौशल्याचा ते कसा उपयोग करतात, त्यांची गुणवत्ता काय हे समजणे अवघड आहे. झाकली मूठ सव्वालाखाची तसे सगळेच हुषार आणि सगळेच ‘ढ’ अशी अवस्था आहे. आता शिक्षण शास्त्रातील आधुनिक कल्पनेनुसार परीक्षापद्धतीत शिकणाºयांची अभ्यासातील प्रगती, शिकवणाºयांची अध्यापनपद्धती अभ्यासक्रमाची योग्यायोग्यता आणि शिक्षण प्रक्रियेची परिणामकारकता यांची गुणवत्ता परीक्षेच्या माध्यमातून जोखता येते; मात्र परीक्षेलाच फाटा दिल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी जोखणार, हा प्रश्न आहे.
गेले संपूर्ण वर्ष कोरोनाच्या महामारीत गेले. पूर्ण वेळ शाळा भरल्याच नाहीत, आॅनलाईन पद्धतीने मुले शिकली; पण ते खरे शिक्षण नव्हते. ग्रामीण आणि दुर्गम भागांत फोन, इंटरनेट, वीजपुरवठा इत्यादी सुविधादेखील विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. समाजातील काही घटक आर्थिक अडचणीमुळे या सुविधांपासून वंचित राहिले. मग त्यांचे शिक्षण या पद्धतीने झाले, असे कसे म्हणता येईल? आॅनलाईन पद्धतीच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन योग्य प्रकारे झाले काय, हादेखील प्रश्न आहे. मग त्यांची गुणवत्ता कशी ठरवणार? सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल अकरावीला प्रवेश घेण्यावर असतो. शालांत परीक्षा मंडळाच्या माध्यमातून १४ लाख, तर केंद्रीय परीक्षा मंडळाच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात. यंदा लेखी परीक्षा नसल्याने ही विद्यार्थी संख्या आणि स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आॅनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना विषय पुरेसे समजले काय, विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या का, याविषयी संशोधन करावे लागणार आहे. दहावीतून अकरावीत जाणाºया विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी प्रशिक्षण वर्ग आयोजित करून त्यात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून, त्या गुणवत्तेच्या आधारे त्यास अकरावीत प्रवेश द्यावा, असा एक मतप्रवाह आहे; पण शिक्षणविभागाकडून नेमके कसे निर्णय घेतले जातात आणि या न दिसणाºया संकटापासून भावी पिढीचे रक्षण कसे केले जाते हे फार महत्त्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा